मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

!! भारतीय आयुर्विमा महामंडळ स्थापना !! (१ सप्टेंबर )

 

!! भारतीय आयुर्विमा महामंडळ
     स्थापना  !! (१ सप्टेंबर )



  १ सप्टेंबर १९५६ रोजी या एल.आय.सी. महामंडळाची स्थापना करण्यासाठी भारतीय संसदेने भारतातील विमा उद्योगाचे राष्ट्रीयकरण करणारे एल. आय. सी. कायदा केला होता. त्यासाठी २४५ हून अधिक खाजगी विमा कंपन्या आणि भविष्य निर्वाह सोसायटींचे विलीनीकरण करण्यात आले होते. विम्याचा प्रचार गरीब जनतेपर्यंत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात करणे, निर्माण होणारा प्रचंड निधी विकासासाठी वापरणे आणि विमेदारांची गुंतवणूक सुरक्षित करणे अशी उद्दिष्टे ठेवण्यात आली होती.
आयुर्विमा महामंडळाचे ब्रीदवाक्य आहे,
'योगक्षेम वाहम्यहम' (आपले कल्याण ही आमची जबाबदारी )असे आहे.
              ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी, जीवन विमा संरक्षण देणारी भारतातील पहिली कंपनी कोलकाता येथे स्थापन झाली. तिचे प्राथमिक लक्ष्य  हे युरोपियन लोक होते , त्यांनी भारतीयांना अधिक प्रीमियम आकारले होते. सुरेंद्रनाथ टागोर यांनी हिंदुस्तान विमा संस्था स्थापन केली, जी नंतर जीवन विमा महामंडळ बनली. 
                 बॉम्बे म्युच्युअल लाइफ अ‍ॅश्युरन्स सोसायटी ही पहिली मूळ विमा प्रदाता होती. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापलेल्या इतर विमा कंपन्यांचा यात समावेश आहे. विम्याचा प्रत्येक कुटुंबाशी संबंध आहे. आपण जाहिरात बघतो."जिंदगीके साथ भी,जिंदगी के बाद भी". संकट कधी येईल हे सांगता येत नाही म्हणून  प्रत्येकाने जीवन विमा उतरवावा असे वाटते.
      आज ६५ वर्षांनंतर एल आय सी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आणि आर्थिक गुंतवणूकदार आहे. सुमारे ३० कोटी वैयक्तिक पाॅलिसी आणि ११ कोटी समुह विमा योजनेत लाभार्थी आहेत.३१ लाख कोटी रुपयेची संपत्ती असा व्यापक  स्वरूप आहे.  एल. आय.सी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग व्हावा. प्रत्येकानेच  जीवन विमाच्या माध्यमातून आपले जीवन  सुरक्षित करावे असे वाटते.
     संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

!! शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक स्मृतिदिन !! (३१ ऑगस्ट )

 


!! शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक  स्मृतिदिन !! (३१ ऑगस्ट )



जन्म:१९ एप्रिल १८९२  मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३ 
                या प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक. ताराबाई या  पुणे जिल्ह्यातील चाकण येथील  केळकर घराण्यातील होत्या. त्यांचा जन्म मुंबई येथे झाला. वडिलांचे नाव सदाशिवराव व आईचे उमाबाई. वडील सुबोध पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादनाबरोबरच हितोपदेश, कामगार ही साप्ताहिके आणि ज्ञानदीप हे मासिक चालवत असत. आईही स्त्री शिक्षण, विधवा विवाहासाठी काम करत असे. बुद्धिमान व सुधारणावादी आईवडीलांमुळे ताराबाईंकडे बुद्धिमत्तेचा वारसा आला. १९१४ मध्ये ताराबाई मुंबई विद्यापीठातून बी. ए. झाल्या. महाविद्यालयीन विद्यार्थिदशेत मुंबई येथे त्यांची कृष्णा वामनराव मोडक यांच्याशी ओळख होऊन त्याचे रुपांतर विवाहात झाले.  कृष्णा मोडक अमरावती येथे वकिलीव्यवसाय करीत. त्यांना प्रभा ही मुलगी होती. पुढे ताराबाईंचे भावनगर, राजकोट, अमरावती, विकासवाडी इत्यादी ठिकाणी वास्तव्य झाले.
            ताराबाईंनी १९२२ मध्ये राजकोट येथे बार्टन फिमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये लेडी सुपरिटेंडन्ट म्हणून रुजू झाल्या. सदर कॉलेजमध्ये या पदावर काम करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत. त्यानंतर त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या साह्याने भावनगर येथे माँटेसरीच्या तत्त्वांवर आधारलेली ‘गीता शिक्षण पद्धती’ निश्चित केली. हाच ताराबाईंच्या बालशिक्षण कार्याचा प्रारंभ होय. शिक्षणाचा खरा पाया मुलांच्या बालवयातच घातला जाण्याची शक्यता व आवश्यकता असते, या दृष्टीने त्यांनी पूर्वप्राथमिक शिक्षणाचे नवीन पाऊल टाकले. १९२३ – १९३२ ही नऊ वर्षे त्यांनी भावनगरच्याच दक्षिणामूर्ती शिक्षणसंस्थेत प्राध्यापिका म्हणून काम केले. १९३३ पासून त्यांनी शिक्षणाबाबची शिक्षणपत्रिका काढायला सुरुवात केली. १९३६ साली त्यांनी नूतन बालशिक्षण संघाची स्थापना केली. पुढे बालशिक्षणाचे हे लोण महाराष्ट्रात पसरले. १९३६ – १९४८ या काळात त्यांनी मुंबई-दादरच्या हिंदू कॉलनीत शिशुविहार नावाची संस्था स्थापन करून बालशिक्षणाचे प्रसारकार्य केले. या संस्थेने पुढे पूर्वप्राथमिक अध्यापन मंदिर सुरू केले. यातून मराठी आणि गुजराती या दोन्ही भाषांच्या हजारांहून अधिक शिक्षक-शिक्षिकांचे प्रशिक्षण झाले.
         ताराबाईंनी गिजुभाईंच्या मृत्यूनंतर पुढील १२ वर्षे नूतन बालशिक्षण संघाची धुरा वाहिली. ग्रामीण भागात बालशिक्षणाचा प्रसार करणे हे या संघाचे काम होते. खेड्यांमध्ये शास्त्रीय पद्धतिने मात्र कमी खर्चात बालवाड्या चालविण्यासाठी १९४५ मध्ये ताराबाईंनी ठाणे जिल्ह्यातील बोर्डी येथे ग्राम बालशिक्षा केंद्र स्थापिले. या संस्थेतूनच ग्रामीण बालवाडी व ग्राम बाल अध्यापन मंदिर या संस्था निघाल्या. या संस्थांचा लाभ आदिवासी मुलांना मिळावा, म्हणून त्यांच्या आदिवासी परिसरात आणि अंगणात बालवाडी चालविण्याचा उपक्रम करण्यात आला. या अंगणवाडीमुळे आदिवासींच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळाली. त्यांच्या या शैक्षणिक कार्यास शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. १९५७ मध्ये बोर्डी येथील ग्राम बालशिक्षा केंद्र कोसबाड येथे हलविण्यात आले. ताराबाईंनी कोसबाडच्या परिसरात प्राथमिक शिक्षणासाठी ६ ते १४ वयोगटातील मुलांसाठी सुरू केलेल्या विकासवाडी या प्रकल्पातील अनुभवातून कुरणशाळेचा प्रयोग सुरू केला. प्राथमिक शाळेत मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न होता. मुले शाळेत हजर राहावीत म्हणून ताराबाईंनी गृहभेटी, प्रचार फेऱ्या, दिंडी, मुलांसाठी बैलगाडीची सोय, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबविले. त्याचबरोबर भातशेती ह्या मूलोद्योगाच्या माध्यमातून विज्ञान, गणित, भाषा हे विषय शिकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलांना शिक्षण घेण्यात गोडी देखिल वाटू लागली; परंतु धान्याच्या पेरणीनंतर सहा ते दहा वयोगटातील आदिवासी मुले व काही मुली पूर्ण दिवस गुरांना रानात चारायला नेत. त्यामुळे मुलांची अनुपस्थिती हा गंभीर प्रश्न पुन्हा ताराबाईंपुढे निर्माण झाला. यावर उपाय म्हणून ताराबाईंनी शाळेलाच रानात नेण्याचा यशस्वी प्रयोग केला आणि त्याला कुरणशाळा (Meadow School) असे नाव दिले. शहराच्या ठिकाणाहून कोणतेही शैक्षणिक साधने न आणता त्यांनी विद्यार्थ्यांना रंग, स्पर्श, वजन मापन, अंक, आकार इत्यादी संकल्पना समजावे यांकरिता पिसे, बांगळ्या, शंख, दगडं, बिया, माती, रेती, बांबुफळे, डब्या इत्यादी स्थानिक वस्तूंचाच वापर केला. ताराबाईंनी १९५८ मध्ये आदिवासी मुलांसाठी सुरू केलेल्या कुरण शाळा प्रयोगाची शिक्षणक्षेत्रातील एक खास व मौलिक शोध म्हणून नोंद झालेली आहे. पुढे १९७४ मध्ये भारत सरकारने या प्रयोगाचा आढावा घेणारी कुरणशाळा (मराठी) मेडोस्कूल (इंग्रजी) या पुस्तिका ताराबाईंकडून लिहून घेतली.
         कुरण शाळेबरोबरच रात्रीची शाळा, व्यवसायशिक्षण हे पूरक प्रकार प्रायोगिक स्वरूपात सुरू करण्यात आले. येथील प्रशिक्षण महाविद्यालयात ताराबाईंनी पुरस्कारिलेली शिक्षणयोजना चालू असून तिला राज्य सरकारची मान्यता लाभली आहे. हा एक नवीन प्रयोग असल्याने आदिवासी विभागातील एकशिक्षकी शाळांतील मुलांच्या बुद्धिमापनासंबंधी अधिक संशोधन करून नव्या अभ्यासक्रमाची रचना, बालसाहित्यनिर्मिती व विज्ञानशिक्षण देण्याचे प्रयोग सुरू आहेत. परंपरागत शिक्षणपद्धतीमधील जबरदस्त शिक्षेच्या, वेळापत्रकाच्या सर्व कल्पनांच्या मुळावर घाव घालणाऱ्या माँटेसरीच्या मूळ तत्त्वांना त्यांनी धक्का लागू दिला नाही; मात्र त्यांचे शिक्षणविषयक धोरण एका बाजूने राष्ट्रीय, तर दुसऱ्या बाजूने स्थलकालातीत होते. आदिवासी मुलांचे जीवन विकसित करण्यासाठी ताराबाईंनी आपले आयुष्य वेचले.
              ताराबाई या १९४०–१९५४ या काळात ग्राम बालशिक्षण संघाच्या चिटणीस होत्या. यादरम्यान त्यांनी शिक्षण पत्रिका या मराठी, गुजराती, हिंदी भाषिक मासिकाचे संपादन केले. १९४६–१९५१ या काळात त्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभासदही होत्या. त्यांनी प्राथमिक शाळा समितीवर अनेक वर्षे काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. महात्मा गांधी  यांनी आपल्या बुनियादी शिक्षणपद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले होते. गिजुभाई बधेका व ताराबाई मोडक यांनी संपादित केलेली बालसाहित्याची सुमारे १०५ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांत बालनाटके, लोककथा, लोकगीते इत्यादी साहित्याचा अंतर्भाव होतो. ताराबाईंना शासनाने त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल २६ जानेवारी १९६२ रोजी पद्मभूषण हा किताब देऊन गौरविले.
        ताराबाई मोडक यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
         संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८







रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

! गोकुळाष्टमी !!(३० ऑगस्ट )

 

       !!   गोकुळाष्टमी  !!(३० ऑगस्ट )




               असुरांचा अत्याचार वाढला आणि धर्माचे पतन झाले त्यावेळी देवाने पृथ्वीवर अवतार घेऊन सत्य आणि धर्माची स्थापना केली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीचे भाग्य किती थोर आहे बघा ज्या संस्कृतीत मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मला त्याच संस्कृतीत श्रीकृष्णासारखा पूर्ण पुरुषोत्तम युगपुरुषही जन्माला आला. वैयक्तिक नैतिकता म्हणजे काय ते आपण रामाकडून शिकावे तर सामाजिक एकात्मता म्हणजे काय हे श्रीकृष्णाकडून. श्रीकृष्णाचा जन्म अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना कंसाच्या बंदिशाळेत, गोकुळात झाला  म्हणून या दिवसाला गोकुळाष्टमी म्हणतात. संपूर्ण भारतात सर्व ठिकाणी अतिशय उत्साहात हा जन्मदिवस साजरा करतात. या दिवशी विविध खाद्यपदार्थ दही, दूध, लोणी एकत्र करून कालविणे म्हणजेच “काला” होय. यालाच दहीकाला असे म्हणतात. या दिवशी दहीकाला करून खाण्याचा प्रघात आहे. श्रीकृष्णाचा हा आवडता खाद्यपदार्थ होता.
                 श्रीकृष्ण श्रीमंत घरात जन्मला असूनदेखील गरीब, दिनदुबळ्या गवळ्यांच्या मुलांमध्ये रमला, बागडला. या मुलांना दूध-दही मिळत नसे तेंव्हा श्रीकृष्ण आपली व सर्व सवंगड्यांची शिदोरी एकत्र करून त्याचा काला करून खात असे. श्रीकृष्णाने कधीही गरीब श्रीमंत वा उच्च नीच असा भेदभाव केला नाही. त्याला अर्जुनाबद्दल जितके प्रेम होते तेवढेच सुदाम्याबद्दल आपलेपण होते.ह्यामधूनच समाजाशी एकरूप होण्याचे त्याचे आचरण दिसून येते.
        श्रावण महिन्याच्या कृष्ण  जन्माष्टमीच्या मध्यरात्री अत्याचारी कंसाचा विनाश करण्यासाठी मथुरेत भगवान कृष्णाने अवतार घेतला. म्हणूनच या दिवसाला कृष्ण जन्माष्टमी किंवा जन्माष्टमीच्या रूपात साजरे केले जाते. या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जन्माष्टमी व्रत केले जाते.
              भाविक मंडळी अष्टमीला उपवास करतात व नवमीला सोडतात. या दिवशी सर्व लहान थोर मानवी साखळी करुन रस्त्याने मिरवणूक काढतात. तेंव्हा घराघरातून लोक घागरी भरून त्यांच्यावर पाणी ओततात. ठिकठीकाणी चौकाचौकात बांधलेली दहीहंडी मानवी मनोरा रचून शारिरीक कौशल्याने ती फोडतात ह्या सणातून आपल्याला खेळाचे, शारिरीक कौशल्याचे म्हणजेच आरोग्याचे महत्व पटते. समाजात एकोपा राहण्यासाठी, प्रेम वाढविण्यासाठी असे खेळ खूप मोलाची भूमिका निभावतात. श्रीकृष्ण तर दहीहंडी, विटीदांडू, मल्लकुस्ती अशा खेळांचा आद्यपुरस्कर्ता होता. ह्या सर्व भारतीय खेळांचा प्रसार श्रीकृष्णामुळे सर्वसामान्यांपर्यंत झाला.
                श्रीकृष्णाने कर्माचे महत्व गीतेद्वारे सांगून आपल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये हा संदेश समाजाला दिला. श्रीकृष्णाचे संपूर्ण आयुष्य हे  समाजासाठी एक आदर्श होऊन राहिले आहे. त्याने जीवनाच्या सर्व क्षेत्रात खेळ, समाज, तत्वज्ञान, नैतिकता,कर्तव्य एक आदर्श  निर्माण केला आहे. जो आपल्याला एका दीपस्तंभासारखा दिशा दाखवत राहील.
         श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण नेहमी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची किंवा कोणत्याही लाभाची अपेक्षा ठेवू नये. आसक्तिरहित कर्मच श्रेष्ठ ठरते. अशा या प्रयत्नवादी, ध्येयवादी पुरुषोत्तमाने सांगितलेल्या मार्गावरून चालण्याचा निश्चय करणे हाच गोकुळाष्टमीचा संदेश आहे.सध्या राज्यात कोरोनाजन्य परिस्थिती असल्याने दहीहंडीसारखे कार्यक्रम करण्यास परवानगी नाही. आपण हा सण साधेपणाने साजरा करुया.
आपणास गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८



शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

!! राष्ट्रीय क्रीडा दिवस !! (२९ ऑगस्ट )

 

      !!   राष्ट्रीय क्रीडा दिवस  !!
                 (२९ ऑगस्ट )




               ध्यानचंद यांचा जयंती दिन ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा होणार
भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जाणार आहे.
भारतीय हॉकीचे मानांकित खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या २९ ऑगस्ट या जयंती दिनानिमित्त संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जाणार आहे. ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, प्रोत्साहन मिळावे तसेच देशाच्या कानाकोपऱ्यात खेळाची जागरुकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा कऱण्याचे ठरविण्यात आले होते. 
त्यानंतर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा कऱण्याचे निश्चित करण्यात आले.
      युवा आणि खेळ मंत्रालयाचे सचिव ओंकार खेडीया म्हणाले, “देशात क्रीडा संस्कृती वाढावी, जपून रहावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आजही आपण इतर देशांसारखा खेळाचा गांभीर्याने विचार करत नाही. आपल्याकडे आजही खेळाडूंना योग्य मानसन्मान मिळत नाही. त्यामुळे क्रिडा दिवस साजरा करुन खेळ संस्कृतीच्या महत्वाची जाणीव निर्माण करणे गरजेचे आहे. त्यानुसार २९ ऑगस्टला देशभर विविध ठिकाणी क्रीडा संस्कृतीशी निगडीत कार्यक्रम होणार आहेत.” 
नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.दिनांक २७ ऑगस्ट रोजी पुणे येथील आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटला नीरज चोपडा यांचे नाव देण्यात आले त्याचे उदघाटन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी संरक्षण मंत्रांच्या हस्ते आर्मी स्पोर्ट क्लब मधील ऑलिम्पिकसह कॉमनवेल्थमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना विशिष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात नीरज चोपडा, प्रवीण जाधव,मनीष कौशिक,सतीश कुमार,सी. ए. कट्टपा, छोटेलाल यादव (मेरी कोमचे कोच),दीपक पुनिया, आर्वेदसिंग, अर्जुनलाल जाट,विष्णू सर्वानंद, दीपक कुमार,आरोग्य राजीव, अविनाश साबळे, के. टी. इरफान, संदीप कुमार, कुलदीप सिंग,शिवपाल सिंग, लेक्स अँटनी, अभिषेक पांडे यांचाही सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा.
संकलक :राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

!! व्यंकटेश दिगंबर माडगूळकर स्मृतीदिन !! (२८ ऑगस्ट )

 


!! व्यंकटेश दिगंबर माडगूळकर स्मृतीदिन !!

 (२८ ऑगस्ट ) 





जन्म : माडगूळ ५ एप्रिल १९२७ मृत्यू : २८ ऑगस्ट २००१ हे मराठी लेखक आणि चित्रकार होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांना शिकारीचा छंद होता.त्यांनी काही पुस्तके त्यांच्या जंगल भ्रमंतीच्या अनुभवांवर लिहिली आहेत.
         व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्त्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत.
व्यंकटेश माडगूळकर हे आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५-८५) नोकरीत होते.
आरंभी काही काळ पत्रकारिता केल्यानंतर ते १९५० च्या सुमारास व्यंकटेश माडगूळकर मुंबईस आले आणि मराठी चित्रसृष्टीत पटकथालेखन करू लागले. तत्पूर्वी 'माणदेशी माणसे' (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी सहित्याला अनोखे होते. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. त्यानंतर गावाकडच्या गोष्टी (१९५१), हस्ताचा पाऊस (१९५३), सीताराम एकनाथ (१९५१), काळी आई (१९५४), जांभळीचे दिवस (१९५७) ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत.
ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळे दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२), आणि सत्तांतर (१९८२), ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत.
       व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. 'कोवळे दिवस' ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.
'पुढचं पाऊल' ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे.
व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, 'तू वेडा कुंभार', 'सती', 'पति गेले गं काठेवाडी' ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. 'कुनाचा कुनाला मेळ न्हाई' आणि 'बिनबियांचे झाड' ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.
'प्रवास एक लेखकाचा' हे व्यंकटेश माडगूळकरांचे आत्मचरित्र आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांच्या ४१ पुस्तकांचे पुण्यातील मेहता प्रकाशनकडून १८ मे २०१२ रोजी नव्याने प्रकाशन झाले.
व्यंकटेश माडगूळकरांचे प्रकाशित साहित्य
जशास तसे (कथा- १९५१)
पुढचं पाऊल (कथा-१९५०)
रंगपंचमी (पटकथा, संवाद-१९६१)
वंशाचा दिवा (कथा-१९५०)
सांगत्ये ऐका (पटकथा-संवाद-१९५९)
व्यंकटेश माडगूळकर यांना मिळालेले पुरस्कार
व्यंकटेश माडगूळकरांच्या अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार लाभले. त्यांत 'गावाकडील गोष्टी', 'काळी आई' ह्यांसारखे कथासंग्रह, 'बनगरवाडी' ही कादंबरी आणि 'सती' ही नाट्यकृती ह्यांचा अंतर्भाव होतो.
साहित्य अकादमी पुरस्कार १९८३ - 'सत्तांतर' साठी
जनस्थान पुरस्कार
   व्यंकटेश माडगूळकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

!! सेतू माधवराव पगडी जन्मदिन !! (२७ ऑगस्ट )

 

!! सेतू माधवराव पगडी जन्मदिन !!
   


   (२७ ऑगस्ट )

जन्म:२७ ऑगस्ट १९१० मृत्यू:१४ ऑक्टोबर१९९४
             हे इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी  आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. शिवाजी महाराजांवर लिहिलेले त्यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे.
        इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा अभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला.
               मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे ग्रंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लर्नेड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशंसा केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.
         सेतु माधवराव पगडी हे १९६० ते  १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते.  १९५१ साली औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते हैदराबाद संस्थानमध्ये सनदी अधिकारी होते.
   सेतू माधवराव पगडी यांना मिळालेले पुरस्कार:-
१)डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
  विद्यापीठाची मानद डॉक्टरेट  पदवी
२) “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या
  ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार
३)मराठा मंदिर संस्थेकडून चरित्रकार
   पदक
४)महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून न. चिं.
    केळकर पारितोषिक
५)भारत सरकारकडून पद्मभूषण
    पुरस्कार.

       संकलक :राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

!! मदर तेरेसा जन्मदिन !!(२६ ऑगस्ट)

 


!! मदर तेरेसा जन्मदिन !!(२६ ऑगस्ट)



जन्म:२६ ऑगस्ट १९१०मृत्यू:५ सप्टेंबर १९९७
           २६ ऑगस्ट १९१० रोजी मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर तेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी ८ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर तेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर तेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थितीतीतुन गेले. मदर तेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्चमधे जाऊन धार्मिक गीतगायन करीत असत. त्या ज्यावेळी केवळ १२ वर्षांची होत्या तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेल्या असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा मनोमन निश्चय केला. १९२८ साली ज्यावेळी मदर तेरेसा फक्त १८ वर्षांच्या होत्या तेव्हां त्यांनी "नन" चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे काम करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी तेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करु लागल्या.
           मदर तेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत १९२९ साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षिका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर तेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या.  तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर तेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजुंची सेवा करण्याचा निश्चय केला.
           गरीब आणि गरजुना मदत करण्याच्या हेतुने मदर तेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे १९४८ ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दिले. खुप प्रयत्नांनंतर ७ ऑक्टोबर १९५० ला मदर तेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी "मिशनरी ऑफ चॅरिटी "ही संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळाली. मदर तेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजू, रूग्णं, आणि लाचारांना सहाय्य करणे आणि त्यांच्यात जगण्याची आवड निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर तेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांना मदत केली जात असे.
                मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. १९८३ साली ज्यावेळी त्या रोमला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा १९८९ साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, १९९१ ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. १९९७ ला मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख, पदावरून निवृत्ती घेतली व ५ सप्टेंबर १९९७ ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अशा तऱ्हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.
मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार :-
१)पदमश्री (१९६२ )
२)नोबेल शांतता पुरस्कार (१९७९)
३)भारतरत्न (१९८०)
४)मेडल ऑफ फ्रीडम अवॉर्ड (१९८५)  
               मदर तेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर वाखाणण्याजोगेआहे. सर्वांनीच मदर तेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. या महान परोपकारी  व्यक्तीला भावपुर्ण आदरांजली…..
        संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

!! साहित्यिक गंगाधर गाडगीळ जन्मदिन !!(२५ ऑगस्ट )

 

!! साहित्यिक गंगाधर गाडगीळ
    जन्मदिन !!(२५ ऑगस्ट )



गंगाधर गोपाळ गाडगीळ जन्म:२५ ऑगस्ट १९२३ मृत्यू :१५ सप्टेंबर २००८   हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक ख्यातनाम मराठी लेखक आहेत.
               गंगाधर गाडगीळ यांचा जन्म आजच्याच दिवशी१९२३ मध्ये मुंबई येथे झाला. मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी सिडनहॅम कॉलेज आणि मुंबईतील काही इतर महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले . ते १९६४ ते१९७१  दरम्यान प्रसिद्ध एन. एम. कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्सचे पहिले प्राचार्य होते . गाडगीळ यांनी १९८८पर्यंत साहित्य अकादमी, नवी दिल्लीच्या महासभेचे उपाध्यक्ष आणि सदस्य म्हणून काम पाहिले. १९८३ ते१९९९पर्यंत त्यांनी मुंबई मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अर्थशास्त्र, साहित्य, चरित्र, साहित्यिक समालोचन आणि प्रवासवर्णन यामध्ये गाडगीळ यांचे काम मोठे  आहे. ते बहुआयामी लेखक आहेत.
           गाडगीळ यांची चिकित्सक बुध्दी, प्रयोग करण्याची तयारी यामुळे त्यांचे लेखन विविधांगी आहे.खासकरून प्रवास वर्णन,नाटक, लघुकथा,विनोदी लिखाणासाठी ते प्रसिद्ध आहेत. "लिलीच फूल" ही त्यांची पहिली कादंबरी आहे.त्यांच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, मल्याळम आदि  अनेक भाषांमध्ये भाषांतर केले गेले आहे.
           गाडगीळ यांनी लोकमान्य टिळक, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे,गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा गांधी  त्याचबरोबर मुंबईशी जवळचे नाते असल्याने  जगन्नाथ शंकरशेठ,दादाभाई नौरोजी,वालचंद हिराचंद, विश्वनाथ मंडलिक,जमशेदजी जिजिभाय,राज्यपाल माऊंसर्ट एलफिन्स्टन यांच्या जीवनावर चरित्रात्मक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांनी महाविद्यालयीन विद्यार्थांसाठी अर्थशास्त्र
या विषयाची पाठ्यपुस्तके लिहिली. गाडगीळ हे मुंबईच्या ग्राहक पंचायतिशी निगडित होते. या संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १५वर्षे काम पाहिले.गाडगीळ हे काही काळ वालचंद हिराचंद ग्रुपचे आर्थिक सल्लागार होते.
गाडगीळ यांचे काही प्रकाशित साहित्य:-
१)मानस परीक्षा
२)कडू आणि गोड
३)नव्या वाटा
४)वेगळे जग
५)कबुतरे
६)गुणाकार
७)आठवण
८)उधवस्त विश्व
९)बायको आणि डोंबल
१०)भरारी
११)बुगडी माझी सांडली ग
१२)सात मजली हास्य
         गाडगीळ यांना मिळालेले काही पुरस्कार :
१)महाराष्ट्र राज्य पुरस्कार (१९५६,१९५७,१९६०)
  २)" एका मुंगीचे महाभारत" या आत्मचरित्रासाठी  साहित्य अकादमी पुरस्कार (१९९६)
३)जनस्थान पुरस्कार (१९९७)
४) एन.सी. केळकर पुरस्कार (१९८०)
५)आर. एस. जोग पुरस्कार
          अशा बहुआयामी साहित्यिकास मानाचा मुजरा.
   संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

सोमवार, २३ ऑगस्ट, २०२१

!! क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जन्मदिन !! (२४ ऑगस्ट )

 

!!  क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू जन्मदिन !! (२४ ऑगस्ट )



शिवराम हरी राजगुरु जन्म:२४ ऑगस्ट १९०८मृत्यू:२३ मार्च १९३१
  भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक प्रमुख क्रांतिकारक होते. त्यांच्यासमवेत भगतसिंग, सुखदेव यांना २३ मार्च १९३१ मध्ये लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. २३ मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून पाळला जातो.
              शहीद शिवराम हरि राजगुरू
यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील  एका खेडेगावात आजच्याच दिवशी १९०६ रोजी झाला. अगदी लहान वयातच त्यांचे पितृछत्र हरपले. वडिलांच्या निधनानंतर ते वाराणसीत अगदी लहान वयात संस्कृत शिकण्यासाठी आले. त्यांनी हिंदू धर्मग्रंथ आणि वेदांचा अभ्यास केला होता . त्यांना व्यायामाची खूप आवड होती आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धाच्या शैलीचे खूप मोठे चाहते होते.
              वाराणसीत शिकत असताना राजगुरूंचा अनेक क्रांतिकारकांशी संपर्क झाला. चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूवर मोठा प्रभाव होता.भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद या तरुणांनी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले. हे क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. या तरुणांनी"हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन"या संघटनेची  स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे मुख्य उद्दीष्ट  होते. भगतसिंग,राजगुरू यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले होते.
        या क्रांतिकारकांच्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळण्यास खूप मोठी मदत झाली.क्रांतिकारकांच्याप्रती आपण सदैव विनम्र राहूया. जन्मदिनाच्या निमित्ताने राजगुरू यांना विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

!! विंदा करंदीकर जन्मदिन !! (२३ ऑगस्ट )

 


!! विंदा करंदीकर जन्मदिन !!
     (२३ ऑगस्ट )



गोविंद विनायक करंदीकर जन्म:२३ ऑगस्ट १९१८मृत्यू :१४ मार्च २०१०  हे विंदा म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय कवी, लेखक, साहित्यिक समीक्षक आणि मराठी भाषेतील भाषांतरकार होते .
      विंदानी लहान मुलांच्यासाठी सशाचे कान, परी ग परी,राणीची बाग अशा कविता लिहिल्या आहेत. स्वेदगंगा, मृदगंधा,जातक,विरुपीका हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले आहेत.  त्यांच्या कवितांचे इंग्रजी भाषेत अनुवाद झाले आहेत.
                      प्रख्यात मराठी कवी असण्याव्यतिरिक्त, निबंधकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून करंदीकर यांनी मराठी साहित्यात योगदान दिले आहे.
विंदाना मिळालेले पुरस्कार--
१) ३९ वा ज्ञानपीठ पुरस्कार (२००६)
२)केशवसुत पुरस्कार
३)नेहरु साहित्य पुरस्कार
   विंदा करंदीकर यांचे १४ मार्च २०१० रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
   विंदांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
       संकलक:  राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८
विंदा करंदीकर यांची " तेच ते,देणाऱ्याने देत जावे,भारतीय स्त्रियांचे स्थानगीत"  त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे.आपण कवितेचा आस्वाद घ्यावा.

https://youtu.be/qriaKaku_h8

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

!! प्रेशर कुकरचे जनक डेनिस पेपिन जन्मदिन !! (२२ ऑगस्ट )

 

      !! प्रेशर कुकरचे जनक डेनिस पेपिन जन्मदिन !! (२२ ऑगस्ट )



डेनिस पेपिन जन्म: २२ ऑगस्ट १६४७ मृत्यू:२६  ऑगस्ट १७१३  एक फ्रेंच  भौतिकशास्त्रज्ञ , प्रसिध्द गणितज्ञ,प्रेशर कुकरचे जनक म्हणून ओळखले जातात.
पेपिनने तेथील एका जेसुइट शाळेत शिक्षण घेतले. १६६१ मध्ये त्याने अँगर्स विद्यापीठात प्रवेश घेतला , जिथून त्याने १६६९ मध्ये वैद्यकीय पदवी प्राप्त केली.
१६७३ मध्ये पॅपिनने पॅरिसमध्ये क्रिस्टियन ह्युजेन्स आणि गॉटफ्राइड लिबनिझ यांच्यासोबत काम केले त्यांनी व्हॅक्यूम वापरण्यात रस घेतला .पेपिन यांनी स्टीम डायजेस्टर ,म्हणजेच प्रेशर कुकरचा शोध लावला.
     १६९० मध्ये मारबर्गमध्ये असताना , त्याच्या 'डायजेस्टर' वर वातावरणीय दाबाची यांत्रिक शक्ती पाहिल्यानंतर, पॅपिनने पिस्टन स्टीम इंजिनचे मॉडेल तयार केले . त्याने थॉमस सेव्हरीच्या एका शोधावर आधारित  गॉटफ्राइड लिबनिझच्या मदतीने दुसरे स्टीम इंजिन विकसित केले . थोडक्यात डेनिस पेपिन हे प्रेशर कुकरचे जनक आहेत .त्यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

!! बिस्मिल्ला खान स्मृतिदिन !! (२१ ऑगस्ट)

 


!! बिस्मिल्ला खान स्मृतिदिन !!
    (२१ ऑगस्ट)



        उस्ताद बिस्मिल्ला खॉं जन्म : २१ मार्च  १९१६ : मृत्यू : २१ ऑगस्ट  २००६ हे ख्यातनाम भारतीय सनईवादक होते.
बिस्मिल्ला खान यांच्या जीवनावर एक लघुपट असून तो डॉ.के.प्रभाकर यांनी दिग्दर्शित केलेला आहे.
!!बिस्मिल्ला खान यांना मिळालेले           पुरस्कार  !!
१)पद्मश्री(१९६१)
२)पद्मभूषण(१९६८) ३)पद्मविभूषण(१९८०), ४)भारतरत्न(२००१)

बिस्मिल्ला खान यांना विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

( बिस्मिल्ला खान यांचे सनई वादन ऐकण्यासाठी यु ट्यूबची लिंक देत आहे. आपण सुमधुर सनई वादनाचा आस्वाद घ्यावा.)

https://youtu.be/kHaEkkOhMB4

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

डाॅ. नरेंद्र दाभाेलकर स्मृतिदिन (२० ऑगस्ट )

 


डाॅ. नरेंद्र दाभाेलकर स्मृतिदिन
  (२० ऑगस्ट )



जन्म:१ नोव्हेंबर १९४५ मृत्यू:२० ऑगस्ट २०१३
      आज २० ऑगस्ट २०२१सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्ष पूर्ण होत आहेत. जगाला तंत्रज्ञान देणाऱ्या भारतासारख्या देशात आठ वर्षांनी कटातील केवळ काही लोकच सापडतात ही शोकांतिका आहे. एका बहुआयामी व्यक्तीमत्वाचा असा निर्घुण खून होतो, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात नाहीत; पण त्यांचे बहुआयामी विचार प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहणार आहेत. डाॅ. दाभोलकरांविषयीच्या निवडक गोष्टी जाणून घेऊया.
          आठ वर्षांपूर्वी २० ऑगस्ट २०१३ या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे डॉ. नरेंद्र दाभोलकर 'मॉर्निंग वॉक'साठी बाहेर पडले, सकाळी साडेसात वाजता पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराजवळ असलेल्या महर्षी शिंदे पुलावर, काही जणांनी चार गोळ्या झाडून डॉ. दाभोलकरांची हत्या केली. गोळीबार केल्यावर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले. त्यावेळी पोलिसांनी डाॅ. दाभोलकरांना ससून रुग्णालयात दाखल केले; पण त्यापुर्वीच घात झाला. छायाचित्रावरून आणि साधना साप्ताहिकाच्या काही कार्यकर्त्यांनी ओळख पटविल्यावर पोलिसांनी नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याचे घोषित केले. एका बहुआयामी व्यक्तीमत्वाचा असा निर्घुण खून होतो, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आज डाॅ. दाभोलकर आपल्यात नाहीत; पण त्यांचे बहुआयामी विचार प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहणार आहेत. डाॅ. दाभोलकरांविषयीच्या निवडक गोष्टी जाणून घेऊया. उत्कृष्ट कबड्डीपट्टू : डाॅ. नरेंद्र दाभोलकर हे केवळ अंधश्रध्देविरुध्दच्या लढ्यासाठीच प्रसिध्द नव्हते, तर दाभोलकर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणूनही क्रीडाविश्वात सुविख्यात होते. नरुभाऊंचा (कबड्डीतील लोक दाभोलकरांना `नरुभाऊ` या नावाने ओळखायचे) कबड्डीत चांगलाच दबदबा होता. ते नित्यनियमाने श्री शिवाजी उदय मंडळाच्या मैदानावर कबड्डीच्या सरावासाठी जात. सडपातळ नरुभाऊ मैदानात उतरले की, प्रतिस्पर्ध्यांच्या हातीच लागत नसायचे. कारण, त्यांची हनुमान उडी खूप प्रसिध्द होती. समोरून पकड करण्यास कोणी आले की, नरुभाऊ पायात स्प्रिंग असल्यासारखी उडी मारायचे. एका जागेवर उभ्या-उभ्या सहा फुटांपर्यंत उडी घ्यायचे, असे दाभोलकारांबरोबरचे भिडू आजही अभिमानाने सांगतात. हे सांगताना त्यांचा ऊर भरुन येतो.  ते कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे व महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघांचे कर्णधार बनले. एवढच नव्हे तर देशाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी संघात त्यांचा समावेश होता. वीस-पंचवीस वर्षे त्यांचे कबड्डीशी घट्ट नाते होते.  मला लढण्याची, संघटना उभी करण्याची प्रेरणा ही कबड्डीची देण असल्याचे दाभोलकर आवर्जुन सांगत. सांघिक भावना, जिंकण्याची- हरण्याची सवय, मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही हा मंत्र हे सगळ मला कबड्डीमुळे मिळालं. कबड्डी खेळताना मी सुद्धा इतर खेळाडूंप्रमाणे अंधश्रद्धाळू होतो; पण याच खेळाने मला त्यातला फोलपणा दाखवून दिला, असं ही ते सांगत. तद्नंतर कबड्डी व या खेळाची शास्त्रशुद्ध माहिती देणारे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. कबड्डी या क्रीडा प्रकारात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्र सरकारचा मानाचा 'शिवछत्रपती पुरस्कार व शिवछत्रपती युवा पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला आहे. आजही कबड्डी क्रीडाविश्वात दाभोलकरांच्या हनुमान उडीचा सर्रास वापर केला जातो आणि समोरच्या प्रतिस्पर्ध्याला चितपट केले जाते.
                    उत्तम साहित्यिक : डाॅ. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. सामाजिक कार्यासाठीचे त्यांचे योगदान अमूल्य आहे. हे सर्व करत असताना त्यांची साहित्य क्षेत्रावरही मोठी कमांड होती. ‘विवेकाची पताका घेऊ खांद्यावरी’हे डॉ. नरेंद्र दाभोळकरांचं पुस्तक विवेकवादी चळवळीत असणाऱ्या प्रत्येकानं वाचावं, असंच आहे. तसेच त्यांनी 'अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, ऐसे कैसे झाले भोंदू , झपाटले ते जाणतेपण , ठरलं... डोळस व्हायचंय, `तिमिरातुनी तेजाकडे, प्रश्न मनाचे' (सहलेखक डॉ. हमीद दाभोलकर), 'भ्रम आणि निरास, विचार तर कराल? , मती भानामती' (सहलेखक माधव बावगे), श्रद्धा-अंधश्रद्ध', अशी पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, तसेच त्यांनी अवांतर लेखनही केले आहे. त्यांच्या या साहित्याचा परिणाम युवावर्गावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यांच्या या साहित्याच्या जोरावर डाॅक्टरांनी चळवळीसाठी युवापिढी भक्कम केली, त्यास प्रतिसाद मिळत गेला. आजही त्यांचे साहित्य इतके लोकप्रिय आहे की, दरवर्षी त्यांच्या पुस्तकांच्या लाखो प्रतींची विक्री होते. त्यांच्या या साहित्यावरच आजची पिढी व्यसनाधिनतेपासून अलिप्त असलेली पहायला मिळत आहे, ही दाभोलकरांच्याच साहित्याची देणं आहे. रशियापर्यंत पोचलेला फकीरा व्यसनाविषयी डाॅ. दाभोलकरांचं मत : तरुण-तरुणींना हे माहित नाही की, तंबाखू सेवनाने पुरुषाला तात्पुरतं किंवा कायमचं नपुसकत्व येतं, ही गोष्ट वादातीतपणे सिध्द झाली आहे. माझी पत्नी स्त्रिरोगतज्ज्ञ आहे. तिच्याकडे मूल न होणारं जोडप आलं की, पहिली सूचना अशी असते; ती म्हणजे, सर्वप्रकारचं तंबाखू सेवन कायमचं बंद करायचं. हीच गोष्ट मद्याबद्दल तरुणांना माहित नाही की, दारुचा पहिला पेला हातात घेतात, त्यापैकी १५ टक्केच लोक बरे होऊ शकतात, त्यामुळे युवकांनी ठरवलं पाहिजे, व्यसनाच्या आहारी जायचं की नाही, ते एका वाहिनीवरती बोलताना आपले प्रखर मत मांडले. डाॅ. दाभोलकर हे पेशाने डाॅक्टर असूनही त्यांनी प्रॅक्टिस सोडून समाजकार्याची वाट धरली. साता-यात त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरु केला, परंतु समाजकार्याची आवड असणारे डाॅ. दाभोलकर या व्यवसायात रमले नाहीत, त्यांनी सामाजिक चळवळ सुरु केली. दाभोलकरांचं स्पष्ट असं मत होतं की, व्यसनापासून अलिप्त राहिल्यास आपली स्वतःची आणि कुटुंबाची प्रगती शक्य आहे, अन्यथा नाही. व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेला मनुष्य उद्वस्त झाला आहे. तेव्हा आपली प्रगती साधायची असेल तर, व्यसन सोडायला हवे. व्यसनामुळे आपले मानसिक संतुलनही बिघडते, असेही ते नेहमी सांगत.
'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापना : सन १९८९ मध्ये अ.भा.अंनि.स पासून वेगळे होऊन दाभोलकरांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ची स्थापन केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून नरेंद्र दाभोलकरांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढींचं उच्चाटन करण्याण्यासाठी व्याख्यान व सभांच्या माध्यमातून लोकप्रबोधन केले. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकरांनी अनेक वर्षे कार्य केले होते. यासाठी ते सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजून सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांची फसवेगिरी दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रयोग व प्रात्यक्षिक दाखवून लोकांसमोर उघडकीला आणले होते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती दरवर्षी एका मान्यवरांना ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार देऊन गौरविते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे मासिक गेली अनेक वर्षे सांगलीतून प्रसिद्ध होत असते. ते महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे मासिक म्हणून आजही प्रसिद्ध आहे. याचे वर्गणीदार करण्याचे काम अंनिसचे कार्यकर्ते विनामोबदला करीत असतात. आयुष्यात कितीही अडथळे आले, तरी हार मानू नका; सर्वव्यापी सामाजिक कार्य : डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे सामाजिक कार्यासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांनी अंधश्रध्देच्या विरोधात उभारलेला लढा व त्यासाठी जनसामान्यांमध्ये केलेल्या जनजागृतीला तोड नाही. बाबा आढाव यांच्या 'एक गाव-एक पाणवठा' या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतरच्या काळात श्याम मानव यांनी स्थापन केलेल्या 'अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती'साठी कार्य सुरू केले. महाराष्ट्रामध्ये विविध पुरोगामी चळवळीतील पूर्णवेळ कार्यकर्त्यांना काही अल्प मानधन देता यावे म्हणून एक मोठा निधी उभा करण्यासाठी ‘सामाजिक कृतज्ञता निधी’ या संस्थेची स्थापना झाली. त्याच्या पहिल्याच अध्यक्षपदी डॉ. श्रीराम लागू, तर सचिवपदी डॉ. दाभोलकर होते. या संस्थेसाठी निधी उभारण्यासाठी डॉ. लागूंसह निळू फुले, सदाशिव अमरापूरकर, रीमा लागू, रोहिणी हट्टंगडी या कलाकरांनी विनामानधन ‘लग्नाची बेडी’ हे नाटक सर्व महाराष्ट्रभर केली. या नाटकाचा फायदा या निधीसाठी दिला. तरीही या निधीला अजून पैशाची गरज होती, म्हणून डॉ. दाभोलकरांनी शाळेतील विद्यार्थ्यांकडून निधी संकलन करण्याची कल्पना मांडली. या कार्यक्रमाला ‘एक उपवास कृतज्ञतेचा’ हे नाव दिले. विद्यार्थ्यांनी एक वेळ उपवास करून त्यातून वाचलेले ५ रुपये या निधीसाठी द्यावेत, अशी ही कल्पना होती.  यासाठी डॉ. लागूंना घेऊन दाभोलकरांनी सातारा जिल्ह्यातील ६०० मुख्याध्यापकांची बैठक बोलावून या कामासाठी मुख्याध्यापकांना राजी केले. डॉ. लागू या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी हे काम आनंदाने करण्याचे ठरविले आणि सातारा जिल्ह्यातून त्याकाळी चक्क २५ लाखांचा निधी जमा झाला.  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
माहिती स्रोत: बाळासाहेब मधाळे यांचा
सकाळमधील लेख
   संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

!! जागतिक छायाचित्रण दिन !! (१९ ऑगस्ट)

 


!! जागतिक छायाचित्रण दिन !!
   (१९ ऑगस्ट)



     आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून १८२ वर्षाआधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिन साजरा करतात.
काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले… या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.
         प्रकृतीने प्रत्येक प्राण्याला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे तो प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकतो आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारासोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळेसोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थायीरुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.
        फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो, आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे,हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय कॅमेरामध्ये ऑडीओ, व्हिडीओची सोय आहे काय, फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्ये कशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा.
             कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी (कॅमेराचा सेंसर) त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटीची आहे, त्याचबरोबर झूम किती आहे, हे पाहणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे कॅमेरे वापरण्यास सोपे असतात.
फोटो काढताना घ्यावयाची काळजी
      कॅमेरा हातात धरला व बटन दाबले की ,फोटो आपोआपच येतो पण त्यासाठी आपण योग्य शटर स्पीड, व्हाईट बॅलन्स, संपूर्ण विषयाचा किंवा त्या वस्तूवरती पडलेली लाईट, त्याचबरोबर फोटोच्या चौकटीमध्ये योग्य पद्धतीने बसवणे व त्याचा फोटो काढावयाचे आहे.त्यामधून तो विषय समजला पाहिजे. फोटोग्राफीची संपूर्ण माहिती एखाद्याला आहे पण त्याला एखादा विषय मांडता आला नाही तर तो चांगला फोटो घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याकडे चांगला कॅमेरा आहे, चांगली लेन्स आहे. पण त्याला फोटो चांगला काढता येतो असे नाही. त्यासाठी फोटोग्राफीची संपूर्ण तांत्रिक माहिती व त्याचबरोबर कल्पनाशक्तीची सर्वात मोठी गरज आहे. (क्रिएशन) चांगल्याप्रकारे विषय मांडता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने चांगल्या फोटोग्राफरचे भरपूर काम पाहिले म्हणजे त्याप्रकारे आपली कल्पनाशक्तीही तयार होते.
फोटोग्राफर पुढील आव्हाने
       व्यावसायिक फोटोग्राफरने आपल्या काढलेल्या फोटोंचे फावल्या वेळेत बारकाईने निरीक्षण केले पाहिजे काही फोटोग्राफर चांगले फोटो काढतात पण त्याचे निरीक्षण करत नाहीत. एखादा लग्नाचा अल्बम झाला की, ती फाईल एखाद्या महिन्याच्या तारखेमध्ये सेव्ह केली की, त्याकडे कधीच पाहात नाहीत. कधी कधी काम नसते त्यावेळी जुने फोटो पहायला पाहीजेत. आपल्याला एखादी फ्रेम आवडली की ती वेळीच सेव्ह करावयाची. त्याचबरोबर फोटोग्राफी स्पर्धेमध्ये आपले फोटो पाठवणे गरजेचे आहे. काही फोटोग्राफर असे समजतात की, आपण स्पर्धेत बसणार नाही. पण त्या फोटोची ताकद त्या फोटोग्राफरला नसते. तो स्पर्धेत दिल्यानंतर चांगला विषय किंवा अनेक गोष्टी कळतात. तो फोटो ते सिद्ध करतो. हौशी फोटोग्राफर किंवा व्यावसायिक फोटोग्राफर यांनी कामामध्ये सातत्य व कल्पकता दाखविली तर कोणालाही जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो, यात शंका नाही. जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. आपण माहिती पुस्तिका व कॅमेरा हातात घ्यावा त्याप्रमाणे रोज एक तास त्यासाठी काढला की १५ दिवसामध्ये कॅमेरा संपूर्ण समजतो. अशा या जागतिक छायाचित्रणदिनी त्या सर्व छायाचित्रकारांना  खूप खूप शुभेच्छा…
    संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन !! (१८ ऑगस्ट )

 

!! नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन !!
  (१८ ऑगस्ट )



नेताजी सुभाषचंद्र बोस जन्म:२३ जानेवारी १८९७ मृत्यू: १८ ऑगस्ट  १९४५
     भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अभूतपूर्व प्रयत्न केले. भारताच्या पूर्व सीमेवर हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युध्द करण्यास उभे राहिले हे सारे सैनिक आझाद हिंद सेनेचे होते. त्यांचे नेते होते नेताजी सुभाषचंद्र बोस.
     सुभाषचंद्र बोस हे राष्ट्रीय सभेचे महत्वपूर्ण नेते होते. त्यांनी दोनवेळा राष्ट्रीय सभेचे अध्यक्षस्थान भूषवले होते. इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतले असल्याचा फायदा घेऊन भारतात आंदोलन तीव्र करावे आणि त्यासाठी इंग्रजांच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे सुभाषबाबुंचे मत होते. परंतु याबाबत राष्ट्रीय सभेच्या ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे मतभेद झाले परिणामी सुभाषबाबूंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपले विचार जनतेपुढे मांडण्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला.
       सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणातून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन भारतीयांना करु लागले त्यामुळे सरकारने त्यांना बंदिवासात टाकले. तुरुंगात सुभाषबाबूंनी प्राणांतिक उपोषण सुरू केल्याने शासनाने त्यांना मुक्त करुन त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवले. तेथून वेषांतर करुन सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली.१९४१ च्या एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. जर्मनीच्या बर्लिन रेडिओ केंद्रांवरून भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्यात भाग घेण्याचे आवाहन केले. याच काळात रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचे निमंत्रण दिले.
" तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दूंगा!"
    असा नारा देत भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजींना हृदयापासून सलाम.  
    संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

रविवार, १५ ऑगस्ट, २०२१

!! समाजसेविका डॉ.राणी बंग जन्मदिन !! (१७ ऑगस्ट

 


!! समाजसेविका डॉ.राणी बंग  

जन्मदिन !! (१७ ऑगस्ट





डॉ.राणी बंग ह्या डॉ.अभय बंग यांच्या सुविद्य पत्नी. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव डॉ. राणी चारी आहे. त्या मूळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील असून, त्यांचे वडील प्रसिद्ध डॉक्‍टर होते.
            डॉ. राणी यांनी एम.बी.बी.एस. उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचे पती प्रख्यात समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्याशी विवाहबद्ध होऊन समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. त्यांनी स्त्रीरोगशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापिठातून ‘मास्टर्स इन पब्लिक हेल्थ’ या विषयावरची पदवी त्यांनी १९८४ साली मिळवली.
               त्यांनी, आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याविषयक समस्या व त्यांच्या भावविश्‍वाचा वेध घेणारी "कानोसा" व "गोईण" ही दोन पुस्तके लिहिली आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारासह "महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
                        'गोईण' म्हणजे मैत्रीण. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींशी गप्पागोष्टी करतांना जंगलातील झाडे, त्यांचे विविध उपयोग - खाद्यपदार्थ, औषधी, सरपण, कुंपण वगैरेंबाबतची उपयुक्त व मनोरंजक माहिती मिळत गेली, त्यांनी ही संकलित केलेली आहे. कानोसाबद्द्ल थोडीसी माहिती :--
भारतीय समाजात स्त्री-पुरुष संबंध, म्हणजे जीवन-प्रजनन या अतिशय नाजूक, संवेदनक्षम व गुप्त गोष्टी मानण्यात येतात. परंतु डॉ.राणी बंग यांनी केलेल्या या अध्ययनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील  खेड्यांमधील स्त्रिया, त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील अनेक खाजगी, गुप्त गोष्टी अगदी मनमोकळेपणाने त्यांचेजवळ बोलल्या आहेत.
         डॉ.  राणी बंग आणि डॉ.अभय बंग यांना  मिळालेले पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत त्यातील काही--
१)टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
२)२००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
३)२०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
   डॉ.राणी बंग यांच्या कार्याला सलाम.
     संकलक -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

!! आर.आर.पाटील जन्मदिन !! (१६ ऑगस्ट )

 

!! आर.आर.पाटील जन्मदिन !!
(१६ ऑगस्ट )



     रावसाहेब रामराव पाटील ( आर .आर.पाटील)उर्फ आबा यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५७ रोजी झाला होता. महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे आबा आणि स्वछ प्रतिमेचे राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या आर.आर.पाटील यांना आदरांजली.
     १९९१ ते २०१५ या कालावधीत तासगाव मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून ते राहिले होते.
महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही भूषवलेल्या आबांनी
आपल्या शांत व संयमी व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते.
     आबांचे वडील गावचे सरपंच असूनही
त्यांची आर्थिक परिस्थिती अडचणीची होती त्यामुळे त्यांनी कमवा आणि शिका योजनेअंतर्गत काम करत करत शिक्षण पूर्ण केले. सांगलीच्या शांतिनिकेतन कॉलेजमधून त्यांनी बी. ए. आणि एल. एल. बी.च्या पदव्या घेतल्या.
    सुरुवातीला सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य असलेले आर. आर.पाटील तासगाव मतदारसंघातून १९९१ ते २०१५
या कालावधीत विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी पक्षाच्या अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्याही सांभाळल्या.गृहमंत्री म्हणून नक्षलवादाचा सामना करण्यासाठी त्यांनी उचललेली पावले महत्वपूर्ण ठरली. आपल्या स्वच्छ प्रतिमेमुळे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे
आबा आधुनिक संत बनले.
     २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावर आबांनी केलेल्या एका विधानामुळे चांगलाच वाद उफाळला होता यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता या वादविवादाच्या पलीकडे जाऊन आर. आर. आबा हे महाराष्ट्राच्या राजकारणातले स्वछ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात.१६ फेब्रुवारी २०१५ रोजी लीलावती रुग्णालयात  कर्करोगाने त्यांचे निधन झाले.
    आर. आर.आबांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

एक दौड देशके नाम,Indian Running Day, स्वातंत्र्यदिनानिमित्त मॅरेथॉन !! (१५ ऑगस्ट )

 

!!एक दौड देशके नाम,Indian Running Day, स्वातंत्र्यदिनानिमित्त मॅरेथॉन !!
   (१५ ऑगस्ट )





    ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अहमदाबाद येथील Cyruns Sports & Wellness क्लबने  Virtual Run  चे आयोजन केले होते.  मी या स्पर्धेत  हाफ मॅरेथॉनमध्ये (२१ कि. मी.) मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेसाठी वर्णे हायस्कूल- अपशिंगे (मि .)-बोरगाव- नागठाणे-नागठाणे पेट्रोल पंप-सर्व्हिस रोडने परत बोरगाव- बोरजाई मंदिरमार्गे-अपशिंगे (मि.)-परत वर्णे असा मार्ग निवडला होता. मी हे अंतर   १.५९.५६ (एक तास एकोणसाठ मिनिटे छप्पन सेकंद )  एवढ्या वेळात पूर्ण केले. मी एकटाच धावलो. रुटसपोर्ट दादासाहेब सुतार यांनी दिला.
      यावेळी भारताचा राष्ट्रीय ध्वज "तिरंगा" घेऊन धावायचे  होते.या स्पर्धेची थीम "वसुधैवकुटुंबकम" अशी होती. संपूर्ण विश्वाचे आरोग्य चांगले राहावे यासाठी प्रतिज्ञादेखील म्हणायची होती. ती प्रतिज्ञा खालीलप्रमाणे होती.
   I  Rajendra Vitthal Pawar taking this pledge on Indian Running Day.I pledge to build a diseasefree body & contribute to my wellbeing & supporting my family,my society,my country and to the world.I pledge to work daily to celebrate health and promote fitness.Jai Hind
        कोविड-१९ मुळे आरोग्याचे महत्व प्रत्येकाला समजले आहे. खऱ्याअर्थाने(Health is Wealth) आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे ती जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे  गरजेचे आहे..एखादा आजार जगात कुठेही आला तरी त्याचा आपणास त्रास होतो हे कोरोनाने दाखवून दिले आहे म्हणून आपण विश्व कल्याणाची प्रार्थना करुया.सारेजण निरोगी राहण्यासाठी प्रयत्नशील राहूया.
        राजेंद्र पवार
   ९८५०७८११७८
   

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

!! स्वातंत्र्य दिन !! (१५ ऑगस्ट )

 


!! स्वातंत्र्य दिन !! (१५ ऑगस्ट )



          स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
         भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.
             इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाव आंदोलन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावर फारकाळ राज्य करता येणार नाही तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.
       भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.
    स्वातंत्र्यदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिन  सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.  त्याचा परिणाम सर्व देशावर झालेला आहे. आजचा स्वातंत्र्य दिन तर अगदी मोजक्या व्यक्तींनी एकत्र येऊन साजरा करावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे. आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या, तसेच शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुया, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
      भारत माता की जय ! वंदे मातरम !
  संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!! ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन !! (१४ ऑगस्ट )

 


!!  ऑलिम्पिक विजेते कुस्तीगीर खाशाबा जाधव स्मृतिदिन !! (१४ ऑगस्ट )



   खाशाबा जाधव जन्म : गोळेश्वर-कराड १५ जानेवारी १९२६ मृत्यू : १४ ऑगस्ट १९८४ हे ऑलिंपिक पदक विजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. सन १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते.
         खाशाबा जाधवांनी  १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
खाशाबा जाधव यांचा जन्म १५ जानेवारी १९२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. कुस्तीच्या खेळात त्यांची ख्याती होती. ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू होते. सन १९०० मध्ये नॉर्मन प्रीतचंद यांनी वैयक्तिक खेळात दोन सिल्व्हर पदंके जिंकली होती. त्यानंतर ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारे खाशाबा जाधव हे एकमेव खेळाडू होते.
         खाशाबा हा ख्यातनाम पैलवान दादासाहेब जाधव यांचा हा सर्वात लहान म्हणजे ५ क्रमांकाचा मुलगा होता. याने ८ वर्षाचा असताना त्या भागात प्रसिद्ध असणाऱ्या चॅम्पियनला २ मिनिटांत लोळवले होते. त्याने सन १९४०-१९४७ दरम्यान कराड येथील टिळक हायस्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण करून उर्वरित जीवन कुस्तीकडेच वळविले आणि त्या खेळातच मन रमविले.
       त्याचे वडील कुस्ती खेळाचे वस्ताद होते. ते त्याला त्याचे वयाचे ५ व्या वर्षापासून मार्गदर्शन करीत होते. महाविद्यालयात त्याला बाबुराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी मार्गदर्शन करीत होते. शिक्षणात चांगली ग्रेड मिळवण्यासाठी त्याची कुस्ती त्याला कधीही आडवी आली नाही. खाशाबाने भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला होता. त्याने ऑलिंपिक वेळी स्वातंत्र्याचा तिरंगी झेंडा फडकविण्याचाही निश्चय केला होता.
     ऑलिंपिक कार्यकारी मंडळातील सुंदोपसुंदीमुळे पुढील १९५२च्या ऑलिंपिकसाठी तुमची निवड होऊ शकत नाही असे त्याना सांगण्यात आले. त्यांचे म्हणण्यानुसार मद्रास येथे राष्ट्रीय निवड प्रक्रियेत त्यांना मुद्दाम एक मार्क कमी दिला आणि त्यामुळे ऑलिंपिकसाठी निवड झाली नाही. या वेळी ते शांत बसले नाहीत तर याचा खुलासा घेणेसाठी त्यांनी पतियाळाचे महाराजे यांचेकडे न्याय मिळण्यासाठी विनंती केली. पतियाळाच्या महाराजांना खेळाची आवड होती. त्यांनी खाशाबांचा मुद्दा उचलून धरला आणि त्याच्या विरोधी कुस्तीगीराशी त्यांनी पुन्हा त्याची ट्रायल घेतली. या कुस्तीत खाशाबांनी त्या कुस्तीगीराला चितपट केले आणि त्यांची ऑलिंपिकसाठी निवड झाली. हेलसिंकीला जायचे म्हणजे पैसे हवेत ! कुटुंबाची पळापळ सुरू झाली. गावात लोकवर्गणी जमा झाली. खाशाबा कोल्हापूरचे राजाराम महाविद्यालयात शिकत होता. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य बॅरिष्टर बाळासाहेब खर्डेकर यांनी आपला विद्यार्थी ऑलिंपिकला जातोय या आनंदाने स्वतःचे घर कोल्हापूर येथील मराठा बॅंकेकडे गहाण ठेऊन त्याला रु.७०००/- दिले. कुस्ती खेळताना  त्यांच्याकडून दोन चुका झाल्या, त्यामुळे त्यांचे गोल्ड मेडल हुकले ते जपानच्या ईशी शोबची याने जिंकले. त्या गटात विविध देशांचे २४ स्पर्धक होते. त्यांनी सेमी फायनलपर्यंतच्या मेक्सिको, जर्मनी, कॅनडा यांच्या बरोबरच्या कुस्त्या जिंकल्या. शेवटी खाशाबांना ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले, पण तेच वैयक्तिक पातळीवरील स्वतंत्र भारत देशाला मिळालेले पहिले ऑलिंपिक पदक ठरले.
     खाशाबा जाधवांचे गावी जल्लोषी स्वागत:  कराड तालुक्यातील गोळेश्वर हे लहानसे गाव. कराड रेल्वे स्थानकावर आगमन होणाऱ्या खाशाबाचे स्वागतासाठी त्या परिसरातील सजविलेल्या १५१ बैलगाड्या, हजारो लोक, ढोल तासे, लेझीम पताका, फटाके, घेऊन हजर होते. गाव ते महादेव मंदिर परिसर पूर्ण व्यापला होता. हे अंतर पायी चालावयाचे झाले तरी १५ मिनिटांचे आहे पण हेच अंतर पार करण्यासाठी विनातक्रार सात तास लागले. हा प्रकार मी पूर्वीही आणि त्यानंतरही कधी पाहिला नाही असे खाशाबांचे बंधू संपतराव जाधव म्हणाले. एका कोपऱ्यात कुठेतरी लपलेले हे गोळेश्वर गाव भारताचे नकाशावर ठळकपणे दिसू लागले. भारत देशाला ऑलिंपिकमध्ये पदक मिळवून देणाऱ्या या गोळेश्वर गावाची जगभर प्रसिद्धी झाली.
भारताचे हॉकी टीमनेही गोल्ड मेडल पटकावले होते पण खाशाबाचे विशेष कौतुक झाले. कोल्हापूर मधील सर्व तालीम आखाड्यानी तसेच महाविद्यालयांनी भरभरून कौतुक केले. खाशाबाने कोल्हापूरमध्ये स्वतः कुस्ती फडाचे आयोजन केले. त्यात स्वतःही भाग घेतला आणि अनेक कुस्त्या जिंकल्या. त्यात जी कमाई झाली ती त्याचेवर स्वतःचे घर गहाण ठेवून मदत करणारे आणि वरदहस्त ठेवणारे महाविद्यालयाचे प्राचार्य यांना न विसरता त्या मिळकतीतून त्यांचे घर त्यांना परत मिळण्यासाठी पैसे दिले.
     सन १९५५मध्ये खाशाबा जाधव हे महाराष्ट्र पोलीस दलात ते सब-इन्स्पेक्टर या हुद्दयावर भरती झाले. तेथे आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी अनेक कुस्त्या जिंकल्या. त्याचवेळी ते राष्ट्रीय स्तरावर स्पोर्ट्‌स मार्गदर्शक म्हणून काम करू लागले. हे करत असतानाच त्यांनी पोलीस खात्यात २७ वर्षे नोकरी केली आणि असिस्टंट पोलीस कमिशनर या हुद्द्यावरून निवृत्त झाले. पेन्शनसाठी त्यांना खूप झगडावे लागले. बरीच वर्षे स्पोर्ट्‌स फेडरेशनने देखील त्यांचेकडे दुर्लक्ष केले त्यामुळे त्यांचे उरलेले जीवन गरिबीत गेले. खाशाबा जाधव यांचा सन १९८४ मध्ये एका रोड अपघातात दुर्दैवी अंत झाला.
                 २००१ साली मरणोत्तर अर्जुन अवॉर्ड देण्यात आले तर   सन २०१० साली दिल्ली येथील इंदिरा गांधी कॉम्प्लेक्समधील कुस्ती विभागाला  खाशाबा जाधव यांचे नाव दिले. खाशाबा
जाधव यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

नागपंचमी !! (१३ ऑगस्ट )

 


!!नागपंचमी !! (१३ ऑगस्ट )




          श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, पुरणपोळीचा  नैवेद्य दाखवला जातो.
         'भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दु:ख आणि संकट यातून तारला जावो', हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. या विषयीची कथा खालीलप्रमाणे...
           नागपंचमीसाठी वेदकालापासून अनेक प्रथा आहेत. त्यापेकी एक कथा..सत्येश्वरी नावाची एक  देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. सत्येश्वरीला  तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते..
        तसेच दुसरी कथा कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले.. तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते. तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही. तसेच नववधू माहेरी येतात. झिम्मा, फुगड्या, झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात. नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात.
        नागपंचमी सणाच्या निमित्ताने समस्त महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा.
     संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

!! आंतरराष्ट्रीय युवा दिन !!(१२ ऑगस्ट )

 

!! आंतरराष्ट्रीय युवा दिन !!(१२ ऑगस्ट )



            आंतरराष्ट्रीय स्तरावर १२ ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. यावर्षी ‘शांती स्थापनेत युवकांचा सहभाग’ (युथ बिल्डींग पीस) हे घोषवाक्य निश्चित करण्यात आले आहे. सृजनशील अशा युवा शक्तीच्या माध्यमातून जगभरात शांततेची स्थापना व्हावी हा यामागचा विचार आहे.
संयुक्त राष्ट्रांनी १९८५  मध्ये पहिले आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरे केले. या घटनेच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त १९९५ मध्ये जगातील युवावर्गाच्या स्थितीत अनुकुल बदल घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड प्रोग्राम ऑफ ॲक्शन फॉर युथ’ स्वीकारण्यात येऊन त्या माध्यमातून मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली.
              या कार्यक्रमाच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्षण, रोजगार, गरिबी, आरोग्य, पर्यावरण, सहभाग, जागतिकीकरण, युवक आणि संघर्ष, एचआयव्ही एड्स आदी १५ क्षेत्रांची निवड प्राध्यान्याने केली. युवकांना मिळणाऱ्या संधींची संख्या वाढविणे, त्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्या माध्यमातून समाजासाठी युवकांचे योगदान वाढविणे यादिशेने या कार्यक्रमाद्वारे चांगले प्रयत्न झाले आहेत.
लिस्बन येथे ८ ते १२ ऑगस्ट १९९८ दरम्यान पार पडलेल्या युवकांशी निगडीत मंत्र्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्याची शिफारस करण्यात आली आणि त्यावर १७ डिसेंबर १९९९ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने शिक्कामोर्तब केले. तेव्हापासून हा दिवस युवा दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो.
         सुरक्षा परिषदेने आपल्या २०१५ आणि २०१६ च्या ठरावात शांतीस्थापनेच्या प्रयत्नांना यश येण्यासाठी युवकांची भूमीका महत्त्वाची असल्याचे नमूद करण्यात आले आहे. सामाजिक न्याय आणि शांतीस्थापनेच्या अशाच प्रयत्नांना यावर्षीच्या युवा दिनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले आहे.
           युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. युवकांना नागरिकांचे अधिकार, सामाजिक न्याय आणि विश्वशांतीच्या महत्त्वाबाबत जागरूक केले तर जगात विविध पातळ्यांवर असणारे संघर्ष, वाद कमी होऊ शकतील. अशा अनुकुल बदलासाठी युवावर्ग निश्चितपणे पुढे येईल. जनसामान्यांच्या प्रगतीसाठी जागतिक शांततेचे महत्त्व लक्षात घेता शांतता प्रस्थापित करण्यात युवकांची भूमिका महत्त्वाचे ठरणार आहे.
               आजचा युवक ज्ञान आणि विज्ञानाच्या विश्वात वावरणारा आहे. मानवी मुल्ये आणि मानवी विकासाबाबत त्याला चांगली जाण आहे. विज्ञान - तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील अनेक समस्यांची उत्तरे शोधण्याची क्षमता त्याच्यात आहे. या क्षमतेचा उपयोग तो जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी निश्चितपणे करू शकतो. जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने या भूमिकेबाबत चर्चा होणे आणि त्यादिशेने युवकांचा सहभाग वाढणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
लेखक: डॉ.किरण मोघे
माहिती स्रोत: महान्युज
संकलक: राजेंद्र पवार
  ९८५०७८११७८

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

!!सी.डी. देशमुख भारतीय वंशाचे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर बनले!! (११ ऑगस्ट )

 


!!सी.डी. देशमुख भारतीय वंशाचे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर बनले!!
  (११ ऑगस्ट )



चिंतामण द्वारकानाथ देशमुख जन्म: १४ जानेवारी १८९६  मृत्यू: २ ऑक्टोबर १९८२ हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
          सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर ( १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते. १ जानेवारी १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९५० ते  १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.
     सी.डी.देशमुख यांच्यासारखी तत्वनिष्ठ माणसं आता दुर्मिळ झाली आहेत. त्यांच्या कार्याला सलाम.
    राजेंद्र पवार
   ९८५०७८११७८


सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

!! संगीतकार विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन !!(१० ऑगस्ट )

 


!! संगीतकार विष्णू नारायण भातखंडे जन्मदिन !!(१० ऑगस्ट )



             विष्णू नारायण भातखंडे जन्म -१०ऑगस्ट १८६० मृत्यू - १९ सप्टेंबर १९३६ हे हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली.
            विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म१० ऑगस्ट १८६० रोजी जन्माष्टमी च्या दिवशी मुंबई येथील वाळकेश्वर भागात झाला. लहानपणापासूनच त्यांचे संगीतकलेवर विशेष प्रेम होते. वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी ते उत्तम बासरी वाजवायचे. मराठी शाळेतील व हायस्कूलचे शिक्षण झाल्यानंतर भातखंडे एल्फिन्स्टन कॉलेजमधून बी.ए. झाले. याच काळात त्यांनी गोपालगिरी यांच्याकडून सतारीचे धडे आत्मसात केले.
             इ.स. १८८५ साली ते कायद्याचे पदवीधर झाले व इ.स. १८८७ सालापासून वकिली करू लागले. पुढे काही काळ कराचीच्या न्यायालयात त्यांनी वकिली केली. भातखंडे यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांत वल्लभदास नावाच्या सतारवादकाकडून सतार शिकायला आरंभ केला. पुढे रावजीबा नावाच्या ध्रुपदगायकाकडून ते गायकी शिकू लागले. गायकी व हिंदुस्तानी संगीताच्या इतर पैलूंबाबत त्यांना बेलबागकर, अली हुसेन खाँ, विलायत हुसेन खाँ यांचेही मार्गदर्शन लाभले. पत्नी व मुलीच्या निधनानंतर भातखंडे यांनी वकिली सोडून पूर्णपणे संगीताभ्यासाला वाहून घेतले. त्यांनी भरताच्या नाट्यशास्त्राचा आणि संगीत रत्नाकर या प्राचीन भारतीय संगीतविषयक ग्रंथांचा अभ्यास चालवला होताच; पण आता त्यांनी हिंदुस्तानी संगीतातील विस्कळीत वैविध्याला पद्धतशीर सैद्धांतिक चौकटीत बसवण्याकरता प्रयत्न केले. त्यातूनच त्यांनी राग, रागिण्या आणि पुत्ररागांमध्ये वर्गीकरण करण्याच्या जुन्या पद्धतीऐवजी 'थाट पद्धत' नावाची नवी वर्गीकरण पद्धत हिंदुस्तानी संगीतामध्ये आणली.
            उतारवयात भातखंडे पक्षाघात व मांडीच्या अस्थिभंगामुळे अंथरुणास खिळून होते. १९ सप्टेंबर १९३६ रोजी, गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचे निधन झाले.
संगीतकार विष्णू नारायण भातखंडे यांना विनम्र अभिवादन.
      संकलक :राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

ऑगस्ट क्रांती दिन !! (९ ऑगस्ट )

 


!! ऑगस्ट क्रांती दिन !! (९ ऑगस्ट )




           १८५७ नंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम
          देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२रोजी भारताला स्वतंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला 'भारत छोडो' असे नाव देण्यात आले होते. 'करो या मरो' अशी या आंदोलनाची घोषणा होती. 
              ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ९ ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे. भारतीयांना पुकारलेला १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता.
                 दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी  इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे ८ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर इंग्रजांनी गांधींजींना पुण्यातील आगा खाँ पॅलेसमध्ये कैद करुन ठेवले.  तसेच स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी, तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे असे आवाहन देशवासियांना केले होते. तरीही देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.  
संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

!! चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट )

 

!! चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट )




              चले जाव चळवळ  ही ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
          १९४२ च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप धारण केले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला.अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की,त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला.    या राष्ट्रव्यापी आंदोलनाला.  "ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.         
संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...