शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा!!(८)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा!!(८)
        ह.भ.प.श्री.श्रावण महाराज अहिरे यांचे आज कीर्तन झाले होते. त्यांनी सावता महाराज यांचा अभंग किर्तनसेवेसाठी घेतला होता. तो खालीलप्रमाणे--
नामाचिया बळे न भिऊ सर्वथा।कळीकाळाच्या माथा सोठे मारु।१।
वैकुंठीचा देव आणू या  किर्तनी।विठ्ठल गाऊनी नाचो रंगी।धृ।
सुखाचा सोहळा करुनी दिवाळी।प्रेमे वनमाळी चित्ती धरु।३।
सावता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा।तेणे भक्तीद्वारा वोळगंती।४।




             अभंगाचे निरुपण करताना श्रावण महाराज अहिरे म्हणाले की,  श्रवण, कीर्तन नामस्मरण असे भक्तिमार्गाचे अनेक प्रकार आहेत.नामस्मरण या भक्तिमार्गामध्ये देखील  प्रचंड ताकद आहे. या ताकदीमुळे मनुष्य निर्भय बनतो. त्याच्या मार्गात कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला तसेच सडेतोड उत्तर देतो. 
       सावता महाराज म्हणतात , तुम्ही भक्तीचा मार्ग धरा. भक्ती केली तरच माणसाला मुक्ती मिळते. चरित्राविषयी माहिती सांगताना अहिरे
महाराज म्हणाले की, इतर संताप्रमाणे सावता महाराज यांनाही लोकांच्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सावता महाराज यांचे कुटुंब मुळचे औसाचे,नंतर ते आरणगाव येथे स्थलांतरीत झाले. त्यांच्या कुटुंबातील सदस्य विठ्ठलभक्त होते. त्यांचा जन्म १२५० साली झाला.सावता महाराज हेदेखील पंढरीचे वारकरी होते.ते उत्तम शेतकरी होते. त्यांच्यादृष्टीने शेती हीच पोथी होती.त्यांचा व्यवसाय कृषी,वागण्यात ऋषी त्यामुळे देवांची खुशी त्यांना प्राप्त झाली होती.
      संत सावता यांना दोन अपत्ये होती. त्यांना केवळ ४५ वर्षाचे आयुष्य लाभले.दरवर्षी  वारीच्या वेळी पंढरीला शेकडो पालख्या जात असतात परंतू आरणगावहुन पंढरपूरला पालखी जात नाही.याउलट पंढरपूरहून आरणगावला पालखी
येते.थोडक्यात प्रत्यक्ष पांडुरंगच सावता माळी यांच्या भेटीस येतो.
          कीर्तनाचे महत्व सांगताना महाराज म्हणतात, नुसत्या कीर्तन श्रवनाणे आपल्यातील दोष कळतात आणि ते दोष दूर करण्यासाठी संबधित व्यक्ती प्रयत्न करते. कीर्तनात देव नाचतात असेही या अभंगात म्हटले आहे.
            सावता महाराजांना शेतीची प्रचंड आवड होती. "कांदा, मुळा,भाजी,अवघी विठाई माझी",प्रत्यक्ष कामात परमेश्वर शोधणारे सावता महाराज आहेत.
        आपण आपले काम  प्रामाणिकपणे करावे,हाच संदेश आज मिळाला असे वाटते.
     शब्दांकन-राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२०

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(७)

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(७)
            आज ह.भ.प.प्रमोद महाराज जगताप यांचे कीर्तन झाले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी  संत कबीरांचा अभंग घेतला होता.  तो खालीलप्रमाणे--
         भजोरे भैय्या !राम गोविंद हरी!!धृ!!
          जप तप साधना!कछु नहि लागत
           खरचत गठरी !१!
   संतत संपत सुखके कारन!जैसे भुल परी!२!
   कहत कबीर ज्या मुख राम!नही वो मुख धुल
     परी!३!




          वारकरी संप्रदायाचे  कबीर हे महान साधू होते.कबीरांच्या वरील दोह्यात हिंदी,राजस्थानी, भोजपुरी, पंजाबी भाषांचा समावेश आहे. कोणत्याही परिस्थितीत राम नाम आपण घेतले पाहिजे.ज्याच्या मुखी रामनाम नाही, त्याचे मुखच अशुध्द आहे असे त्यांनी म्हटले आहे.आपण भजनाकडे वळले पाहिजे. संतती ,संपत्ती हा सर्व भुलभुलैया आहे.
      कबिराविषयी माहिती सांगताना  प्रमोद महाराज जगताप  म्हणाले की, कबीर अनौरस अपत्य म्हणून जन्माला आले. त्याचा सांभाळ एका मुस्लीम दाम्पत्याने केला. अनाथ मुल असल्याने मुस्लिम धर्मीयही त्यांना स्वीकारत नव्हते. रामानंद स्वामीच्या कडून त्यांना राम नामाची दीक्षा मिळाली. कबीर अतिशय परखड वृत्तीचे होते. मशिदी मध्ये बांग देण्याविषयी ते म्हणतात,"अल्ला कहकर बांग पुकारे, क्या अल्ला बहिरा है।हिंदू धर्मातील कर्मकांडाविषयी आपली परखड मते  त्यांनी व्यक्त केली.विशेषत श्राध्दप्रकार चुकीचा आहे.याबाबतीत त्यांचे व गाडगेबाबा यांचे विचार एकसारखे वाटतात.  ते मूर्तिपूजेच्या विरोधात होते.साधूसंत गांजा सारखे व्यसन करतात त्याविषयी ते म्हणत की,"गांजाबाजी मत करो,अक्कल गुम होती है"।
  शिखांचा पवित्र ग्रंथ "गुरुग्रंथसाहेब" यामध्ये कबिराच्या दोह्याचा समावेश आहे. साधुसंतांनी समाजातील जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. ह्याच कबीरांचे निधन झाल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम आपापसात भांडू लागले की,"कबीर आमचेच आहेत."थोडक्यात काय तर व्यक्तीची महती पटल्यानंतर सर्वजण त्यांचा स्वीकार करतात.
     धर्माच्या नावाखाली चाललेल्या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत.समाज व्यसनमुक्त झाला पाहिजे. श्रध्दा डोळस असावी. निव्वळ कर्मकांडाच्या मागे लागू नये हाच संदेश कबिराच्या जीवनातून मिळाला असे वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (६)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (६)
        आजचे कीर्तन ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांचे झाले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी माणकोजी बोधले यांचा अभंग घेतला होता.तो खालीलप्रमाणे--
 संता वाचुनिया सुख कोठे नाही।अमृत ज्यांचे पायी नित्य वसे ।१।
संतांचे संगे होय मोक्ष गती।नको बा संगती दुर्जनांची ।धृ।
दुर्जनांचे संगे दुःख प्राप्त होय।तेथे कैची सोय तारावया।३।
बोधा म्हणे माझे सत्य हे  त्रिवाचा। नको अभक्तांचा संग देवा।४।
           हा चार चरणांचा अभंग आहे. यामध्ये संतांचे चरित्र मांडले आहे.दुःखामुळे सुखाला किंमत असते. सुख दुःख ही सापेक्ष कल्पना आहे. एखादी गोष्ट अनुकूल असेल तर सुख,प्रतिकूल असेल तर दुःख. नदीला पाणी असणे सुख तर पुराचे पाणी घरात घुसले तर दुःख.



           यावेळी  जयवंत महाराजांनी माणकोजी महाराज बोधले यांचे चरित्र सविस्तर सांगितले.महिपती महाराज यांनी बोधले महाराज यांचे मुळ चरित्र लिहिले आहे.बोधले महाराजांचे मुळगाव सासवड आहे. त्यांचे वडील भालजी जगताप धामणगाव येथे स्थायिक झाले. पांडुरंगाच्या बोधामुळे बोधले हे नाव पडले.मानकोजींचा आध्यात्माकडे मूळचा ओढा नव्हता. बंधूंच्यामुळे पंढरपूरला गेले. हट्टी स्वभावामुळे देवाचे दर्शन झाल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचे  मानकोजींनी  बंधू शिवाजीला सांगितले. प्रत्यक्ष देवांनी  तिसऱ्या दिवशी दर्शन दिले आणि मानकोजींचे जीवन बदलून गेले.
             मानकोजींनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर धामणगाव येथे  बांधले. मूर्ती प्रतिष्ठापणासाठी संत तुकाराम महाराज आले होते. त्यांनी विठ्ठल रुक्मिणीची पुजा हयातभर केली.प्रपंचात राहून परमार्थ कसा करावा याची शिकवण माणकोजी महाराज यांनी दिली.
          माणकोजी महाराजांचा जन्म १६०४ ला झाला होता.तर १६९४ ला त्यांनी समाधी घेतली. नंतर त्यांच्या पाच शिष्यानीदेखील समाधी घेतल्याचे सांगण्यात आले.
              आपण कर्माचा कंटाळा करु नये. आपली सेवा निरपेक्ष असेल तर आपणास कोणत्याही मार्गाने परमेश्वर साह्य करतो.  आपण नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावे. आपल्या वाट्याला आलेले काम निरपेक्ष भावनेने करावे. कामाचा कधीच आळस करु नये हाच संदेश आज मिळाला असे वाटते.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
               ९८५०७८११७८

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(५)

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(५)
              आज ह. भ. प. माधव महाराज राऊत यांचे कीर्तन झाले.त्यांनी कीर्तन सेवेसाठी संत मुक्ताई चा अभंग घेतला होता. तो अभंग पुढीलप्रमाणे -- मुंगी उडाली आकाशी।तिने गिळीले सुर्याशी।१। थोर नवलाव झाला।वांझे पुत्र प्रसवला।धृ।
विंचू पाताळाशी जाय।शेष माथा वंदी
 पाय ।३।
 माशी व्याली घार झाली।देखोन मुक्ताई हसली ।४।
              श्री संत मुक्ताई यांचे माता व पिता, रुक्मिणी आणि विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त घेण्यासाठी निघतानाचा प्रसंग यावेळी हृदयद्रावक पध्दतीने सांगितला. मातेने निवृत्तीनाथांचा हात ज्ञानेश्वरांच्या हातावर ठेवला. मुक्ताईचा मुका घेतला.त्यावेळी  मातेचे अश्रू  मुक्ताईच्या गालावर ओघळले.याठिकाणी वात्सल्याचा वियोग झाला.आणि दुसऱ्या दिवसापासून मुक्ताईला मातेची भूमिका वटवावी लागली.
              बऱ्याचवेळा अज्ञान ज्ञानावर मात करते, कधी कधी आभासी जगच खरे वाटते. पण वास्तव तसे नसते. अज्ञानाने स्वतःचेच नुकसान होते. यावेळी चिपडलेल्या डोळ्याचे उदाहरण दिले.संबंधित व्यक्तीलाच त्रास होतो. दुसऱ्याला
 त्रास होत नाही.अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या अभंगात वर्णन केलेल्या आहेत.
             वंध्यत्व असणारी व्यक्ती माता झाली तर ती वांझ राहतच नाही.खरे पाहता वांझ व्यक्ती माता होत नाही पण तसे घडले तर नवलच नव्हे काय. आपण बऱ्याचवेळा दोरीला साप म्हणतो पण वास्तव कळलेकी आपला भ्रम दुर होतो. अतिशयोक्ती अलंकारासारखा प्रकार याठिकाणी दिसतो. शब्दशः विचार केला तर अशा गोष्टी घडत नाहीत.म्हणुन तर मुक्ताईला यागोष्टीचे हसू येते.
               संत वाङमयात अनेक संतांनी मुंगी शब्दाचा वेगवेगळ्या अर्थाने विचार केला आहे.
संत नामदेव--मुंगी व्याली, शिंगी झाली.
तुकोबाराय-- लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. नाथमहाराज म्हणतात "मुंगीने केली हत्तीशी लढाई",याठिकाणी मद नावाच्या हत्तीचा उल्लेख केला आहे.
             स्त्रीशक्तीची विविध रूपे याठिकाणी वर्णन केली .उदा. आई,बहीण,पत्नी, आपण नटासारखे  असावयास हवे. नटाचे कोणतेच नाते नसते.पण तो असल्यासारखे दाखवतो.
  आजच्या परिस्थितीत विचार करावयाचा झाला तर स्त्रियांना अनन्य साधारण महत्व आहे. समाजाचा समतोल राखण्यासाठी आधुनिक मुक्ताईची गरज आहे.
              समाजाला योग्य दिशा देण्यासाठी आपण स्त्री जन्माचे स्वागत करावयास हवे.सुसंस्कारित स्त्रियाच समाजाला प्रगतीपथावर नेऊ शकतील असे वाटते.
   शब्दांकन --राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(४)

!!त्रंबकेश्वर पारायण सोहळा !!(४)
             आजचे कीर्तन ह.भ. प. संजयनाना महाराज धोंडगे यांनी केले होते. त्यांनी किर्तनसेवेसाठी   बहिणाबाई महाराज  यांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे -
    संत कृपा झाली।इमारत फळा आली।१।
    ज्ञानदेवे रचिला पाया।उभारिले देवालया ।२।
    नाम तयाचा किंकर।तेणे केला विस्तार।३।
    जनार्धन एकनाथ।खांब दिला भागवत।४।
भजन करा सावकाश।तुका झालासे कळस।५।
 बहिणी म्हणे फडकती ध्वजा।निरुपण केले ओजा।६।

            बहिणाबाई या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. आजही या संतांच्याबद्दल कोणालाही फारसी माहिती नाही.लोकांना खानदेशातील कवयित्री बहिनाबाई चौधरी माहीत आहेत." अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर तेव्हा मिळते भाकर"  या गीतामुळे कवयित्री बहिणाबाई लोकांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत.
          संत बहिणाबाई या मराठवाड्यातील होत्या.त्यांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात देवळा रंगारी येथे १७५१ मध्ये  झाला. वयाच्या अवघ्या तीसऱ्या वर्षीच ३० वर्षे वयाच्या रत्नाकर यांच्या बरोबर  त्यांचा विवाह झाला होता.  बालविवाह कधीही वाईटच.बालविवाह या वाईट प्रथेचा बहिनाबाईना  खूप त्रास झाला आहे. त्यांनी वयाच्या ५ व्या वर्षी पंढरपूरमध्ये,९व्या वर्षी शिखर शिंगणापूर येथे काही काळ वास्तव्य केले होते .नंतर रहिमतपूर येथे त्या काही काळ राहिल्या. यानंतर मात्र कोल्हापूर येथे बराच काळ वास्तव्य केले होते. तिथेच त्यांच्या जीवनाला खरी कलाटणी मिळाली. कोल्हापूरमध्ये रामदासस्वामीचे शिष्य जयरामस्वामी कीर्तन करत. त्या कीर्तनाला बहिणाबाई नेहमी जात असत. त्या उत्तम गो-सेवक होत्या. त्यांनी भजनाची परंपरा जपली. त्यांनी ७४० अभंगाची रचना केली. वयाच्या ७२ व्या  वर्षी त्यांचे निधन झाले.
           मानवी जीवन दुःखाचे मूळ तर संत जीवन म्हणजे सुख असे संबोधले जाते.कोणताही संकल्प आणि परिपूर्ती यामध्ये फारसे अंतर असणे योग्य नाही. बऱ्याचवेळा आपण संकल्प करतो पण त्याच्यापूर्तीसाठी आवश्यक परिश्रम घेत नाही.
           आपण आपल्या कुवतीनुसार संकल्प करावा व त्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करावा हाच संदेश आज मिळाला.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

सोमवार, २४ फेब्रुवारी, २०२०

!! त्र्यंबकेश्वर पारायण सोहळा !! (३)

!! त्र्यंबकेश्वर पारायण सोहळा !! (३)


          आज ह.भ.प.पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन होते.कीर्तन सेवेसाठी संत निळोबाराय यांचा अभंग घेतला होता. तो खालीलप्रमाणे--
हरिभक्त माझे जिवलग सांगाती! संभाळुनी नेती परलोका! वचनेची त्यांच्या होय महालाभ!१!
करी पदमनाभ कृपादृष्टी!२ !
मोहादी बंधने जाती तुटोनिया!कळीकाळ पायातळी दंडे!३!
निळा म्हणे मुक्त मोकळीया वाटा! जावया वैकुंठा त्यांच्या संगे !४!
         पुणे जिल्ह्यात तीन संतांचा जन्म झाला त्यामध्ये शिरुर येथे निळोबाराय यांचा,आळंदी येथे ज्ञानेश्वर यांचा,देहू येथे  तुकाराम महाराजांचा.
           शिरुरमध्ये रामलिंग हे पवित्र स्थान आहे. प्रभू रामचंद्र व लक्ष्मण रोज आपल्या प्रवासात वाळूचे शिवलिंग तयार करायचे व संध्याकाळी विसर्जन करायचे मात्र शिरुर येथील शिवलिंग विसर्जन करायचे राहुन गेले. निळोबाराय यांच्या वडिलांनी पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकर यांचेकडे वर मागितला. शंकराच्या कृपाप्रसादाने पुत्रप्राप्ती झाल्याने निळोबा हे नामाभिधान केले.तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर २६ वर्षांनी निळोबाराय यांचा जन्म सन १६७५  मध्ये झाला होता. पूर्वीच्या पध्दतीनुसार त्यांचा विवाह लवकर झाला. वडिलांना  त्यांच्या कामात मदत करु लागले. कुलकर्णी पदाचे व्यवहार सांभाळू लागले पण त्यांचा  पारमार्थिक जीवनाकडे जास्त ओढा होता.पूर्वी कुलकर्णी गावचा सारा गोळा करत. परिस्थिती बरी होती पण लोकांना हेच आवडत नव्हते. लोकांचा त्रास नको म्हणून काही दिवसांनी कुलकर्णी पदातून  स्वतःहून मुक्त झाले. आपल्या जीवनात ग्रामस्थांचा उपद्रव नको म्हणून त्यांनी गाव सोडले. आपली संपत्ती घरदार दान करुन १७०६ साली शिरुर सोडले.आणि आपली पत्नी मैनाबाईला घेऊन त्यांनी पारनेर गाठले.
             संत तुकोबाराय यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आसक्ती होती.तुकाराम महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे यासाठी त्यांनी अनुष्ठान केले आणि ४२ व्या दिवशी प्रत्यक्ष तुकोबाराय यांचे दर्शन झाले. तुकोबारायांनी  त्यांना रामकृष्णहरी हा मंत्र दिला. भक्तीचा  प्रचार आणि प्रसार करण्याचे काम त्यांचेवर सोपवले.
            पिंपळनेर येथे ते थांबले.१७५३ मध्ये ते समाधीस्थ झाले. त्यांच्या प्रत्येक कार्यात पांडुरंगाने साह्य केल्याचे अनेक दाखल्यातून दिसुन येते. आपण चांगल्या लोकांच्या संगतीत राहिले तर आपणास कोणतीही अडचण येत नाही. आपले मित्र अर्ध्यावर सोडणारे नकोत त्यांनी शेवटपर्यंत साथ द्यायला हवी.खरंतर संकटकाळी मदत करतो तोच खरा मित्र. आपण मोहपाशात किती अडकायचे हे ज्याने त्याने ठरवायचे.
         थोडक्यात आपण आपले काम प्रामाणिकपणे केले तर आपणास इतरांचे साह्य होते.आपण आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करुया हाच संदेश मिळतो.
         शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (२)

!! त्रंबकेश्वर पारायण सोहळा !! (२)
       
         आज कीर्तन सेवेसाठी ह.भ.प.एकनाथ महाराज सदगीर यांनी घेतलेला अभंग  संत सोयराबाई यांचा होता. त्या चोखोबांच्या पत्नी होत्या.७०० वर्षांपूर्वी शिक्षणाची कोणतीही सुविधा नसताना त्यांनी केलेले कार्य फारच महनीय होते. त्याकाळी शिक्षणाची संधी ब्राह्मण वर्गाशिवाय अन्य कोणालाही नव्हती. स्त्री शिक्षणाचा तर प्रश्नच नव्हता. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांच्यामुळेच शिक्षणाची संधी सर्वसामान्यांना उपलब्ध झाली.
 कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालीलप्रमाणे--
   "अवघा रंग एक झाला! रंगी रंगला श्रीरंग!
  सर्व  संतांनी समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. आपण आपला अहंकार सोडून दिल्यानंतरच समाजाची उत्तम सेवा करु शकतो. दोन तलवारी एका म्यानात राहू शकत नाहीत तदवत  कोणत्याही दोन अहंकारी व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत.
        पिंगळा, नंदिवाला,वासुदेव हे गोड बोलून आपले इप्सित साध्य करतात.नंदिवाला एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडे जातो. श्रीमंत व्यक्ति त्याचे काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. तरीही आपल्या मधुर वाणीने आपला हेतू साध्य करतो.आपणही आपला हेतू साध्य करण्यासाठी डोक्यावर बर्फ,तोंडात साखरआणि पायाला भिंगरी लाऊन काम करायला हवे.
         संतामध्ये अनेक जातीधर्माचे साधुसंत होऊन गेले. संत नामदेव, चोखोबा,  नरहरी सोनार, कुंभार,सावता माळी, मीराबाई,जनाबाई,  बहिणाबाई, सोयराबाई, निवृत्तीनाथ, तुकाराम,ज्ञानेश्वर,भानुदास आदि संतांना पांडुरंगाने विविध रुपे घेऊ न साह्य केलेचे दिसुन येते.
    जरी विविध जातीधर्मातील संत असलेतरी समाजाची उन्नती करणे हाच मुख्य उद्देश होता. जातीयता नष्ट करणे,अस्पृश्यता निवारणात संतांचा वाटा मोठा आहे.
    आपणही समाजाच्या भल्यासाठी संतविचार
अंमलात आणायला हवे असे वाटते.
 शब्दांकन -- राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२०

!! त्रंबकेश्वर येथील पारायण सोहळा !!

!! त्रंबकेश्वर येथील पारायण सोहळा !!


  श्री बारा जोतिर्लिंग गाथा पारायनाच्या समारोपीय महोत्सवानिमित्त त्रंबकेश्वर येथे शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला.आजची किर्तनसेवा अनिल महाराज पाटील यांनी केली होती.आज कीर्तन सेवेसाठी संत सेना महाराजांचा अभंग त्यांनी घेतला होता.
कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग खालील प्रमाणे --
"संत संगतीने थोर लाभ झाला!मोह निरसला मायादीक ! घातले  बाहेरी काम क्रोध वैरी!बैसला अंतरी पांडुरंग !" या  अभंगाचे विवेचन सुंदररित्या केले.संगतीने माणसाची प्रगती अगर  अधोगती होती.म्हणून सत्संग महत्वाचा आहे.मोह मत्सरापासून दूर राहता आले पाहिजे.श्वानाला दुसऱ्याची गती,माणसाला  दुसऱ्याची प्रगती,संतांना दुसऱ्याची अधोगती आवडत नाही.मायेचे आकर्षण नष्ट झाले पाहिजे. भ्रम व खोटेपणा पटवून देण्याचे काम संत करतात.
      संत सेना महाराजांनी आपले आयुष्य व्यसनमुक्तीसाठी व्यथित केले होते. संत सेना महाराज निष्काम कर्मयोगी होते. आपले काम करताना मुखात परमेश्वराचे नाम असले पाहिजे. थोडक्यात कामाला प्राधान्य द्यायला हवे.(Work is Worship ),काम करता करता भक्ती रुजवण्याचे काम त्यांनी केले.
     आजच्या कीर्तनातून प्रथम कामाला प्राधान्य द्या, काम करत असताना  परमेश्वराचे नामस्मरण करा हाच संदेश मिळाला.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

!! शाहिद अशोक कामटे जन्मदिन !!

!! शाहिद अशोक कामटे जन्मदिन !!
    (  २३ फेब्रुवारी )
       अशोक कामटे जन्म २३ फेब्रुवारी १९६५  मृत्यू २६ नोव्हेंबर २००८ हे मुंबईचे अ‍ॅडिशनल पोलिस कमिशनर होते. त्यांचा जन्म एका मराठा कुटुंबात २३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाला. त्यांचे शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये  झाले. पुढे ५ वर्षांसाठी ते कोडाईकॅनाल आंतरराष्ट्रीय प्रशालेत दाखल झाले होते. त्यांना कॅम्प रायझिंगसनमधून आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली व ते १९८२ मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांनी १९८५ मध्ये सेंट झेवियर महाविद्यालयातून त्यांनी पदवी प्राप्त केली .त्यांनी त्यांचे पदवीनंतरचे शिक्षण सेंट स्टीफन्स महाविद्यालयातून १९८७ साली पूर्ण केले. त्यांनी भारताचे पेरू मध्ये झालेल्या junior power lifting championship मध्ये प्रतिनिधित्व केले होते. अशोक कामटे यांच्या पश्चात पत्नी विनिता, मुले राहुल व अर्जुन आहेत. त्यांचे वडील एम.आर. कामटे भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी होते. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांशी  लढताना ते शहीद झाले. त्यांच्याबरोबर विजय साळस्कर, हेमंत करकरे, मेजर संदीप ऊनीकृष्णन, तुकाराम ओंबळे हेही शहीद झाले होते.
        अशोक कामटे सातारा येथे जिल्हा पोलीस अधीक्षक होते. सांगली येथे त्यांच्या नावाने दरवर्षी मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली जाते. ती स्पर्धा आजच आहे. गतवर्षी मीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता. भुईंज येथील किसनवीर सातारा सहकारी साखर कारखाना येथे भव्य शहीद स्मारक उभारले आहे. याठिकाणी  आपण  प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. अशोक कामटे तसेच सर्वच शहिदाप्रति आदर व्यक्त करुया. सर्वच शहिदांना विनम्र अभिवादन.
    शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८





शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२०

!! नाशिक सहल !! १ प्रवास वर्णन

!! नाशिक सहल !!
         शुक्रवार दिनांक २१ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने त्रंबकेश्वर येथे  गेलो होतो. सकाळी सकाळी कुशावर्त येथे स्नान करुन निवृत्तीनाथ समाधी मंदिरात दर्शन घेतले. लगेचच साईटसीन पाहण्यासाठी बाहेर पडलो.सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी आम्ही गेलो.त्रंबकेश्वर ते सप्तश्रृंगीगड हे ११० कि. मी. अंतर आहे. सप्तश्रृंगी गडावर जाण्यासाठी १० कि.मी.चा घाटातून प्रवास करावा लागतो.
        देवीच्या दर्शनासाठी रोपवेची सोय आहे. अगदी अल्पवेळात गडावर जाता येता येते.
      सप्तश्रृंगी गडाविषयी--
     सप्तश्रृंगी गड नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात नांदुरी येथे आहे. भारतात  विशेषतः मराठा व भिल्ल जमातीचे लोक या देवीची पूजा करतात. काहीजण तर  तिची कुलदैवत म्हणून उपासना करतात.महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मंदिर आहे. हे शक्तीपीठ अर्धे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते.
           नंतर श्री स्वामी समर्थ सेवा( दिंडोरी प्रणित) येथील अध्यात्मिक केंद्रास भेट दिली.आपल्या जीवनात संस्काराला खूपच महत्व आहे. या समर्थ सेवा केंद्रात, बालसंस्कार व युवा प्रबोधन, विवाह संस्कार,आरोग्य व आयर्वेद, कृषिशास्त्र,भारतीय संस्कृती, कायदेविषयक सल्ला,वास्तुशास्त्र, प्रशिक्षण, पर्यावरण, पशु व गोवंश,माहिती तंत्रज्ञान असे विभाग आहेत. या विभागाच्या माध्यमातून येथे सेवा केली जाते.विचारी माणसाने दिवसा असे कर्म करावे कि, त्याला रात्री सुखाने झोप येईल व तरुणपणात  असे कर्म करावे कि, म्हातारपणात सुख मिळेल आणि जन्मभरात असे कर्म करावे कि ,परलोकात देखील सुख मिळेल - प.पू. गुरुमाऊली असा बोर्ड वाचनात आला की जो खूपच विचारकरण्याजोगा आहे.
         नाशिक शहरात रामकुंड यास्थळाला भेट दिली.नाशिक शहरात राज्यस्थरावरील पोलीस अकादमी,आरोग्य विज्ञान विद्यापीठ या संस्थाचे
फलक दिसून आले. त्रंबकेश्वरच्या परतीच्या मार्गाला अंजनेरी पर्वत आहे. या पर्वतावर हनुमानाचा जन्म झाला होता ,तेथे हनुमानाचे भव्य मंदिर आहे तेही पाहता आले.
   आजच्या दिवसात काही धार्मिक स्थळे,काही सेवा केंद्रे पाहता आली यामधून आपण अध्यात्माचा वारसा जतन करायला हवा, जनतेची सेवा करायला हवी,नवनवीन प्रशिक्षणे घ्यायला हवीत हाच संदेश मिळतो.
     शब्दांकन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८





बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

औषधी व सुगंधी वनस्पती कार्यशाळा, वर्णे

औषधी व सुगंधी वनस्पती कार्यशाळा, वर्णे
  शेतकऱ्याच्या आर्थिक समृध्दीसाठी
   जिरेनियम लागवड फायद्याची -- डॉ .महेंद्र
     दारोकर
    शेतकऱ्यांच्या उत्पन्नात हमखास वाढ होणेसाठी जिरेनियम या सुगंधी वनस्पतीची लागवड करणे फायदेशीर असल्याचे मत लखनौ येथील औषधी व सुगंधी वनस्पती संशोधन केंद्रातील संशोधक  डॉ. महेंद्र दारोकर  यांनी वर्णे  येथे आयोजित केलेल्या
 कार्यशाळेत व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की,जिरेनियम लागवड करणेसाठी शेतकऱ्यांनी आपली रोपे स्वतःच तयार करावीत. पिकाची लागवड  करण्यासाठी एक वर्षभर अगोदर तयारी करणे गरजेचे आहे.आपणास लागणारे मदर प्लॅन्टस सीमॅप ही संशोधन संस्था मोफत पुरवेल त्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही.आपण कोणत्याही मध्यस्थाच्या आमिषाला बळी पडू नका. या पिकासाठी लागणारी सर्व माहिती लागवड ते प्रक्रिया आपणास पुरवण्यात येईल.
          डॉ. राजेश वर्मा म्हणाले की, हे पीक महाराष्ट्राच्या हवामानात येऊ शकते.त्यांनी पिकाची लागवड शक्यतो बेडवर करावी.  गांडूळ खत,कंपोस्ट खताचा अधिक वापर करावा. पहिली कापणी १४० दिवसात घ्यावी. नंतरच्या कापन्या १०० दिवसांनी घ्याव्यात. कापणी योग्यवेळी झाली नाही तर तेलाच्या गुणवत्तेत फरक पडू शकतो आणि त्याचा परिणाम किंमतीवर होऊ शकतो. पावसाळ्यात हे पीक घेता येत नाही. रोपे वाचवण्यासाठी संरक्षित जागेची गरज आहे.
    डॉ.आश्विन ननावरे यांनी तेल काढण्याच्या विविध पध्दती बाबतची सविस्तर माहिती सांगितली.डॉ. संतोष केदार यांनी चलचित्राच्या
 माध्यमातून पिकाच्या लागवड ते कापणी पर्यंतच्या विविध अवस्थाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
          कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे विषय विशेषज्ञ डॉ. भूषण यादगीरवार यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीबाबत सातारा जिल्ह्यातील स्थितीचा ऊहापोह केला. सातारा जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी
 अतुल महामुलकर यांनी औषधी व सुगंधी वनस्पतीची लागवडीची वाढ होण्यासाठी शासन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ३० ते ७०% पर्यंत सवलत देत असल्याचे सांगितले. गटाच्या माध्यमातून पीक लागवड केली तर त्याला अधिक मदत शासन स्तरावरुन पुरवली जाईल.
       वर्णे येथील प्रगतशील शेतकरी अजित दादासाहेब पवार यांनी आपल्या शेतावर सुगंधी वनस्पतीची  कार्यशाळा आयोजित करुन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केल्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेळके यांनी आपल्या मनोगतात समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांनी ऊस शेतीबरोबरच औषधी व सुगंधी वनस्पतीकडे वळण्याचे आवाहन केले.
             कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार यांनी केले तर पाहुण्यांचे स्वागत अजित पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्रीकांत घोरपडे यांनी केले.
             या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून शेतकरी प्रतिनिधीसह  वर्णे पंचक्रोशीतील अनेक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित दादासाहेब पवार यांच्या मित्रसमूहातील सर्वच कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या पिकाबाबत अधिक माहिती हवी असेल तर संबंधितानी अजित दादासाहेब पवार ७७२२०३५१११ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
        आजच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांनी औषधी व  सुगंधी वनस्पतीची लागवड गटशेतीच्या  माध्यमात करुन आर्थिक वृध्दी करण्याचा संदेश मिळाला.
      शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८







रविवार, १६ फेब्रुवारी, २०२०

!! पुणे महामॅरेथॉन २०२० !! २१ कि.मी . २ तास २७ सेकंद .

!! पुणे महामॅरेथॉन २०२० !!



  आज रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पुणे येथे  दैनिक लोकमतच्या पुढाकाराने महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २१ कि. मी. , १०कि. मी., ५कि. मी., ३ कि. मी.अशी होती. मी २१ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. आज ही स्पर्धा मी २:००:२७ दोन तास सत्तावीस सेकंदात पूर्ण केली. आज माझ्या बरोबर पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.देवेंद्रकुमार जाधव होते.
                  लोकमतने यापूर्वी कोल्हापूर, नाशिक,नागपूर, औरंगाबाद येथे अशा स्पर्धा घेतल्या होत्या. शर्यत पूर्ण करणे म्हणजेच "क्रॉस द लाईन" ही स्पर्धेची थीम होती. लोकमतने या उपक्रमाच्या माध्यमातून हजारो लोकांना धावण्यास प्रोत्साहित केले.
        २१ कि. मी.ची. स्पर्धा सकाळी ६:१५ ला सुरु झाली. सुरुवातीला जनगणमन हे राष्ट्रगीत झाले. मान्यवरांचे हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आला. स्पर्धेपुर्वी झुंबा डान्सचे अतिशय चांगले नियोजन केले होते. स्पर्धेसाठी रुटसपोर्ट छान होता.

        अशा स्पर्धेतून लोकांना व्यायामाची सवय लागते.  या स्पर्धेसाठी मला माझे भाचे श्रीकांत घोरपडे यांचे सहकार्य झाले. लोकांनी व्यायाम करुन आपले शरीर सुदृढ करावे. निरोगी शरीरातच निरोगी मन असते. म्हणून सगळ्यानी व्यायाम करावा व निरोगी राहावे असे वाटते.

Dear Rajendra Vitthal Pawar, Congratulations on successfully completing Pune Maha Marathon 2020 - 21K Run in 02:00:27. My Race Timing Solutions
    शब्दांकन --राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

!! माधवबाग क्लिनिक ठाणे उदघाटन समारंभ !!

!! माधवबाग क्लिनिक ठाणे उदघाटन समारंभ !! (१३ फेब्रुवारी )
   स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घ्या --
    खा. सुप्रिया सुळे



          गुरुवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ठाणे येथील  माधवबाग शाखेच्या उदघाटन  प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना त्या म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आरोग्याची स्वतः काळजी घेतली पाहिजे. रोज नियमित व्यायाम केला पाहिजे. व्यायामासाठी वेळ हीच सुदृढ आरोग्याची गुरुकिल्ली होय. आपणच जीवनशैली बदलली आणि आजाराला निमंत्रण दिले. पूर्वी ऋतुमानानुसार आपण आहार घेत होतो. आपले सणवारही तसेच होते. त्यामुळे आपणास आवश्यक असणारी ऊर्जा मिळत होती.
           आज आपण जंकफूडच्या मागे लागलो आहोत. आईलाही वेळ नाही अशी स्थिती झाली आहे. आपणास चांगल्या दर्जाचा आहारच मिळत नाही. खरंतर सेंद्रिय अन्नपदार्थांचे सेवन  आपण करायला हवे. माधवबागमध्ये स्थूलता, हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब यावर शस्त्रक्रिया टाळून आयुर्वेदिक पध्दतीने उपचार केले जातात याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. प्राथमिक आरोग्य केंद्रात देखील आयुर्वेदिक उपचार पध्दतीची सोय असली पाहिजे असेही मत त्यांनी मांडले.
                याप्रसंगी चित्रपट निर्माते मानसिंग पवार, उद्योजक श्रीकांत पवार, तुकाराम काकडे, सौ.ऋतुजा जितेंद्र आव्हाड, सौ. वैशालीताई शिंदे, ठाण्याचे नगरसेवक संजय वाघुले, अॅड. राहुल पवार, दादासाहेब काळंगे यांची विशेष उपस्थिती होती.
              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले की, सौ. स्वाती पवार व श्री विकास पवार यांचे गाव माझ्या मतदार संघात असून ते ठाणे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगात कार्यरत असल्याचा मला अभिमान वाटतो. ते यापूर्वी हॉटेल, जिम  यासारख्या व्यवसायात कार्यरत होते. हा व्यवसाय सांभाळून वैद्यकीय क्षेत्रातील पदार्पण निश्चितच दिशादर्शक आहे. एखाद्या रुग्णाला गरजेप्रमाणे माधवबाग सेवा उपलब्ध होणार आहे. निरामय आरोग्य राहण्यासाठी गरजूंनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
         यावेळी माधवबागमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांचा सत्कार खासदार सौ. सुप्रिया सुळे यांच्याहस्ते करण्यात आला. तसेच मतिमंद असलेल्या व्यक्तीसाठी कार्यरत असलेल्या ठाणे येथील जागृती पालक संस्थेला व सातारा जिल्ह्यातील वर्णे येथील माध्यमिक शाळेला प्रत्येकी ५१०००/- रुपयांची देणगी श्री. विकास पवार यांनी दिली. त्या रक्कमेचा धनादेश संबंधित संस्थाप्रमुखांनी स्वीकारला.
      यावेळी क्लीनिक हेड करिष्मा खैर-लाड यांनी माधवबागमध्ये राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. फ्रॅंचायझी ओनर विकास पवार यांनी पाहुण्यांचे स्वागत  तसेच उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिध्द निवेदिका स्मिता गव्हाणकर यांनी केले.
         सदरच्या कार्यक्रमासाठी  वर्णे येथील अष्टपैलू व्यायाम मंडळाचे कार्यकर्ते,  माधवबागचे सी.ओ.ओ.श्रीपाद उपासनी, सी.एम.ओ. डॉ. गुरुदत्त अमीन, स्टेटिजिक हेड, योगेश वालावलकर, रिजनल हेड सुशांत कुलकर्णी, रिजनल मेडिकल हेड, डॉ. निलेश कुलथे  आदिसह वर्णे व ठाणे येथील श्री. विकास पवार यांचेस्नेही बहुसंख्येने उपस्थित होते.
        आपण आपल्या उद्योग, व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातील काही वाटा सामाजिक दायित्व म्हणून समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांना द्यायचा असतो हा संदेश मिळाला असे वाटते.

     शब्दांकन -- राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८




गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण हाच ग्रामविकासाचा खरा पाया :- भास्करराव पेरे-पाटील

शिक्षण, स्वच्छता, वृक्षारोपण हाच  ग्रामविकासाचा खरा पाया :- भास्करराव  पेरे-पाटील



            स्वामी विवेकानंद ग्रंथालय अंगापूर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना पाटोदा जि. औरंगाबाद येथील  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सरपंच  भास्करराव पेरे- पाटील म्हणाले की, शिक्षण, स्वच्छता,  वृक्षारोपण  हाच ग्रामविकासाचा खरा पाया होय.  पिण्याचे पाणी शुध्दच हवे, सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत पाण्याचे प्रदूषण होता कामा नये. झाडे आपला प्राण आहेत. त्यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही  कारण ते आपणास ऑक्सिजन देतात. म्हणून आपण लोकसंख्येच्या प्रमाणात झाडे लावली पाहिजेत. थोडक्यात माणसी चार झाडे लावली पाहिजेत आणि ती जगवली पाहिजेत.
           गावच्या विकासात सुसंवाद असला पाहिजे. प्रत्येकाने घरपट्टी लवकर भरली पाहिजे त्यामोबदल्यात पिण्याचे आर.ओचे पाणी ग्रामपंचायतीने मोफ़त दिले पाहिजे. पाटोदा येथे सर्व गावकऱ्यांना आंघोळीचे गरम पाणी पुरवलं जाते. इतकेच नव्हे तर महिलांना कपडे धुण्यासाठी  चारपांच ठिकाणी धोबी घाटाची व्यवस्था केली आहे. रस्त्यावर कोणी थुंकू नये यासाठी वॉश बेसीनची व्यवस्थादेखील केली आहे.सर्व गावाला मोफत दळण दळून दिले जाते. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ट्रॅक्टर घेतला असून अगदी अल्पदरात मशागतीची कामे करून दिली जात आहेत.
         महिलांच्या आरोग्याची काळजी घेन्यासाठी सॅनिटरी नॅपकिन्स मोफत दिली जातात. गावाच्या भल्यासाठी काही प्रथा बदलल्या पाहिजेत. नव वर वधू घरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांचे हस्ते झाड लावले जाते. एवढेच नव्हे तर मृत व्यक्तीची राख पाण्यात न मिसळता ती झाडांना घातली जाते. त्या व्यक्तीच्या नावे झाड लावले जाते.  आपण महिलांचा मान सन्मान राखला पाहिजे कारण त्या लक्ष्मी आहेत. पती पत्नीमध्ये सुसंवाद असायला हवा. कोणत्याही गोष्टीत चांगलं बघायला शिका.विज्ञानाची कास धरा. जो जो आपणास चांगलं शिकवतो तो आपला गुरु होय. आई वडील यांची सेवा करा.
                मतदानाविषयी ते म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत पैसे घेऊन मतदान करु नका. सबसिडी आपल्या विकासातील अडसर आहे. निसर्ग नियमाने वागलो तर आपले काहीच नुकसान होत नाही. शाळेतील मुलांनी ग्रामस्वच्छता तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी आठवड्यातील एक  तास द्यावा . प्लास्टिकचा वापर टाळा.जवानाप्रती आदर व्यक्त करा असेही ते म्हणाले.
          कार्यक्रमाचे  प्रास्ताविक ओंकार देशमुख यांनी केले.प्रास्ताविकात स्वामी विवेकानंद ग्रंथालय राबवत असलेल्या सर्व उपक्रमांची माहिती  त्यांनी दिली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच द्वीप प्रज्वलन करुन केली.आभार प्रदीप कणसे यांनी मानले. कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी अमोल कणसे, व्यावसायिक व समाजसेवक प्रशांत कणसे आदींसह पंचक्रोशीतील गावचे सरपंच, ग्रामसेवक, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
        भास्करराव पेरे - पाटील यांचे सारखे सरपंच सर्व गावाना लाभले तर संपूर्ण राज्याचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही. असे सरपंच सगळ्या गावाना लाभावेत असे वाटते.
   शब्दांकन - राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

!! शेतीविषयक कार्यशाळा - वर्णे !!

!!  शेतीविषयक कार्यशाळा   !!
      बुधवार दिनांक ५ फेब्रुवारी २०१९ रोजी मा.मानसिंग पवार यांचे घरी शेतीविषयक कार्यशाळा संपन्न झाली.
    कार्यशाळेत चर्चिलेले विषय:-
१)मल्टीलेअर फार्मिंग -कमी कालावधीत तयार होणारी कोणतीही पिके साखळीपध्दतीने लावणे.उदा.आल्यात तोंडली,कोथिंबीर, किंवा अन्य भाज्या. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात अशा शेतीचा प्रारंभ झाला.
२)मसाला पिकांची शेती - मोहरी, जवस  किंवा सावलीत वाढणारी अन्य पिके. अशा प्रकारची शेती कोकणात केली जाते.
३)औषधी व सुगंधी वनस्पतीची शेती-सध्या गावात शतावरी,जिरेनियंमची शेती केली जाते. या शेतीमध्ये देखील वाढ होण्यास भरपूर वाव आहे.
          यावेळी मानसिंग पवार यांना आर.सी.एफ कडून प्रजासत्ताकदिनी " जीवन गौरव" पुरस्कार    मिळालयाबद्दल ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.


     शब्दांकन -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

!! अविस्मरणीय - वासोटा ट्रेकिंग !!

       !! अविस्मरणीय - वासोटा  ट्रेकिंग !!
                        आज ०२:०२:२०२० एक वेगळा दिवस, सातारा हिल रनर्सचे श्री. निलेश माने यांनी वासोटा ट्रेकिंगचे आयोजन केले होते. वासोटा ट्रेकिंग साठी साताराहून सात वाजता प्रयाण केले. सातारा ते बामणोली हा प्रवास कारने केल्यामुळे जलद झाला. बामणोलीहून वासोटा येथे जाण्यासाठी आपणास बोटीने प्रवास करावा लागतो. बोटीने प्रवास करण्यासाठी सव्वा तास लागला. कोयनानगर येथे कोयना नदीवर धरण बांधले असून त्यास शिवसागर जलाशय असे संबोधले जाते. हे महाराष्ट्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण धरण आहे. याची पाणी साठवणक्षमता १०५ टी. एम. सी. एवढी आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी साधारण दीड तासाचा वेळ लागतो.
             वासोटा किल्ला कोयना धरणाच्या शिवसागर जलशयामुळे दुर्गम झाला असून अथांग पाण्याने वेढल्यामुळेच वासोटा किल्ल्या भोवतालची अमूल्य जंगलसंपत्ती व वन्यजीवनही सुरक्षित राहिले आहे .समुद्र सपाटीपासूनची वासोटा किल्ल्याची उंची ३६१४ फूट आहे. वासोटा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार वंशीय दुसरा राजा भोजकडे जाते. प्रथमतः शिर्के व मोरे यांचेकडे वासोट्याचा ताबा गेला.
           ६ जून १६६० रोजी शिवरायांनी वासोटा किल्ला जिंकला. शिवरायांनी या किल्ल्याचा वापर कैद्यांना ठेवण्यासाठी केला. राजापूर प्रकरणी पकडलेल्या रेव्हींग्टन व इतर इंग्रजांना शिवरायांनी याच किल्ल्यावर ठेवले होते. आज मात्र सर्वत्र जुन्या बांधकामाचे अवशेष दिसत आहेत. बांधकामासाठी चुन्याची घाणी दिसुन आली. राजवाड्याचा चौथरा झाडीतून स्पष्टपणे दिसून येत आहे. किल्ल्यावर शंकराचे तसेच मारुतीचे मंदिर आहे. ठिकठिकाणी टेहळणी बुरुज आहेत. पाण्याची तळी आहेत. बाबुकडा  एक अवघड बुरुज आहे. तेथून आपण रत्नागिरी जिल्ह्यातील गावे सहजपणे बघु शकतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे वन्य प्राण्यांचे जतन व्यवस्थित रित्या झालेले आहे. प्रामुख्याने तेथे वाघाबरोबर, तरस, गवा, सांबर, राण उंदीर, साळींदर, उद मांजर, हरीण यासारखे अनेक  प्राण्यांचा या जंगलात आदिवासी दिसून येतो. विविध जातीचे पक्षी आश्रयासाठी आहेत.
         आपल्या जीवनामध्ये जंगलांना अनन्यसाधारण महत्व आहे. ते वन्यजीवांच्या आदिवसासाठी उपलब्ध तर आहेतच तसेच ते मानवासाठी उपकारक आहेत.
          आपण जंगल, वन्यप्राणी, पशु पक्षी यांचे संवर्धन करायला हवे. तसेच अश्या ऐतिहासिक ठिकाणी आयुष्यात एकदातरी भेट देऊन इतिहासही जाणून घ्यायला हवा.

वन पर्यटन - राजेंद्र पवार
मोबा - 9850781178

















!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...