!!अभय बंग जन्मदिन !! ( २३ सप्टेंबर )
डॉ.अभय बंग हे डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० ला झाला. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यांनी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग "हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
डॉ.अभय बंग यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
१)गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :-"अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते. अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवर्याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.
२) नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-
३) स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन :-अमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर लॅनसेट मध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ अशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
४) सिकल सेल अनिमियावरील संशोधन
५) इ.स. १९८८ साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
१)टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
२) २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
३)२०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८