vari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
vari लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १० जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा १० जुलै आषाढी एकादशी )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस विसावा  १० जुलै आषाढी एकादशी )

            आज आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला वैष्णवांचा मेळा भरला होता. चंद्रभागा नदीवर स्नानाची झुंबड उडाली होती. स्नान करताना एकमेकांच्या अंगावर पाणी उडवणे, एकमेकांना स्नान घालत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. आज रांगेत उभे राहून दर्शन घेणे म्हणजे एक दिव्यच आहे. आम्हीही कळसाचे दर्शन घेतले. पंढरपूर येथे इस्कानचे भव्य मंदिर आहे. पांडुरंगाच्या भेटीसाठी आलेला माणूस इस्कॉनला भेट दिल्याशिवाय परत फिरत नाही अशी सद्यस्थिती आहे. इस्कॉन भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करते. इस्कॉन मंदिराजवळ नदीवर सुंदर घाट बांधला आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते. आजच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  यांच्या शुभहस्ते इस्कॉन मंदिर परिसरात भूवैकुंठ भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला. या स्थळाला आपण एकदा तरी भेट द्यायला हवी असे वाटते.

          आज रात्री पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. त्यांनी कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे....

  नामाचे चिंतन प्रगट पसारा!

 असाल ते करा जेथें तेथें !!१ !!

 सोडविल माझा स्वामी नीस्चेयेशी !

प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही !! धृ !!

 गुणदोष नाही पाहत कीर्तनी!

प्रेमे चक्रपाणी वश्य होय !!३ !!

 तुका म्हणे कडु वाटतो प्रपंच!

 रोकडे रोमांच कंठ दाटे !!४ !!

              निरुपण करताना महाराज म्हणाले की, आपण जेथे कोठे असु तेथे नामाचे चिंतन केले पाहिजे. मग ते ऑफिस असो, कंपनी असो, शेतात असो, घर कामात असो, तेथे आपण नामस्मरण करायला हवे. नामामुळे आपला तर फायदा होणार आहेच. पण ऐकणाराचेही भले होते. हे नामच आपल्या समस्या सोडवित असते. येथे त्यांनी अनेक उदाहरणे दिली.









            तुकाराम महाराज म्हणतात ,आम्ही मालक नसून दास आहोत. दासांनी केलेली प्रतिज्ञा परमेश्वर कधीच खाली पडू देत नाही. प्रपंचात कितीही अडचणी आल्या, कटु अनुभव तरी त्यापासून आपण दूर जात नाही हे खरं आहे. थोडक्यात काय आपण आपले काम करत असताना परमेश्वराचे नामस्मरण करावे. त्याला स्थळ काळाचे कोणतेही बंधन नाही.त्याला कोठे जाण्याची गरज नाही.

           आपण आपलं काम संत सावता माळी सारखे  देवाचे नामस्मरण करत करावे त्यामध्ये आपले तसेच इतरांचेही  हित असते. यामध्ये आपोआपच सत्संग लाभतो तोच आपणास प्रगतीपथाकडे नेहतो असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

शनिवार, ९ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!  (दिवस एकोणिसावा ९ जुलै )

            आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान अडीच वाजता वाखरीहून झाले. प्रत्यक्ष प्रस्थान सुरु होण्यापूर्वीच वरुण राजाने वारकऱ्यांवर जलाभिषेक सुरु केला, तो काही थांबलाच नाही. तसं पाहिलं तर काल दुपारपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक वारकरी ओलाचिंब झाला होता. अशाही परिस्थितीत वारकरी खेळाचा आनंद लुटत होते. बऱ्याचशा पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, चांगावटेश्वर,संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर असा पालख्यांचा क्रम असतो. रात्री आम्ही पंढरपूरमध्ये मुक्कामाला होतो. आज पुन्हा वाखरीला जाताना सर्वच संतांच्या पालख्या पाहता आल्या, दर्शन घेता आले.

            वाखरी ही पंढरपूरची वेस आहे. या वेशीवर ज्ञानेश्वर आले असताना प्रत्यक्ष पांडुरंग त्यांच्यासाठी रथ पाठवतात. हा रथ वाखरीजवळ आल्यानंतर ज्ञानेश्वर पांडुरंगाच्या रथात बसतात. याठिकाणी देवच भक्ताच्या भेटीसाठी जातात. येथे देव तोचि भक्त, भक्त तोचि देव असे  साक्षात दिसून येते. येथे कोणीही लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळेजण सारखेच आहेत. (No leader, No follower, All equal )






           आज ज्ञानेश्वर शिंदे माऊलींच्यामुळे वारकरी शिक्षण संस्थेस भेट देण्याचा योग आला. मामासाहेब दांडेकर यांच्या स्मृती स्थळाला भेट द्यायची संधी मिळाली. पंढरपूर येथील वारकरी शिक्षण संस्थेत भोजन घेतले. वारकरी शिक्षण संस्थेची कार्यपद्धतीही जवळून पाहता आली.

           आज प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी बेभान झालेला होता. मृदंग आणि टाळाच्या तालावर नाचत होता. ध्येयाचा ध्यास लागला की कामाचा त्रास वाटत नाही त्याप्रमाणे सर्वच वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ लागली होती.  वारकऱ्यांना पांडुरंग भेटीची ओढ असते त्या भेटीसाठी होणाऱ्या त्रासाची तो पर्वा करत नाही. त्याचप्रमाणे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी आपणही अडचणीची तमा न बाळगता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत असे वाटते.

   राजेंद्र पवार

९८५०७८११७८

!!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

 !!वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस अठरावा ८ जुलै )

            आज भंडीशेगावहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे दुपारी एक वाजता वाखरीच्या दिशेने प्रस्थान झाले. सुरुवातीपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळायला सुरुवात झाली. मध्ये कधीतरी पावसाची उघडीप असायची. आज वाखरीपर्यंत दोन रिंगणे झाली. उभे रिंगण प्रथम झाले. महामार्गावर रिंगण झाल्यामुळे सगळ्यांनाच अधिक आनंद लुटता आला. रस्ता डांबरी असल्याने फुगड्या तसेच अन्य खेळ खेळण्याचा आनंद  वारकऱ्यांनी लुटला.  रिंगणात स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना प्रत्येक जनाच्या तोंडातून माऊली, माऊली असा जयघोष होत होता. दिंड्या हळूहळू पावसाच्या सरी झेलत पुढे मार्गक्रमण करत होत्या.

                थोड्याच अंतरावर वाखरी पालखी तळ आला. तो भाग बाजीरावाची विहीर म्हणून ओळखला जातो. येथे गोल रिंगण झाले. रिंगणाच्या ठिकाणी बऱ्यापैकी चिखलाचे साम्राज्य होते.तशाही परिस्थितीत रिंगणाचा लोकांनी आनंद लुटला. बऱ्याच लोकांचे कपडे चिखलाने माखले होते. अशा चिखलमय स्थितीत वारकऱ्यांनी अनेक खेळ खेळले. रिंगण म्हटलेकी परिसरातील लोकांची मोठी यात्राच असते. लोक खऱ्याअर्थाने यात्रेचा आनंद लुटत होते.









               रिंगणाजवळ बागल वस्तीवर थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. यावेळी ज्ञानेश्वर शिंदे माऊली, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष विजय कासुर्डेआणि उद्योजक गोरख चव्हाण यांची अध्यात्म, शिक्षण, समाजसेवा या विषयावर भरपूर चर्चा झाली. त्या चर्चेत मलाही भाग घेण्याची संधी मिळाली. कोणतीही संस्था नावारुपाला यायची असेल तर निरपेक्ष भावनेने काम करणारी टीम असायला हवी. वैष्णव चॅरिटेबलची निर्मिती सेवाभावातून  झाली आहे. या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय कासुर्डे आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतअसत. या वारीत आरोग्याविषयी कोणतीच काळजी घेतली जात नाही हे त्यांच्या लक्षात आले. आपणच यासाठी काही तरी केलं पाहिजे, यातूनच वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचा जन्म झाला. वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट गेली २९ वर्षे वारकऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवत आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव या तिन्हीही पालखी मार्गावर या ट्रस्टच्या माध्यमातून सेवा पुरवली जाते. याशिवाय आदिवासी भागासाठी वर्षभर काम चालूच असते. देहू संस्थानसाठीही प्रासंगिक सेवा पुरवली जाते. या संस्थेचा ८०ते ९० लाखापर्यंतचा टर्नओव्हर आहे. ही सर्व रक्कम तसेच औषधे देणगी स्वरुपात मिळवली जातात. या संस्थेने कोविडच्या काळात मोफत लसीकरणाचे काम केले आहे. सेवाभावी कार्य असेल तर समाज अशा संस्थांना भरभरुन सहकार्य करत असतो.

                आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या संस्थेशी संबधीत असतो. आपण त्या संस्थेत निरपेक्ष भावनेने, सेवाभावी वृत्तीने काम करावे, आपण संबधित असलेली संस्था नावारुपाला आणावी असे मला वाटते.

 राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

गुरुवार, ७ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा ७ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सतरावा  ७ जुलै )

            आज सकाळी साडेसहा वाजता  वेळापूरहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊली, माऊली असे म्हणत स्वागत करत होते. सकाळी नऊ वाजताच उघडेवाडी (ठाकूर बुवा) येथे पालखीचे आगमन झाले. याठिकाणी गोल रिंगण असते. या रिंगणाचे वैशिष्ट्य असेकी, येथे वारकरी मोठ्या प्रमाणात खेळ खेळत असतात. दिंड्या क्रमाक्रमाने सोडल्या जातात. येथे वारकरी मोठ्या प्रमाणावर धावताना दिसून आले, मीही रिंगणात धावण्याचा आनंद लुटला. महिला फुगड्या तसेच अन्य खेळ खेळताना दिसल्या. वारीचा आनंद लुटताना लोक दिसून आले.










             प्रथम प्रत्यक्ष रिंगणाची पाहणी केली जाते. इशारा मिळताच स्वार असलेला अश्व व माऊलींचा अश्व धावताना दिसले. रिंगणाच्या ठिकाणी मध्यभागी पालखीसाठी मंडप उभारला होता.रिंगण स्थळापासून साधारण चार किलोमीटर अंतरावर तोंडले-बोंडले जवळ संत तुकाराम व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकाचवेळी आल्या. आज दिवसभर अतिशय आल्हाददायक वातावरण होते. दुपारी पावसाची हलकी सर आल्याने वारकरीही आनंदित झाले. तोंडले गावाजवळ नंदाचा ओढा आहे. तेथे ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे  पाण्यात खेळत असत. सध्या याठिकाणी पूल झालेला आहे. येथे स्प्रिंकलरच्या साह्याने वारकऱ्यांना भिजवले जात होते.



                येथील विसाव्याच्या ठिकाणी परिसरातील लोक वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करतात. दुपारी पंढरपूर तालुक्यातील नांदुरे गावच्या अरुण भिंगारे यांनी तोंडले येथे भोजनाची व्यवस्था केली होती. तोंडले येथे प्रवेशद्वारावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा आहे. तोंडलेपासून संत तुकाराम, संत सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्या एकत्र आल्याने जणू काही भक्तीचा महासागरच रस्त्यावर उतरला होता. पिराची कुरोली येथे सोपानदेव व ज्ञानेश्वर माऊलींच्या पालख्यांची भेट होते हा सोहळा खूपच रमणीय असतो. आजचा मुक्काम भंडीशेगाव येथे ज्ञानेश यलमार यांचे घरी आहे. 

       पालखी सोहळ्यात वाहनांची संख्या प्रचंड असते. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस तसेच गृहरक्षक दल प्रयत्न करत असतात. कितीही प्रयत्न केले तरी मनुष्यबळ कमीच पडते. वाहतूक व्यवस्था सुरळीतपणे पार पडावी यासाठी पुणेस्थित असणारे पण मूळचे कठापूरचे नाथाजी केंजळे यांनी स्थापन केलेले वाहतूक मुक्ती दल पोलिसांना मदत करत असते. नाथाजी यांच्याबरोबर २० लोकांची टीम आहे. ते आळंदीपासून वाहतूक सुरक्षित होण्यासाठी कार्यरत आहेत.

      अनेक स्वयंसेवी संस्था हा पालखी सोहळा व्यवस्थित पार पडावा यासाठी आपापल्या परीने सहकार्य करीत असतात. आपणही आपल्या परिसरात होणारे सार्वजनिक कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी जे शक्य असेल ते

सहकार्य करावे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

बुधवार, ६ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस सोळावा ६ जुलै)

              आज सकाळी साडेसहा वाजता माळशिरसहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. जसजसी पालखी पुढे पुढे जात आहे तसतसा वारकऱ्यांचा प्रवाह मोठा बनत चालला आहे. आजही खुडूस या गावी गोल रिंगण झाले. दरम्यानच्या काळात पावसानेही हजेरी लावली. यावेळी वारकऱ्यांनी चिखलाचाही आनंद लुटला. हरिनामात दंग झाल्यानंतर कपड्याकडेही पाहिले जात नाही याचा प्रत्यय आज आला.  रिंगणानंतर आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये विश्रांती घेत होतो. त्यावेळी मूळच्या जर्मन असणाऱ्याआणि आता भारतीय  झालेल्या अर्पणा घोष यांची भेट झाली. त्या रथामागे ३० क्रमांकाच्या दिंडीत चालत आहेत. पाश्चिमात्य असूनदेखील भारतीय संस्कृतीची ओढ त्यांना लागली आहे. पांडुरंगाच्या ओढीने वारीतला सगळा त्रास आनंदाने सहन करत आहेत.

             आज दुपारचा विसावा विझोरी येथे होता.आम्हाला या वारीत वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे वारंवार सहकार्य झाले आहे. किंबहुना त्यांच्यामुळेच आमची वारी सुकर होत आहे.विजय कासुर्डे यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. आजचा मुक्काम वेळापूर येथे आहे.  





             वेळापूर गाव जवळ येताच तीव्र उतार आहे. येथे येताच संत तुकाराम महाराजांना पंढरपूर येथील मंदिराचे शिखर दिसले. पांडुरंगाला भेट घेण्यासाठी ते धावत सुटले. वेळापूर येथे एक भारुडाचा कार्यक्रम होतो. हा मान शेडगे दिंडीला आहे. भारुडाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन होते. उदाहरणादाखल एक भारुड देत आहे.

    बया बया बया!

    काय झालं बया?

    दादला नको ग बाई

    मला नवरा नको ग बाई!

    मोडकच घर, तुटकेचं छप्पर

    पन रहायला जागा नाही

   मला दादला नको ग बाई!

   फाटकेच लुगडं,तुटकीच चोळी

   पण शिवायला दोराच नाही

    मला दादला नको ग बाई!

     अशी अनेक भारुडे आपण ऐकलीत.

  वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे.

           आज पंढरपूरमधील सिंहगड कॉलेजच्या  कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सेकंड इअरला असणाऱ्या अंजली बाबर, आकांक्षा मिरगणे,राशेश्वरी मेनकुदळे, रुचिता फासे या विद्यार्थ्यांनी भेटल्या. त्या प्लॅस्टिकचा वापर वारकऱ्यांनी टाळावा यासाठी प्रबोधन करत होत्या. प्लॅस्टिक पत्रावळी वापरु नये, ग्लास वापरु नये. प्लॅस्टिक कॅन्सरला निमंत्रण देते. प्लॅस्टिक कुजत नाही. आपण झाडांच्या पानांची पत्रावळी वापरावी. प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम त्या मुलींनी सहज सांगितले. आजही बऱ्याच ठिकाणी प्लॅस्टिकचा वापर होताना दिसतो.

           कोणतीही नवीन गोष्ट समाजात रुजवायची असेल तर त्यासाठी सक्षम पर्याय द्यावा लागतो. उदाहरण द्यायचे झाले तर वृक्षतोंडीस पर्याय म्हणून गॅस वापराचे देता येईल. ५० मायक्रॉंनच्या आतील प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळला पाहिजे. आपणही प्लॅस्टिकचा वापर पूर्णपणे टाळूया. प्लॅस्टिकचा पुनर्वापर करुया.जनतेचे आरोग्य अबाधित राहील याची काळजी घेऊया.

     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

मंगळवार, ५ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पंधरावा ५ जुलै )

           आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे नातेपुतेहून माळशिरसच्या दिशेने प्रस्थान झाले. पालखीच्या मार्गावर सर्वच ठिकाणी  वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था होते.अनेक ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल होते. सकाळी रस्त्यावर बऱ्यापैकी चिखलमय वातावरण होते. आज पहिला विसावा मांडवे गावात होता. 

              नातेपुते ते माळशिरस मार्गावर सर्वत्र परिसरातल्या लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.आज सदाशिवनगरला पहिले गोल रिंगण होते.रिंगण पाहण्यासाठी खूप लांबून लोक आले असावेत. आपापसात बोलणाऱ्या लोकांची बोली भाषा वेगळी वाटत होती. रिंगणात एक घोडेस्वार विराजमान झाले असतात. एका घोड्यावर माऊली विराजमान झाल्या आहेत असे मानले जाते. रिंगणात मार्गावर रांगोळी काढली होती. प्रत्यक्ष रिंगणात अश्व धावताना घोडेस्वार असणारा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे अशी परिस्थिती असते. रिंगण सोहळा संपल्यानंतर अश्वाच्या पायाखालची माती लोक घरी घेऊन जात होते.दुपारनंतर येळीव याठिकाणी पालखीने विसावा घेतला होता.







         आज दुपारी पुरंदावडे येथे प्रशांत कुंभार यांचेकडे भोजन घेतले. तेथेच हरे कृष्ण संप्रदायाचा कार्यक्रम चालू होता. सर्वजण वाद्यांच्या तालासुरावर नाचत होते. महिलांही नृत्यात सहभागी झाल्या होत्या. फुगड्यांचाही आस्वाद घेतला होता. 

            आपणास मानसिक स्वास्थ्य अध्यात्मामुळे मिळते. हरे कृष्ण संप्रदायाने जगात भगवदगीतेचा प्रचार व प्रसार करण्याचे उत्तम काम केले आहे. मानसिक स्वास्थ्य ,कुटुंबाची तसेच समाजाची प्रगती व्हायची असेल तर  अध्यात्म हाच मार्ग आहे. आपणही अध्यात्माचा आधार घेऊन आपली प्रगती करावी असे वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

सोमवार, ४ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस चौदावा ४ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान बरडहून झाले. गावातून रथ आणणे अवघड असल्याने नुसती पालखीच गावात नेली जाते. यामुळे ग्रामस्थांना, भाविकांना माऊलींच्या पादुकांचे जवळून दर्शन घेता येते. आज पहिला विसावा संत साधुबुवा महाराज मंदिर, राजुरी येथे होता. या स्थानाला साधूबुवाचा ओढा असेही म्हटले जाते. या मंदिरात टाळ, मृदंगाच्या तालावर वारकरी नुसते माऊली, माऊली म्हणत नाचत असतात. याठिकाणी मठाचीवाडी येथील दत्ता पवार यांनी आमच्या अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.

                मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर सोलापूर जिल्ह्याची हद्द सुरु होते. हद्द सुरु होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे नीरा नदीपासून विशेषतः लोणंदपासून बंदोबस्त सुरु होतो. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत सातारा पोलिसांची जबाबदारी असते. सातारा जिल्हा पोलीस दल पालखी सोलापूर जिल्हा पोलीस दलाकडे सुपूर्त करते. चार्ज हँडओव्हर करण्याची प्रक्रिया ही नजरेचे पारणे फेडणारी असते. सोलापूर जिल्ह्यात कारुंडे येथे पहिला विसावा होता. याठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने, स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. प्रत्येक विसावा स्थळाला यात्रेचे स्वरुप आलेले असते. थोडे दुर्लक्ष झाले तरी आपल्या माणसापासून आपण भरकटतो. विशेषतः महिला, लहान मुलांना पोलिसांच्या सहकार्याशिवाय आपल्या माणसापर्यंत पोहचताच येत नाही. दुपारनंतर मोरोची येथे पालखीने विसावा घेतला. सकाळी उन्हाचा तडाखा तर दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी आल्या. सकाळी उकाड्याने हैरान तर दुपारनंतर आम्हास पावसाने दिलासा दिला. पाऊस परवडला पण उन्ह नको असेच आम्हाला वाटते. उन्हात काम न करण्याच्या सवयीने तसे वाटत असावे.  काही मेंढ्या वारी करताना दिसून आल्या.एक वारकरी तर आपल्या सोबत कुत्रा घेऊन चालले होते.








              वारीत लोक संस्कृतीला चालना मिळते. बऱ्याच वेळा डोंबारी आपला खेळ दाखवताना दिसत होते.तर मरीआईचा गाडापण  आपणास दिसतो. बऱ्याचशा कला सामाजिक आश्रयाच्या अभावाने बंद पडत आहेत. वारीत लाखो लोक सहभागी होतात त्यामुळे अशा पारंपरिक कलांना उर्जितावस्था प्राप्त होत आहे असे वाटते.

             आज आमच्या निवासाची व्यवस्था ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेने केली होती तर भोजनाची व्यवस्था याच गावातील भीमराव दादा बर्वे यांनी केली होती. या मंडळींचा सेवाभाव बऱ्याच गोष्टी शिकवून जातो. आज दुपारी कारुंडे गावापासून पावसाला सुरुवात झाली. काही वेळा चांगल्या सरी आल्या. पाऊस आलाकी

सर्व वारकरी प्लॅस्टिकच्या कागदाची खोळ डोक्यावर घेतात. हा कागदच बहूउद्देशीय आहे. जेवायला बसायचं असेल तर हा कागद बस्कर म्हणून वापरता येतो, झोपायचं असेल तर हाच कागद अंथरूण म्हणून वापरता येतो. पाऊस आलाकी डोक्यावर घेतला जातो.

     एखादी वस्तू जर अशी अनेक प्रकारे वापरता येते तर माणसाच्या बाबतीतही गोष्ट तंतोतंत लागू पडते. जर या गतिमान जगात टिकायचे असेल तर व्यक्तीही मल्टिस्किल असली पाहिजे. थोडक्यात एखाद्या व्यक्तीला अधिकाधिक गोष्टी आत्मसात करायला आल्या पाहिजेत आणि त्याप्रमाणे  समाजाला सेवा देता आली पाहिजे असे मला वाटते.

  राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

रविवार, ३ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तेरावा ३ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !!   (दिवस तेरावा ३ जुलै )

              आज सकाळी साडेसहा वाजता फलटणहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सुरुवातीचा काही वेळ शहरातूनच पालखीचे मार्गक्रमण होते. रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे राहून मुखाने माऊली, माऊली असा गजर करीत पालखीचे स्वागत करीत होते. फलटणनगरीत अनेक ठिकाणी खाऊचे तसेच पाण्याचे वाटप होत असताना दिसून आले. आज मार्गात विडणी, निंबळक असे छोटे विसावे होते. तर पिंप्रद येथे मोठा विसावा होता. विडणी, पिंप्रद, निंबळक या सर्वच ठिकाणी अल्पोपहार व भोजनाची उत्तम व्यवस्था केलेली होती. 

                आज पालखीचा मुक्काम बरड येथे आहे. बरड पासून जवळ असणाऱ्या निंबळकच्या हद्दीतील पवारवस्तीवर आजची निवासाची व्यवस्था ज्ञानेश्वर पवार यांनी केली आहे. एखाद्या हिलस्टेशनला राहिल्यासारखे वाटत आहे. व्यवस्था लयच भारी असल्याने वारी व्यतिरिक्त अन्यवेळीदेखील भेट द्यायला हवी असं वाटतंय. फलटण  ते बरड मार्गावर आसपासच्या गावातील लोकांनी माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. आज विडणी येथील विसाव्याच्या ठिकाणी केलेले डेकोरेशन खूपच लक्षवेधक होते. पुणेपासून आत्तापर्यंत ज्या ज्या ठिकाणी विसावे होते त्यामध्ये सर्वात सुंदर सजावट केली होती. विडणी येथे माऊलींच्या पालखीवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली.






             वारीत एक लहान मुलांची दिंडी आढळून आली. सगळीकडे दिंडीत मोठे वारकरी पाहायला मिळतात.पण लहान मुलांची  दिंडी सहसा आढळून येत नाही. मुलांच्यात अपेक्षित बदल हवा असेल तर लहानपणीच संस्कार होणे गरजेचे आहे. मोठया माणसावर काही प्रयोग करायचं म्हटले तर त्यामध्ये फारसे यश येत नाही. आपण मुलांच्यावर जाणीवपूर्वक काही प्रयोग केले तर यश निश्चितच येते. आपण संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी लहान मुलांच्यावर काही प्रयोग करुया,चांगली पिढी निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील राहूया.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

शनिवार, २ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस बारावा २ जुलै )



 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस बारावा २ जुलै )

            ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा फलटणला दोन दिवस मुक्काम असल्याने आम्हालाही थोडी विश्रांती मिळाली. दोन दिवस विश्रांती असेल तर कपडे धुणे, वैद्यकीय मदत उपलब्ध करुन घेणे या बाबी सहज शक्य होतात. आज फलटण नगरीत स्नेही मंडळींच्या गाठीभेटी घेण्यात वेळ गेला. दिपक मुळे यांच्या घरी तर जणू काही संगीताची मैफलच रंगली. शिक्षणामुळे आपल्या ज्ञानात भर पडते हे खरे आहेच. पण अशिक्षित महिला देखील नुसतं ऐकून काही गीते, अभंग, गौळणी पाठ करत असतात. ऐकून म्हणत असल्याने एखादी चूकही होऊ शकते परंतु त्या मागचा भाव जास्त महत्वाचा आहे असे मला वाटते.सकाळी अशीच एक  जालना जिल्ह्यातील धनसंगी येथील सुशिला कुडधनी ही महिला भेटली त्यांच्याकडून समाज प्रबोधनात्मक गौळण ऐकली ती आपल्या माहितीसाठी....

लहान हो, लहान हो हरी,

वेळ नाही बरी माझे भ्रतार घरी !!धृ !!

सासू माझी निघाली बघा मथुरा बाजारी,

सासरा माझा दारामध्ये राखण करी!!१!!

ननंद माझी आहे बघा माझ्या शेजारी,

चाडया चुगल्या करुन माझा संसार मोडी !!२ !!

 एका जनार्दनीं, हरी लहान होईन,

सासू सासऱ्याचा जाच सहन होईना !!३!!

  या गीतामधून सामाजिक स्थितीचे विदारक चित्र मांडले आहे. आपण सावध रहावे अशीच यापाठीमागची भावना आहे.


  सातारा जिल्ह्यातील फलटण हे महत्वाचे शहर याचीही माहिती आपणाला होणे गरजेचे आहे असे वाटते. फलटण हे आपल्या देशातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाते. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा भरते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तर भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा असे देखील म्हणतात .या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

              फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. आजही राजे मंडळींचा समाजावर सकारात्मक प्रभाव जाणवतो. छत्रपती संभाजीराजे यांच्या मातोश्री सईबाई यांचे हे माहेर होय.फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू  चांगल्या जतन केल्या आहेत. अशा या ऐतिहासिक शहराला आपण भेट द्यायला हवी असे वाटते.

                फलटण नगरीत सर्वत्र टाळ, मृदंगाचा ध्वनी कानी पडत होता. विश्रांतीच्या या वेळेचा वारकरी सदुपयोग करत होते. अनेक ठिकाणी  वारकरी कीर्तनाचा आनंद लुटत असताना दिसून आले. 

             पालखी सोहळा आनंदमयी व्हावा यासाठी प्रशासन देखील खूप काळजी घेते. वारीच्या मार्गावर पाणी पिऊन प्लॅस्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांची पाकिटे ,शिल्लक राहिलेले अन्न पडलेले असते. वारकरी पुढे गेल्यानंतर त्या परिसरात रोगराई पसरण्याची भिती असते. ही वारी निर्मल व्हावी यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी  सर्व कचरा गोळा करण्याचे काम करतात. त्याची विल्हेवाट लावतात. आज फलटणमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी दाखल झाले आहेत.आमचे स्नेही आणि वाईच्या ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलचे चेअरमन दिलीप चव्हाण ,जुन्नरचे रंगनाथ हांडे यांच्यासमवेत  एका एन. एस. एस. तुकडीला भेट देण्याचा योग आला. या तुकडीमध्ये किसन वीर महाविद्यालय,वाई,सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय,रहिमतपूर आणि विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. हे विद्यार्थी पालखी पुढे गेल्यानंतर सर्व परिसर स्वच्छ करण्याचे काम करणार आहेत.  

            लोणंदपासून प्रत्यक्ष काम केलेले सुध्दा आहे. हे विद्यार्थी खूप मोठे करत आहे असे वाटते.स्वच्छता हेच परमेश्वराचे दुसरे नाव आहे असे म्हटले जाते. आपणही अशा सार्वजनिक स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे, आपला परिसर स्वच्छ करुन कोणतेही साथीचे आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी असे मनोमन वाटते.

    राजेंद्र पवार

  ९८५०७८११७८

शुक्रवार, १ जुलै, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस अकरावा १ जुलै )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस अकरावा १ जुलै )

               आज सकाळी सहा वाजता तरडगावहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान झाले. दत्त मंदिर देवस्थान काळज येथे पालखीने पहिला विसावा घेतला. तर दुसरा विसावा सुरवडी येथे होता. तरडगावपासून फलटणपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बऱ्याचशा औद्योगिक वसाहती दिसून आल्या. परिणामी या टप्प्यात वारकऱ्यांना मोठया प्रमाणात खाऊ तसेच बिसलेरी बॉटलचे वाटप होताना दिसत होते. वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी खूप दुरहून लोक आलेले दिसत होते. पालखीची दुपारची विश्रांती निंभोरे येथे होती. दुपारनंतर वडजल येथे पालखीने विसावा घेतला. या पालखी मार्गावर पर्यटन विकास महामंडळाकडून देखील वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. या मार्गावर फलटणजवळ क्रेनच्या साह्याने माऊलीच्या रथास पुष्पहार घालण्यात आला. तरडगाव ते फलटणची पायी वारी अगदी सहजरीत्या झाली. फलटण कधी आले ते कळलेही नाही. आज दुपारी निंभोरे येथे किशोर मोरे यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला तर आजचा मुक्काम फलटणला आशिष कणसे यांच्या घरी आहे. वारीच्या मार्गावरील स्थानिक लोकांना वारकरी भोजनासाठी आपल्या घरी यावेत अशी अपेक्षा असते त्याचाही प्रत्यय आज आला. वारकऱ्यांच्या रुपाने ज्ञानेश्वर माऊलीच आपल्या घरी येतात असे त्यांना वाटते यासाठी आपल्या घरी येण्याचा त्यांचा जास्त आग्रह असतो. "साधूसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा"  हेच येथे दिसून येते. 











            वारीच्या माध्यमातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. आज सहकार क्षेत्रातील दोन दिगग्ज ज्ञानदीपचे व्ही. जी. पवार व शिवकृपाचे संस्थापक व माजी अध्यक्ष गोरख चव्हाण यांची दिलखुलास चर्चा होताना दिसून आली. वारीत अनेक लोक भेटत असतात. प्रत्येकाने आपापली प्रगती कशी केली हेही आपणास कळते. अडचणी आल्या तर मार्ग कसा काढावा हे सुध्दा आपल्याला समजते.

              फलटण शहराच्या प्रवेशद्वारावर  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या सौभाग्यवती वेणूताई चव्हाण यांचा पुतळा दिसून आला. हा पुतळा पाहिल्यानंतर एक सुसंस्कृत राजकारणी आणि त्यांचा कार्यकाल नजरेसमोर आला. महाराष्ट्राला कसे प्रगतीपथावर नेले हे समजून आले. फलटण शहरात पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. शहरातसुध्दा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ व चहापानाचे वाटप होताना दिसत होते. एका ठिकाणी मुस्लिम समाजाच्यावतीने चहापान दिले जात होते, त्या कृतीने जास्त लक्ष वेधून घेतले. बऱ्याचवेळा एक धर्मातील लोक दुसऱ्या धर्माचा द्वेष करताना दिसतात. कोणताही धर्म दुसऱ्याचा द्वेष करावा असे सांगत नाही. मानवी मनानेच या भिंती उभ्या केल्या आहेत.आजच्या घटनेने सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. आपणही कोणत्याही धर्माचा द्वेष करु नये. इतर धर्मातील चांगल्या गोष्टींचा स्वीकार करावा असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...