pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
pune लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २८ जून, २०२२

!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस आठवा २८ जून )

 !!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस आठवा २८ जून )

              आज सकाळी ६ वाजता वाल्हेहून पालखीचे प्रस्थान झाले. पालखी तळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून तो भव्य आहे.पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी रोजच पाद्य पूजा होत असते. आज जेऊर फाटा येथे पालखीचा पहिला विसावा होता. या विसाव्याच्या ठिकाणी शेजारच्या गावातील लोक वारकऱ्यांसाठी भाकरी, पिठले आणि खर्डा (ठेचा ) घेऊन येत असतात. वारकऱ्यांना याठिकाणी याचकाच्या भूमिकेत जावे लागते. थोडक्यात मागून खावे लागते. आमच्यासाठी पुरंदर तालुक्यातील मांडकी गावच्या ह.भ.प.ज्ञानेश्वर शिंदे (माऊली ) यांनी बाजरीची भाकरी व  खर्डा (ठेचा) आणला होता. त्यांचा आस्वाद आम्ही घेतला. खर्डा खाणे कोणाचंही काम नाही नवीन माणसाला तो आपला प्रताप दाखवतोय. आमचीही यातून सुटका झाली नाही.  











               दुसरा विसावा नीरा येथे होता. नीरा ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर माऊलींचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, फुलांचा वर्षाव तसेच रांगोळ्या काढून स्वागत केले होते. आज दुपारी माउलींनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात प्रवेश करताच प्रथम पादुकांना नीरा नदीत स्नान घातले गेले. तो क्षण अतिशय भावूक होता. याचवेळी असंख्य भाविकांनीही स्नानाचा आनंद लुटला. मार्गावर काही ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी स्नानाची पाईपलाईनद्वारे  व्यवस्था केली होती. एरव्ही स्त्री पुरुष एकत्र स्नान करताना फारसे दिसत नाहीत परंतु वारीच्या वाटेवर प्रत्येकजण वारकऱ्यात विठ्ठल रुक्मिणीचे रुप पाहत असतो. त्यामुळे वेगळा भाव मनात येण्याचा प्रश्नच येत नाही. आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था मुंबईस्थित असणाऱ्या निलम धस मॅडम यांनी केली होती. नीरा येथे त्यांच्या कुटुंबियांकडून दरवर्षीच पंगतीचे नियोजन असते. बऱ्याचवेळा कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बऱ्याच योजना बंद पडतात पण याठिकाणी धस मॅडम यांनी हा उपक्रम सुरु ठेवल्याबद्दल वारकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले.

             आज वर्णे गावाहून माऊलींच्या दर्शनासाठी माजी सरपंच हणमंतराव पवार, रामचंद्र निकम, बाळकृष्ण पवार, बाबासाहेब निकम, शरद हणमंत पवार आदि मंडळी आली होती. वारीचा सोहळा बघून त्यांनी आनंद व्यक्त केला.

               आज आणि उद्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे आहे. लोणंद नगरीला यात्रेचे स्वरुप आले आहे. आज गायक अर्जुन यादव, तबलजी राहुल लोहार तसेच विजय ढाणे यांनी संगीताची मैफल सादर केली.जशा अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच ज्ञान आणि मनोरंजन ही सुद्धा आवश्यक गरज होऊन बसली आहे.

   मनोरंजन माणसाला अधिक कार्यप्रवण करते. आपण मनाला आनंद मिळण्यासाठी विविध प्रकारे मनोरंजन करुन घ्यावे असे वाटते.

 राजेंद्र पवार 

९८५०७८११७८

सोमवार, २७ जून, २०२२

!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सातवा २७ जून )

 !!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सातवा २७ जून )   

            आज सकाळी बरोबर ७ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जेजुरी नगरीतून प्रस्थान झाले. प्रस्थानाच्यावेळी नगरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊलीला निरोप दिला तर अनेकांनी मार्गावर उस्फुर्त स्वागत केले. जेजुरीच्या एम. आय.डी.सी  एरियात रस्ते विस्तिर्ण असल्याने वारकऱ्यांना चालणे खूपच आरामदायी वाटत होते. मार्गावर अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे, फराळाचे साहित्य, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात होत्या. आज पालखी मार्गावर दोन ठिकाणी माउलींनी विसावा घेतला. पहिला विसावा जेजुरीची हद्द संपताच पहिल्याच वळणावर होता. पालखी मार्गावर बहुतांशी ठिकाणी विसावा स्थळे बांधलेली आहेत परंतु या वळणावर बांधलेले विसावा स्थळ नसून तात्पुरता मंडप उभारला होता. याठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या असून या टेकड्यावर बसून वारकऱ्यांनी फराळाचा आनंद लुटला. येथे कोणतेही गाव नसल्याने वारकऱ्यांशिवाय अन्य कोणीही नव्हते. हा रस्ता घाट रस्ताच होता असे वाटते. या मार्गावर रस्ता व रेल्वे मार्ग अगदी समांतर असल्याने दृश्य खूप विलोभनीय वाटत होते.






            दुसरा विसावा दौंडज याठिकाणी होता. जेथे विसावा असतो त्या स्थळाला, गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. आज दुपारीच माऊलींची पालखी वाल्हे गावात आलेली आहे. आज येथेच माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. येथील पालखी तळ रेल्वे लाईनच्या पलीकडे असून अतिशय भव्य दिव्य आहे. ज्या गावात माऊली विसावल्या आहेत त्या गावाविषयी थोडीसी माहिती सांगितली पाहिजे.

 बघूया वाल्हे गाव कसं हाय ते ....

              पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून या गावाची ओळख. आद्य कवी रामयणकार महर्षी वाल्मिकी ऋषी पासून ते अगदी शिवकालीन काळापर्यंत तसेच स्वातंत्र्य लढ्यातदेखील येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी एका रात्रीत या गावात विजय स्तंभ उभारल्याचा उल्लेख आहे.

             वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याबद्दल माहिती घेतलीच पाहिजे. त्याच्या याबदलात त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. नेमकं परिवर्तन कसं झाले ते पाहूया. रामायण, म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'! 'पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !', 'पत्नी असावी तर सीतेसारखी !', खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे, 'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी !', कारण तीच खरी रामायणकर्त्याची ' कर्ती ' आहे, हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले.

                रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले. 'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस' असे विचारल्यावर, 'माझ्या बायकोपोरांसाठी', असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, 'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?. 'तू इथेच थांब, मी विचारुन येतो' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही ? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार !! पण नाही. त्या तडफदार आदिमायाशक्तीने, क्षणाचाही विचार न करता, 'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!', असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्याकोळ्याच्या जडणघडणीतला 'टर्नींग पाॅईंट' ठरला.

               गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा 'वाल्मिकीऋषी' होऊन 'रामायण' हे महाकाव्य रचतो. ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने, 'व्हय.. आम्ही आहोतच की तुमच्यासंगं !', असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ! नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते. 

    वाल्हे गावात महर्षी वाल्मिकीचे मंदिर आहे. याच गावात महर्षी वाल्मिकी या नावाने हायस्कूल आहे. सध्या रामायण मालिका दूरदर्शनवर चालू आहे तीही आपण पहावी. नितीमार्गाने कसे जगावे हे रामचरित्र सांगते. वाल्या कोळ्याची बायको आणि सध्याच्या स्त्रिया यांची तुलना केली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया वाल्या कोळ्याच्या बायको सारख्या वागत नाहीत . जर त्या वाल्या कोळ्याच्या बायकोप्रमाणे वागल्या तर समाजातील अनेक भ्रष्टाचारासारख्या बाबी कमी होतील. नीतिमान तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी वाल्या कोळ्याच्या बायकोचा आदर्श घ्यावा. जे पतीचे अयोग्य वाटत असेल त्यासाठी स्पष्टपणे नकार द्यायला शिकले पाहिजे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

रविवार, २६ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सहावा २६ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सहावा २६ जून )

           आज सकाळी ७ वाजता सासवडहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सासवड शहरातून पालखी मिरवणुकीने मुख्य मार्गावर आली. रथ मुख्य रस्त्यावरच उभा होता. सासवड नगरवासीयांनी दुतर्फा उभे राहून माऊलींचे स्वागत केले जात होते. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात होते. सासवड शहरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सर सेनापती वीर बाजी पासलकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये समाधी बांधली आहे. सासवडमध्ये शिवसृष्टीही आकाराला आली आहे. ती आम्हाला पाहण्याचा योग आला नाही.








               आज पहिला विसावा बोरावके मळा तर दुपारनंतरचा विसावा साकुर्डे या गावी होता. दुपारची विश्रांती यमाईची शिवरी या ठिकाणी होता. नेहमीप्रमाणे गायकवाड यांच्या घरी विश्रांतीची व्यवस्था झालेली होतीच. मात्र दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. आज बराच काळ ढगाळ वातावरण होते. आम्ही सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होतो. पावसाने फक्त पालखी मार्गावर जलाभिषेक केला. प्रत्येकाला पावसाची खूप ओढ लागली आहे.

            पालखी मार्गावर विविध समाजसेवी संस्था जनतेचे प्रबोधन करत असतात. आज दोन वेगवेगळ्या बाबी प्रकर्षाने जाणवल्या. दोन्हीही खूपच हृदयस्पर्शी होत्या. काही युवक व्यसनमुक्तीसाठी काही कार्यक्रम सादर करत होते. खर तर व्यसनापासून प्रत्येकाने दूर राहायला हवे. व्यसनामुळे घराची राखरांगोळी होते. आपण सर्वजणच व्यसनापासून दूर राहूया.

           आमचा आजचा मुक्काम श्री क्षेत्र जेजुरी येथे आहे. आमच्या निवासाची शाही व्यवस्था बाळासाहेब जगताप यांनी केली आहे. जेजुरी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.    

            उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला अहिल्याबाई होळकर यांनी नव्याने देऊळ बांधले. तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजे सन १७१२ सालचे हे देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे २००पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत.  दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

              जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून सन १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम सन १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. सन १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम सन १७७० मध्ये पूर्ण झाले. 

               निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

             आज जेजुरी नगरीत भंडाऱ्याची उधळण करत ग्रामवासीयांनी ज्ञानेश्वर माऊलींचे उत्साहात स्वागत केले. "सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावर्षी जेजुरी येथे नव्याने पालखी तळ विकसित केला आहे. प्रसिध्द उद्योजक बाळासाहेब भानगीरे यांनी ९ एकर जमीन पालखी तळाशी दिल्यामुळे गैरसोय कायमची दूर झाली आहे.

              आज सकाळी खळद गावाजवळ लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मुलगी वाचवा, देश वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांना सन्मानाने वागवा. तिला स्थावर, जंगम मालमत्तेत मालक करा अशा विषयाचे प्रबोधन करणारे ड्रेस परिधान केले होते.

 आपणही आपल्या कुटूंबातील, समाजातील  स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊया.स्त्री-पुरुष समानता  खऱ्याअर्थाने अंमलात आणूया.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

शनिवार, २५ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पाचवा २५ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पाचवा २५ जून )

          आज सासवडमध्ये माऊलीचा विश्रांतीचा दिवस ,माऊलीच्या आगमनानंतर प्रस्थान होईपर्यंतच्या कालावधीत भागातील भाविकभक्त  ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी साधारण अर्धा किलोमीटरची रांग होती. संपूर्ण सासवड नगरीस यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.  

                                      








                देवदर्शनाबरोबर संसारपयोगी वस्तू भाविक खरेदी करताना दिसत होते. सासवड हे सोपानकाकांचे समाधी स्थान, या समाधी स्थळाला भाविकांची भेट ठरलेली असते. आमचा तरी  त्याला कसा अपवाद असेल. कऱ्हेच्या काठवरचे हे समाधी स्थळ भाविकांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्रोत आहे. आजच ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ज्ञानेश्वर माऊली व सोपानदेव या दोन पालख्यांची भेट  भंडीशेगावजवळ होते.या बंधुभेटीचा सोहळा विलोभनीय असतो.

           या समाधी स्थळाजवळ अनेक भाविक वाद्यांच्या तालावर फुगड्या तसेच नृत्य करताना दिसत होते.आज आम्ही सासवडमधील आमच्या स्नेही मंडळींच्या भेटी घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. सासवडला येण्यासाठी मोठी दमझाक झालेली असते त्यामुळेच या नगरीत बरेच मेडिकल  कॅम्प दिसून येत होते. प्रत्येक कॅम्पमध्ये आजारी असणारे वारकरी वैद्यकीय सुविधा घेताना दिसत होते. मला तर त्या वैद्य,परिचारिका आणि सपोर्टवीह  स्टाफमध्ये पांडुरंगाचे रुप दिसत होते. खऱ्याअर्थाने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा होय असे वाटते.

            आपणही जनसेवा करावी. असे म्हटले जाते "Service to man is to service to God".चला तर आपणास शक्य होईल तेवढी जनसेवा करुया.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

शुक्रवार, २४ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

           आज सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून प्रस्थान झाले. आम्ही प्रस्थानापूर्वी तेथे हजर होतो. आम्ही लगेचच दिंडीत सहभागी झालो. कालच्या नियोजनाप्रमाणे पुलगेटजवळ शपथ घेण्याचा कार्यक्रम संतांच्या साक्षीने झाला.थोड्याच वेळात पालखी वानवडी जवळ आली. त्याठिकाणी परंपरागत आरती झाली. वारीत सर्वत्र टाळ मृदंगाचा गजर चालू असतो परंतु फक्त चोपदाराने दंड उंचावताच सर्वत्र शांतता प्रस्थापित होते. लाखोंचा जनसमुदाय एका क्षणात एकदम शांत होताना पाहिला. आज हडपसर, उरळी देवाची व झेंडेवाडी येथे छोटे विसावे होते. वडकीनाला याठिकाणी मोठा विसावा होता. वडकी नाल्यापासून दिवे घाट सुरु होतो. घाटात वारकऱ्यांची कसरत पाहायला मिळत होती. थोडासा ऊन सावलीचा खेळ चालू होता. 








             सगळे वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते पण पावसाने हुलकावनीच दिली. फक्त एका सरीने काय तो दिलासा दिला. पालखीच्या पुढे नगाऱ्याची गाडी असते. वारीत प्रत्येक दिंडीत हरिनामाचा गजर चाललेला दिसतो.दुपारनंतर आम्ही थोडं पुढे आल्याने प्रत्येक दिंडीमध्ये चालणाऱ्या भजनाचा आनंद लुटला. घाट चढून आल्यानंतर लगेचच फिजोथेरपीचे केंद्र होते. तेथे मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. या सुविधेचा लाभ आम्ही घेतला. आजचा टप्पा ३५ किलोमीटरचा त्यातच अवघड घाट असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता याला फक्त तरुणांचा अपवाद असेल. पुरंदर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर पांडुरंगाची मोठी मूर्ती असून ती लक्षवेधक होती. पुरंदर तालुक्याच्यावतीने सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. स्वागताचा मान विणेकऱ्याला दिला जातो.

            आज एकादशी असल्याने सर्वत्र फराळाचे वाटप केले जात होते. आज आम्हाला सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून फराळ मिळाला आणि याचवेळी मांजरी स्टड फार्ममध्ये कार्यरत असणारे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

            वारीच्या मार्गावर जसे फराळाचे वाटप होते अगदी त्याचप्रमाणे ठिक ठिकाणी वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जात होती. मीही या सुविधेचा लाभ घेतला. आजचा आमचा मुक्काम सासवडनगरीत आहे. आज घाटात सर्वत्र वेगवेगळ्या वाहिन्या वारीचे चित्रीकरण केले जात होते. थोडक्यात काय तर खाजगी संस्था असो किंवा शासकीय या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाता येते. मी म्हणेन वारी ही आपणास समाजसेवेची संधी देते. आपणास देखील अशा संधी आल्या तर त्या संधीचे सोने करायला हवे. आपलं कामसुध्दा  वारीच्या माध्यमातून समाजापुढे नेण्याची संधी मिळते असे मला वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...