सोमवार, २९ जुलै, २०२४

!! पुणे ते बारामती आरोग्यवारी १०० किलोमीटर (२८ जुलै २०२४)

 !! पुणे ते बारामती आरोग्यवारी १०० किलोमीटर (२८ जुलै २०२४)

                   महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढ दिवसानिमित्त रिले रनचे आयोजन केले होते. यामध्ये स्पर्धक १०,२१,५० आणि १०० किलोमीटरमध्ये भाग घेऊ शकत होते.मी १०० किलोमीटरच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा पहाटे ४ वाजता सारसबाग पुणे येथून मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफने सुरु झाली. या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय असे क्रमांक काढले जाणार नव्हते. ही स्पर्धा पूर्ण करणे एवढेच अपेक्षित होते. ही स्पर्धा पूर्ण करणे हेच मोठे स्पर्धकापुढे आव्हान होते.




                 आपणा सर्वांच्या कृपाआशीर्वादाने ते आव्हान पूर्ण  करता आले.स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धकांच्यापुढे त्यांचा जोश वाढवण्यासाठी एका खास जीपचे आयोजन केले होते. त्यामध्ये गाणी वाजवली जात होती त्यामुळे गाण्यांच्या ताला - सुरावर स्पर्धकांचे पाय भिरकत होते. आजचा स्पर्धेचा मार्ग हा हडपसर, दिवेघाट, झेंडेवाडी, सासवड, मल्हारगड -जेजुरी, मोरगाव, कऱ्हावागज, नेवसेवस्ती, बारामती असा होता. 

                आज वातावरण खुपचं छान होते, निसर्गराजा जणू आमच्या स्वागतासाठी बरसात करत होता. संपर्ण स्पर्धा मार्गावर तुषार सिंचन होत होते असे  म्हटले तर वावगे होणार नाही. पावसामुळे स्पर्धक चिंब होऊन जात होते.संपूर्ण दिवसभर सूर्य नारायणाचे दर्शन झाले नाही. ही बाब स्पर्धकासाठी पोषक ठरली. मला तर या वातावरणाचा फायदा झाला. मार्गामध्ये शारिरीक क्षमतेचा कस बघणारा दिवेघाट सर्व रनर्सची जणू  कठीण परीक्षा घेत होता. बारामतीकरांचा रूट सपोर्ट हा नेहमीच छान असतो असे ऐकून होतो आज त्याचा प्रत्यय आला. प्रत्येक दोन किलोमीटरवर  हायड्रेशन पॉईंट होते त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्याची काहीच अडचण आली नाही. आज ही स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरचा आनंद हा अवर्णनीय आहे. या वयात मोठ्या स्पर्धेत भाग घेणे आणि ती पूर्ण करणे हेच एक मोठे आव्हान असते. ते आव्हान लिलया पेलले. 

                     १०० किलोमीटरची स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर सत्कार समारंभाचे आयोजन नटराज सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे क्रीडामंत्री आदरणीय संजय बनसोडेसाहेब उपस्थित होते त्यांच्या हस्ते आमचा सन्मान करण्यात आला.यावेळी जयदादा पवार, जिल्हा क्रीडाधिकारी, तालुका क्रीडाधिकारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश ननावरे उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष ननावरे सरांनी प्रास्ताविक केले. अजितदादा पवार यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी गत पाच वर्षापासून या स्पर्धेचे आयोजन केले जाते. त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. १०० किलोमीटर अंतर पूर्ण  करणाऱ्यांचा सत्कार मा.क्रीडा मंत्री संजय बनसोडे व जयदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धा मार्गावर जेजुरी जवळ आमचे बंधू डॉ. दत्ता भोसले आणि त्यांच्या सर्व कुटुंबीयांची भेट दिली. त्यांनी दिलेले प्रोत्साहन आणि इनर्जी फूडने आमचा उत्साह द्विगुणित झाला. आज प्रोत्साहन देण्यासाठी शिवकृपाचे संचालक रमेश चव्हाण हेही आले होते. आज माझ्यासोबत विशाल  घोरपडे, ओंकार पोतेकर होते त्यांच्या साह्याने मला ही स्पर्धा  नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य झाले. आरोग्यासाठी चालणे, धावणे हा उत्तम मार्ग आहे.

                   आपणही आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी चालणे, धावणे किंवा कोणताही व्यायाम प्रकार निवडावा,त्यात भाग घ्यावा आपले आरोग्य चांगले राखावे असे वाटते.

  राजेंद्र पवार 

  संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

  ९८५०७८११७८

  ८१६९४३१३०६

सोमवार, २२ जुलै, २०२४

वयाच्या ६५ व्या वर्षी प्रोकॅम स्लॅम मुंबई - बेंगलुरु - दिल्ली- कोलकत्ता यशस्वीरित्या पूर्ण

वयाच्या ६५ व्या वर्षी प्रोकॅम स्लॅम मुंबई - बेंगलुरु - दिल्ली- कोलकत्ता यशस्वीरित्या पूर्ण

             मी  मे २०१७ ला नियत  वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो. निवृत्तीनंतर उद्योजक श्रीकांत पवार यांच्या प्रेरणेने सेवा निवृत्तीनंतर मॅरेथॉन स्पर्धामध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.प्रथमत सातारा हील मॅरेथॉनमध्ये  भाग घेतला. पहिल्याच प्रयत्नात दोन तास तेरा मिनिटात ही अवघड स्पर्धा पूर्ण केली. मी या स्पर्धेपूर्वी कोठेही भाग घेतला नव्हता. नंतर मात्र मी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊ लागलो. बऱ्याच स्पर्धात मी प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले.


           मी १० किलोमीटरपासून १०० किलोमीटर स्पर्धेत भाग घेतला. सातारा येथील धावपटू अनिल माने यांच्यामुळे प्रोकॅम स्लॅममध्ये भाग घेतला. या प्रोकॅम स्लॅममध्ये सन २०२३ मध्ये भाग घेतला. प्रथम मी १५ जानेवारी २०२३ ला  टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये ४२ किलोमीटर मध्ये भाग घेतला. ही स्पर्धा ४:३३:५८ (चार तास तेहतीस मिनिटे व अट्टावन सेकंदात) पूर्ण केली. पहिल्याच प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या कॉम्रेड रनसाठी पात्र ठरलो. टीसीएस १० के बेंगलुरु ही स्पर्धा  २१ मे २०२३ रोजी ( १० किलोमीटरची )स्पर्धा झाली. ही स्पर्धा ५० :२६ ( पन्नास मिनिटे सव्वीस सेकंदात ) पूर्ण केली. दिल्ली येथे १६ ऑक्टोबर २०२३ वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला. ही स्पर्धा १:४९:४२ ( एक तास एकोन पन्नास मिनिटे आणि बेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. टाटा स्टील कोलकत्ता ही पंचवीस किलोमीटरची स्पर्धा १७ डिसेंबर २०२३ रोजी कोलकत्ता येथे झाली मी ही स्पर्धा २:२१:१७ ( दोन तास एकवीस मिनिटे सतरा सेकंदात ) पूर्ण केली.

             या चारही स्पर्धा मी एका वर्षात पूर्ण केल्या. सातारा येथील सात आठ लोकांनी प्रोकॅम पूर्ण केल्याबद्दल वृत्तपत्रांनी देखील आम्हाला चांगलीच प्रसिध्दी दिली. प्रो कॅम पूर्ण केल्याबद्दल संयोजकाच्या वतीने आज मला गिफ्ट मिळाले. गिफ्टमध्ये चारही स्पर्धेतील आमचे धावतानाचे फोटो, कॅप, टी शर्ट आदि साहित्य मिळाले.

      आपण सातत्यपूर्ण सराव केला तर अशा स्पर्धेत भाग घेऊ शकतो तो आपण घ्यावा असे मला वाटते.

      राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

मंगळवार, १६ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस सतरावा १६ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस सतरावा १६ जुलै)

           आमचा कालचा मुक्काम वाखरीनजिक गणेश पाटील यांच्या वडाच्या वस्तीवर होता. आज पालखी उशिरा मार्गस्थ होणार असल्याने आम्ही थोडं निवांतच होतो. काल रात्री पाऊस पडल्याने वारकऱ्यांना पावसापासून बचाव करण्यासाठी खूपच कसरत करावी लागली. आज सकाळी छानपैकी सत्संग झाला. आज दुपारी अडीच वाजता ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. सुरुवातीचा काही काळ पालखी सोहळ्यात चालणे झाले. नंतर मात्र एकाएका जागेवर अर्धा तास, एक तास थांबावे लागे.



                  आमच्या पुढे संत तुकाराम महाराजांची पालखी होती. वाखरी ते पंढरपूर हे अंतर केवळ पाच किलोमीटर असून ते पार करण्यासाठी लागणारा वेळ मात्र आठ, नऊ तासांचा होता. प्रत्येक दिंडी विविध प्रकारचे खेळ खेळण्यात व्यस्त होत्या. हे खेळ पाहणे, विविध पालख्यांची दर्शन घेणे यासाठी दुतर्फा गर्दी होती.







                  आज रथ ओढण्याचा मान पंढरपूर येथील वडार समाजाला आहे. पंढरपूर येथील अनेक लोक माउलींना आणण्यासाठी वाखरीच्या  दिशेने जातात.विठूरायाच्या  दर्शनासाठी आसुसलेले वारकरी बेभान होऊन नाचत असल्याचे सर्वत्र दिसून येत होते. प्रत्येक पालखी चंद्रभागेला येतेच. तेथे आरती होते.  माऊलींच्या मंदिरात  आरती होते. दिंडी चालकांच्या घरीदेखील आरती होते.मगच वारीची सांगता होते.

                 या वेळची वारी सफल होण्यामध्ये दिलीप चव्हाण, गोरख चव्हाण, ज्ञानेश्वर सावंत, सुधाकर अमृतकर, शिरीष देशमुख, सी.बी. पवार आदि मंडळींचा वाटा आहे.  पुन्हा पुन्हा वारी घडावी हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

      राम कृष्ण हरी 

       राजेंद्र पवार 

        संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस सोळावा १५ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस सोळावा १५ जुलै) 

                आमचा भंडीशेगावचा मुक्काम ज्ञानेश्वर यलमार यांच्या घरी  होता. आज पालखी उशिरा मार्गस्थ होणार असल्याने पहाटे लवकर उठण्याची आवशक्यता नव्हती. आज ज्ञानदीप को - ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची पंगत होती. या पंक्तीतच सकाळच्या भोजनाचा आस्वाद घेतला. भंडीशेगावला संत तुकाराम, सोपानदेव आदि पालख्या एकत्र आल्याने सर्वत्र गर्दीचा महापूर दिसत होता.





          आज दुपारी एक वाजता माऊलींची पालखी वाखरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज दिंड्या पुढे सरकण्याचा वेग अत्यल्प होता. ज्ञानबा - तुकारामाचा  गजर सर्वत्र वाऱ्याच्या लाटेप्रमाणे येत होता. पालखी तळापासून साधारण अडीच किलोमीटर अंतरावर उभे रिंगण झाले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी वाढत चालली होती. थोड्याच वेळात बाजीरावाची विहीर हे ठिकाण आले. याठिकाणी पालखी मार्गावर सर्वात मोठे रिंगण असते. या रिंगणात मोठ्या प्रमाणात खेळ खेळले जातात. येथे अनेक मानवी मनोरे पाहायला मिळतात. टाळ मृदंगाच्या गजरात फुगड्या खेळताना पाहिले. रिंगण पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची भरपूर गर्दी असते. हे रिंगण मोठे असल्याने अनेक दिंड्याना आत येण्याची संधी मिळाली. प्रत्येक दिंडी आपले वेगळेपण खेळाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतात. गर्दी नियंत्रणात आणणे, त्यांना शिस्त लावणे यामध्ये पोलिसांची मोठी कसरत असते. वाखरीचा पालखी तळ  हा सर्वात मोठा तळ आहे. एखादी व्यक्ती गर्दीत चुकली तर त्यांना अपेक्षित ठिकाण सापडणे खूप अवघड आहे. फोनच्या माध्यमातून संपर्क होणे अवघड आहे.

       आज रस्त्यावर वारकऱ्याशिवाय आपण काहीच पाहू शकत नव्हतो. आज राष्ट्रीय सेवा योजनेची जलसंवर्धन दिंडी पाहायला मिळाली. सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे या दिंडीचे नेतृत्व करीत होते. गेल्या २० वर्षांपासून या दिंडीचा उपक्रम चालवला जातो. यावर्षी जलसंवर्धन ही थीम घेऊन ही दिंडी चालली आहे. या दिंडीचे नेतृत्व शरदचंद्र पवार महाविद्यालय जेजुरीचे प्रा. डॉ. राजकुमार रिकामे करतात. रिकामे सर खऱ्या अर्थाने कामसू वाटले.या दिंडीत पूणेसह अमरावती, जळगाव, सोलापूर आदि सात विद्यापीठे सामील झाली आहेत. या दिंडीत १४० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. पथनाट्य, भारुड, कीर्तन या माध्यमातून जनतेचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. ही मुले दमलेल्या वारकऱ्यांच्या पायांना मसाज करतात. रिंगणात पोलिसांना मदत करतात. जलसंवर्धन करण्यासाठी शासन राबवत असलेले उपक्रम पथनाट्याद्वारे सांगितले जातात, यामध्ये टॉप टू बॉटम पाणी अडवणे, सी.सी.टी.चरी काढणे, गाळमुक्त धरण, मातीचे बंधारे बांधणे आदि योजनांची माहिती दिली  जात होती.

 आपण सर्वजण जलसंवर्धनासाठी प्रयत्न करुया.पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवूया.

       राजेंद्र पवार 

        संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 ९८५०७८११७८

 ८१६९४३१३०६

सोमवार, १५ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस पंधरावा १४ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (  दिवस पंधरावा १४ जुलै)

   आमचा कालचा मुक्काम वेळापूर येथे कुमार पवार यांच्या घरी होता. पंढरीच्या वाटेवर सेवा करण्यात लोक अजिबात कमी पडत नाहीत. आज सकाळी साडेसहा वाजता पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. थोड्याच वेळात ठाकूर बुवा समाधी स्थळ उघडेवाडी येथे आजचा रिंगण सोहळा पार पडला. रिंगण पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी भरपूर गर्दी असते. रिंगणात दोन अश्व धावत असतात. एका अश्व माऊलींचा असे मानले जाते. थोडक्यात सांगायचे म्हटले तर त्यावर माऊली विराजमान आहेत असे मानले जाते. हा अश्व रिंगणात धावत असताना त्याच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोकांची झुंबड उडालेली असते. प्रत्येक ठिकाणच्या रिंगण सोहळा मनोहारी असतो.


             या रिंगण सोहळ्यानंतर तोंडले - बोंडले ही गावे येतात. तोंडले येथे एक मोठा ओढा आहे. निवृत्ती ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई ही भावंडे पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूर येथे जात असताना या ओढ्यातील पाण्यात खेळण्यात रंगून गेले होते. या पाण्यात स्नान केले होते. आता काळ बदलला आहे.ओढ्यावर भला मोठा पूल झाला आहे. परंपरा जपण्याच्या उद्देशाने तेथे शॉवरच्या माध्यमातून लोकांना चिंब करण्याचा प्रयत्न केला जातो. एवढे सगळे केले तरी एकमेकांना भिजवण्याचा आनंद काही वारकऱ्यांना मिळत नाही.

                   तोंडले  येथेच दुपारचे भोजन घेतले. आज शिवकृपाचे अध्यक्ष गोरख चव्हाण यांची दिंडीसाठी पंगत होती त्यामध्येच दुपारचे भोजन घेतले. आज संत सोपानकाका यांची पालखी, संत तुकाराम महाराजांची पालखी एकत्र आल्या. दसुर गावच्या हद्दीत संत सोपानकाका व ज्ञानेश्वर माउलीं  या बंधूंची भेट झाली. भेटीच्या वेळी माऊलींचा अश्व आत डोकावून पादुकांचे दर्शन घेतो. दोन्ही पालख्या जवळ येतात. एकमेकांना हार घालतात. दर्शनासाठी राज्यातील अनेक मान्यवर येत असतात. दर्शनासाठी माजी आरोग्य मंत्री  यांनीही भेट दिली होती.

       आज बऱ्याच ठिकाणी भावाभावात पटत नाही. त्यामुळे आपले खूप नुकसान होते. आजच्या बंधूभेटीचा आदर्श घेऊन भावाभावांचे संबंध कसे दृढ होतील, स्नेह कसा वृद्धिंगत होईल हे पाहावे असे वाटते.

 राजेंद्र पवार 

   संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

रविवार, १४ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस चौदावा १३ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट  (दिवस चौदावा १३ जुलै)

                   काल माऊलींचा मुक्काम माळशिरस येथे होता. माळशिरस येथे शिवकृपा पतपेढीची शाखा तसेच विभागीय कार्यालय आहे. पतपेढीच्या वतीने वारकऱ्यांना पाणी, केळी, चिक्कीचे वाटप संस्था अध्यक्ष मा. गोरख चव्हाण, संचालक शिरीष देशमुख, संचालक राजेंद्र पवार, संचालक संतोष चव्हाण, ज्ञानदीपचे माजी अध्यक्ष दिलीप चव्हाण आदींच्या शुभहस्ते करण्यात आले. मार्गावर दोन्ही संस्थांच्या वतीने आमची सोय होत आहे त्याचा आम्हास आनंद आहे. आज सकाळी साडेसहा वाजता ज्ञानेश्वर माऊलींची पालखी माळशिरसहून मार्गस्थ झाली. ग्रामस्थ भाविक मोठ्या संख्येने स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. माऊली, माऊली असा गजर सर्वत्र ऐकू येत होता. आज सकाळी खुडुस येथे गोल रिंगण झाले. रिंगण सोहळा पाहण्यासाठी सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. चेंगरा चेंगरीच्या भितीने गर्दीत जाणे आम्ही टाळतो. खुडूसमध्ये आमचे  विद्यार्थी नाथाजी केंजळे यांची भेट झाली. ते वारीत वाहतूक मुक्तीदलाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना मदत करत असतात. वारीतील त्यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे.



                 आज दुपारी विझोरी येथे पालखीने विसावा घेतला. आज सकाळपासून चालण्यासाठी पोषक वातावरण होते. मधेमधे वाऱ्याच्या झुळका आम्हाला सुखावत होत्या. वेळापूरला गावाजवळ तीव्र उतार आहे. या उतारावरून चालत असताना संत तुकाराम महाराजांना विठ्ठल मंदिराचा कळस दिसला, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या भेटीने आसुसलेले तुकाराम महाराज कळस निदर्शनास येताच धावू लागले. आजही या तीव्र उतारावर दिंड्या धावतात. आता पंढरपूर एकदम जवळ आल्याचा हा संकेत आहे. 

                आम्ही रथापुढील तीन नंबरच्या दिंडीतून चालत आहोत. वेळापूर येथे तीन नंबरच्या दिंडीला भारुड सादर करण्याचा मान आहे. यावेळी कलाकारांनी आपल्या कला सादर केल्या. इतकेच नव्हे तर येथे मराठा आरक्षणालाही वाचा फोडली. वारी हे प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. आज आय. टी. क्षेत्रातील अनेक तरुण तरुणी वारीत सहभागी झाले होते.






            सध्या मुलींच्या जन्मदराचा प्रश्न गंभीर आहे. साधारण तीस चाळीस वर्षांपासून ही समस्या भेडसावत आहे. बऱ्याच मुलांना लग्नाशिवाय राहावे लागत आहे ही वस्तुस्थिती आहे. आज शासन जशी काळजी घेत आहे तशी काळजी त्यावेळीच घेतली असती तर ही समस्या भेडसावली नसती. पण एखाद्या बाबीचे विदारक परिणाम निदर्शनास आल्याशिवाय आपण काळजी घेत नाही. स्त्री पुरुष जनन दर समान असणे गरजेचे आहे. पण आजही तो नाही. इंडियन मेडिकल असोशियशन अकलूज यांच्या माध्यमातून डॉ. रेवतीताई राणे, डॉ.संतोष खडतरे यांनी लेक लाडकी मोहीम राबवली होती. 

     "लेक लाडकी मोहीम, लेकच वाढवते वंशाला, लेकच आधार मायबापाला"

अशा आशयाचे फलक डॉक्टर मंडळींनी धारण केले होते. स्त्रीला समाजात आदराचे स्थान मिळावे यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण ही योजना नुकतीच राज्य सरकारने आणली आहे. थोडक्यात काय मुलीचे महत्व  समाजाला पटावे  यासाठी सगळा प्रपंच.

           आपण सगळेजण मुलीच्या जन्माचे स्वागत करुया. त्यांना आदराचे स्थान देऊया. मुलामुलींना समान न्यायाने वागवूया. थोडं अधिक महत्व मुलींना देऊया.

         राजेंद्र पवार 

     संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

९८५०७८११७८

८१६९४३१३०६

शनिवार, १३ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस तेरावा १२ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस तेरावा १२ जुलै)

               आमचा कालचा मुक्काम ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेत होता. ज्ञानदीप आणि शिवकृपा या महाराष्ट्रातील दोन मोठ्या संस्था. या दोन्ही संस्थामधील संबंध खूप जिव्हाळ्याचे, याचा काल पुन्हा एकदा प्रत्यय आला. ज्ञानदीपच्या भेटीला शिवकृपा असे समजून शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई या संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण, ज्येष्ठ संचालक शिरीष देशमुख, संचालक राजेंद्र पवार, संचालक संतोष चव्हाण या सर्वांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. या संस्थेचे ठेव प्रतिनिधी श्रीयुत बर्वे यांनी आमच्या स्नेह भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.


                आज साडेसहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सकाळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक माऊलींचे स्वागत करीत होते. माऊली, माऊली असा जयघोष होत होता. आज सकाळी माउलींनी मांडवे गावी विसावा घेतला. रस्त्यांची कामे झाल्याने जुनी ठिकाणे आम्हास सापडत नव्हती. दुपारचे भोजनाचे, विश्रांतीचे ठिकाण शोधताना आमची दमछाक झाली पण तिथे पोहोचताच आमचा थकवा दूर झाला. प्रा. प्रशांत कुंभार यांनी केलेली आमची सेवा चिरंतन स्मरणात राहण्यासारखी होती. याच ठिकाणी कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय बडदे यांची भेट झाली. वयाच्या चाळीशीनंतर त्यांनी मेडिकल चेकअप केले. डॉक्टरांनी काही औषधे सुचवली. औषधाच्या रिअँक्शनमुळे दृष्टीवर परिणाम झाला. कायमचे अंधत्व आले. योग्य उपचार झाले नाही तर शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो हे आज दिसून आले.

           आज दुपारी वारी मार्गावरील पहिलेच गोल रिंगण सदाशिवनगर येथे झाले. रिंगणात पालखी येत असताना अतिशय वाजत गाजत येते. दिंड्या टाळ, मृदंगाच्या तालावर गोल रिंगनात प्रवेश करत होत्या. पालखी  रिंगणात उभारलेल्या शामियान्यात स्थिरावली. सुरुवातीला सेवेकरी असणाऱ्या व्यक्तींनी पाच फेऱ्या मारल्या. याठिकाणी रीले खेळ प्रकाराची आठवण झाली. माऊलींचे अश्वानी प्रदक्षिणा मारताच, त्याच्या पायाखालील धूळ लोक आपल्या मस्तकी लावत होते. माऊलीप्रती असणारी श्रद्धा याठिकाणी व्यक्त होत होती.

              माऊलीचा अश्व रिंगणात आला असताना किंवा रस्त्यावरून चालत असताना लोक श्रधे पोटी त्याला स्पर्श करत असतात. पण शेवटी हा प्राणी आहे. त्याला त्रास झाल्यावर त्याचा प्रताप तो दाखवतो.

       ही वारी निर्मळ व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असते. रांगोळीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न झाला. यामध्ये विशेषत वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. झाडापासून आपणास ऑक्सीजन मिळतो. पुरेशी वृक्ष छाया नसेल तर ऑक्सीजन कसा मिळणार. ऑक्सीजनचे महत्व कोरोना काळात आपणास चांगलेच समजले आहे. भविष्याचा धोका ओळखून आपण अधिकाधिक झाडे लावूया आणि ती जगवूया.

     राजेंद्र पवार 

   संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

९८५०७८११७८

 ८१६९४३१३०६

शुक्रवार, १२ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस बारावा ११ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस बारावा ११ जुलै)

               सातारा जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम बरड येथे असतो.  नियोजित वेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता पालखी मार्गस्थ झाली. आम्ही माऊली सोहळ्याबरोबर असल्याने अनेकदा माऊलीच्या दर्शनाचा योग येतो. तसाच आज सकाळी जवळून दर्शन घेण्याचा योग आला. आज पहिला विसावा राजुरी येथील साधू बुवाचा ओढा या ठिकाणी झाला. विसाव्याच्या सर्वच ठिकाणी पालखी रथातून उतरवून वाजत गाजत नेली जाते. हा सोहळा अतिशय विलोभनीय असतो. राजुरीपासून काही अंतरावरच सोलापूर जिल्ह्याची  हद्द सुरु होते.



                 प्रशासनाच्यावतीने माऊलींचा स्वागत समारंभ फटाक्यांच्या आतशबाजीने संपन्न झाला. स्वागतासाठी राज्याच्यावतीने  सोलापूरचे पालक मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माढा मतदार संघाचे लोकसभा सदस्य मा.धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व अनेक मान्यवरांच्या शुभहस्ते झाले. प्रत्येक दिंडीवर फुलांचा वर्षाव होत होता. सातारा पोलिसांच्यावतीने पालखी सोहळा सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिला.हा सोहळा धर्मपुरी येथे पार पडला.

         आज दुपारचा विसावा कारुंडे या गावी होता. विसाव्याच्या ठिकाणच्या प्रत्येक गावाला यात्रेचे स्वरूप आलेले असते. शासनाच्या वतीने कॅनालला पाणी सोडलेले असल्याने लोकांच्या आंघोळीची व कपडे धुण्याची उत्तम सोय झाली आहे. आज उन्हाने फारसा त्रास दिला नाही. अधून मधून वाऱ्याच्या झुळका वारकऱ्यांना सुखावत होत्या.

           दुपारनंतर पानसकरवाडी येथे माउलींनी विसावा घेतला. या विसाव्यापासून शिखर शिंगणापूर खूप जवळ आहे. आमच्या दिंडीत देहू येथील गुरुकुलचे विद्यार्थी चालत असल्याने अतिशय शिस्तीत मार्गक्रमण चालू असते. ही दिंडी ह .भ.प.पांडुरंग घुले  महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. आज संध्याकाळी पालखी तळावर गेलो होतो. पालखी तळावर माऊलींच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती. पालखी तळावर पालखी वाजत गाजत नेली जाते. टाळ मृदंगाच्या गजरात सगळेच बेभान असतात. 

             वारीत चोपदाराला अनन्य साधारण महत्व असते. चोपदाराने दंड उंचवताच सर्वत्र शांतता पसरते. हरवलेल्या जिनसा, सापडलेल्या जिनसा यांचा उल्लेख होतो. ओळख पटवून देऊन, त्या घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते. दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा कधी मार्गस्थ होणार याची माहिती दिली जाते. वारीमध्ये स्वयंशिस्त असते. येथे पोलिसांना फारसा त्रास होत नाही. अशी शिस्त सर्वत्र राहिली तर गुन्हेगारी कमी व्हायला वेळ लागणार नाही.  शिस्तीने राष्ट्र मोठे बनते असे म्हटले जाते. आपण आपल्या राज्याच्या भल्यासाठी स्वयंशिस्त पाळूया. आपल्या राज्याला प्रगती पथावर नेण्यासाठी प्रयत्नशिल राहूया.

          राजेंद्र पवार 

      संचालक 

  शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

९८५०७८११७८

८१६९४३१३०६

बुधवार, १० जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस अकरावा १० जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट ( दिवस अकरावा १० जुलै)

  कालचा मुक्काम फलटण येथे होता. फलटण हे सातारा जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे.

प्रथम फलटण विषयी थोडक्यात माहिती....

              फलटण हे भारतातील एक पुरातन शहर आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिणकाशी म्हणून फलटण ओळखले जाई. दरवर्षी चैत्र वद्य प्रतिपदेला फलटणला घोड्यांची जत्रा होते. या जत्रेला पंजाब, बिहार, उत्तरी भारतातून भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. येथे एक प्रसिद्ध श्रीराम मंदिर आहे. ते फलटणचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. दर वर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात श्रीराम रथोत्सव साजरा केला जातो. यालाच रामयात्रा व रामदिवाळी असे  देखील म्हणतात. या यात्रेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. फलटण येथील पुरातन हेमाडपंथी जबरेश्वर मंदिरही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक वारसा असलेला तालुका आहे.

                  फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान होते. नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते. फलटण ही महानुभाव संप्रदायाचे चक्रपाणी महाराज यांची जन्मभूमी आहे. फलटण येथील राम मंदिर आणि मुधोजी मनमोहन राजवाडा ह्या अति प्राचीन वास्तू जतन केल्या आहेत. कैक चित्रपट/दूरचित्रवाणी मालिका ह्यांचे चित्रीकरण आजही ह्या वास्तूंमध्ये होत असते.  

आता पालखी विषयी...


            आज सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ झाला. बराच वेळ फलटण शहरात पालखी सोहळा थांबला होता. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक माऊली, माऊली असा जयघोष करीत होते. आज दुपारच्या विसाव्यापर्यंत भयंकर ऊन लागत असल्याने चालताना त्रास जाणवत होता. आज पालखीने विडणी, पिंप्रद, वाजेगाव या ठिकाणी विसावा घेतला. आमची विसाव्याची ठिकाणची विश्रांती स्थळे निश्चित ठरलेली आहेत. पहिल्या विसाव्याच्या वेळी मिसाळ यांच्या घरी छानपैकी पिठलं भाकरी खायला मिळाले. त्यांच्या घरची गरिबी असून देखील त्यांचा सेवा करण्याचा भाव मन हेलावून टाकणारा होता.दुपारी तर आम्हाला बारामती वरुन भोजन आले होते. मूळचे बिजवडीचे असणारे रामचंद्र भोसले  सर यांनी पिंप्रद येथे ही सेवा केली होती. दुपारनंतर  ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने चालताना काहीच त्रास जाणवला नाही. 

                  आजचा  पालखी बरड मुक्कामी आहे. आम्ही मात्र मुक्कामासाठी पवार वस्ती  निंबळक येथे ज्ञानेश्वर पवार यांच्या घरी आलो होतो. ज्ञानेश्वर पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. आज उन्हामुळे लोकांची आजारी पडण्याचे प्रमाण जास्त होते. मार्गात अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प दिसून आले. आम्ही वैष्णव मेडिकल कॅम्पला भेट दिली. सगळे डॉक्टर वैद्यकीय सेवा करण्यात मग्न होते. 

                   वैष्णव मेडिकल गेली ३१ वर्षे वारकऱ्यांची सेवा करीत आहे. या सेवेचे श्रेय विजय कासूर्डे  आणि त्यांच्या टीमला जाते. आज संस्थेचे उपाध्यक्ष ऍड. दादासाहेब खरमाटे  तसेच  म्हसवड  येथील प्रतितयश डॉ.मोडासे यांचीही भेट झाली. रुग्ण सेवा ही खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा होय. वैष्णव मेडिकल ट्रस्ट करीत असलेले काम समाजाला प्रेरणादायी आहे. हे कामच ईश्वराचे आहे.

         "Service to man is Service to God"असेही म्हटले जाते. आपणही जिथे जिथे संधी मिळेल  तिथे तिथे  सेवेची संधी घेतली पाहिजे आणि परमेश्वराची सेवा केली पाहिजे. संत सावता माळी यांच्या भाषेत सांगायचे म्हटले तर " कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी. थोडक्यात आपण करीत असलेले काम प्रामाणिकपणे करा ,ती परमेश्वर सेवा आहे असे वाटते. 

       राजेंद्र पवार 

       संचालक 

शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

 ९८५०७८११७८

८१६९४३१३०६

!! पाऊले चालती पंढरीची वाट दिवस दहावा १० जुलै !!

 !! पाऊले चालती पंढरीची वाट  दिवस दहावा १० जुलै !!

        आमचा तरडगावचा मुक्काम जितेंद्र गाडे यांच्या घरी होता. त्यांनी आमची केलेली सेवा शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज पालखी समाजआरती होऊन सकाळी ६ वाजता मार्गस्थ  झाली. सर्वच विसाव्याच्या ठिकाणी पालखी रथातून उतरवून नेली जाते. आज काळज, सुरवडी, निंभोरे, वडजल या ठिकाणी  माउलींनी विसावा घेतला.






            पहिला विसावा दत्त मंदिर काळज येथे होता. आम्ही आज सकाळी दिंडीतील मुलांच्याबरोबर अल्पोप्रहार घेतला. आजचे सर्वच विसावे थोडे जवळ वाटले. सुरुवातीचा काही काळ निसरड्या वाटेने चालावे लागले. आज ढगाळ वातावरण होते त्यामुळे चालताना कोणताही त्रास जाणवला नाही. पावसाची एकच सर येऊन गेली पण वातावरण बदलून गेली. चालण्यापेक्षा उभे राहण्याचा त्रास जास्त जाणवतो. 

              दुपारचा विसावा निंभोरे येथे होता. ज्ञानदीप  को -operative क्रेडिट सोसायटी मधील शाखा प्रमुख किशोर मोरे यांच्या घरी विसावलो. दुपारचे जेवण खंडाळा तालुक्याच्या दिंडीत घेतले. यावेळी ज्ञानदिपचे संस्थापक व्ही.जी.पवार आणि शिवकृपाचे संस्थापक गोरख चव्हाण यांची गळाभेट एक वेगळेच आत्मीयतेचे नाते सांगून गेली. वारीच्या मार्गावर प्रत्येकजण आपापल्यापरीने सेवा देत असतात.

 वारी समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. प्रत्येक विभाग विविध चित्ररथाच्या माध्यमातून आपल्या योजना लोकांच्या पर्यन्त नेण्याचा प्रयत्न केला जातो. आज शिक्षण विभागाचा एक स्टॉल पाहायला मिळाला. शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी महेश पालकर यांची भेट झाली. त्यांनी आमचा सत्कारही केला. उल्लास - नवभारत साक्षरता कार्यक्रम लोकांच्या पर्यन्त नेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२० मधील शिफारशीनुसार  व संयुक्त राष्ट्राच्या शाश्वत विकास ध्येयानुसार ,२०३० पर्यंत सर्व तरुण आणि प्रौढ, पुरुष आणि स्त्रीया अशा सर्वांनी १०० टक्के साक्षरता आणि संख्याज्ञान अपेक्षित आहे. 

 "गेले सांगून ज्ञाना - तुका, झाला उशीर तरी शिका....!"

                 थोडक्यात काय शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. आपल्या परिसरातील असाक्षर व्यक्तींची लगतच्या शाळेकडे त्यांचे कुटुंबीय,नातेवाईक, समाजातील नागरिकांनी तात्काळ नोंदणी करावी त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी असे वाटते.

  राजेंद्र पवार 

संचालक 

शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

९८५०७८११७८

८१६९४३१३०६

मंगळवार, ९ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस नववा ८ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस नववा ८ जुलै)  

                 ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ६ तारखेस सातारा जिल्ह्यात मोठ्या जोशात दाखल झाली. माऊलींच्या पादुकांना निरा स्नान झाले आणि अडीच दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी लोणंद नगरीत विसावली. आमचा मुक्काम अमृता मंगल कार्यालयात होता. आमची  व्यवस्था चांगली असल्याने पावसाच्या चिकचिकीचा फारसा त्रास झाला नाही. माऊलींच्या दर्शनासाठी दोन्हीही दिवस साधारण दीड किलोमीटरपर्यंत रांग लागली होती.

 





                  आज दुपारी एक वाजता माऊलींची पालखी मार्गस्थ झाली. टाळ मृदंगाच्या गजरात दिंड्या चालल्या होत्या. लोणंद ते तरडगाव हे अंतर केवळ ७ किलोमीटर आहे. या मार्गावर चांदोबाचा लिंब येथे उभे रिंगण होते. रिंगणात दोन अश्व धावत असतात. पैकी एका अश्वावर माऊली आरुढ झाल्या आहेत असे मानले जाते. दुसऱ्या अश्वावर सेवेकरी आरुढ झालेले असतात. रिंगण मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. सुरुवातीचा काही काळ आकाश निरभ्र होते. रिंगण  झाल्याबरोबर मेघराजाने सुरुवात  केली. सुरुवातीला हलका वाटनाऱ्या पावसाने कधी रौद्र रुप धारण केले हे समजलेदेखील नाही. या पावसाने वारकऱ्यांची दैना केली. जरी पांघरायला प्रत्येक वारकऱ्याकडे कागद असला तरी प्रत्येकजण चिंब भिजले होते. काही व्यक्ती पावसाचा खरा आनंद लुटत होते.

                  गावच्या प्रवेशद्वारावर पालखी रथातून उतरवली गेली. गावातील तरुण मुले पालखीला खांदा देण्यासाठी सरसावतात.या गावात पालखी चार ठिकाणी विसाव्यासाठी थांबते.विठ्ठल मंदिर, पवारांचा वाडा,चाफळकर वाडा,भाऊ बुवाचा मठ याठिकाणी थांबते. पवारांचा वाडा याठिकाणी  वारकऱ्यांना पाणी  दिले जाते.   ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई यांना समाजाने वाळीत टाकले होते. ही भावंडे पांडुरंगाच्या भेटीसाठी चालले असताना तरडगावी पवार कुटुंबीयांनी त्यांची सेवा केली होती. सगळा समाज विरोधात असताना पवारांनी केलेल्या सेवेचे फळ म्हणून पवार परिवारास मान आहे.  येथे माऊली त्यांना भेटावयास येतात असे मानले जाते. आज मार्गावर सर्वत्र पाऊस होता. आज वारकऱ्यांची दैना झाली. चिखल असल्याने तंबूत राहाणारांची गैरसोय झाली. पांडुरंगाच्या आसक्तीपुढे वारकऱ्यांना कशाचाच त्रास वाटत नाही. तरडगावच्या मुक्कामात एक वेगळी गोष्ट लक्षात आली. आपण निरपेक्ष भावनेने काम केले तर प्रत्यक्ष परमेश्वर भेटीस येतो याचाच प्रत्यय आज आला. 

                    "सत्य असत्यासी मन केले ग्वाही, न मानियले बहुमता". या प्रमाणे पवार वाड्यात कृती केली गेली. आपणही कोणतीही कृती  करताना समाज काय म्हणेल याचा विचार करु नये. आपल्या सद्सदविवेक बुध्दीला पटेल अशी गोष्ट करावी असे वाटते.

   राजेंद्र पवार 

   संचालक 

 शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड, मुंबई 

९८५०७८११७८

८१६९४३१३०६

बुधवार, ३ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट!!

 !!  पाऊले चालती पंढरीची वाट!!  (दिवस चौथा दि.२ जुलै)

             मी प्रस्थानाच्या वेळी दिनांक २९ जून रोजी आळंदी येथे अल्पशी हजेरी लावली होती. दुसऱ्या दिवशी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे वारीत सहभागी होऊ शकलो नाही. आज प्रत्यक्ष वारीत सहभागी झालो. आज बरोबर ६ वाजता भवानी पेठेतून आरती होऊन पालखी मार्गस्थ झाली. आज ज्ञानेश्वर माऊली व तुकाराम महाराजांच्या  पालख्या एकाच वेळी पुण्यात दाखल  झाल्या असल्याने शहराला यात्रेचे स्वरूप आले होते. सर्वत्र भक्तिमय वातावरण तयार झाले होते. सगळीकडे ज्ञानोबा माऊलीचा गजर ऐकू येत होता. वारीच्या माध्यमातून आपणास लोकांपर्यंत पोहोचता येते. याचा सर्वांनीच लाभ घेतला होता. यामध्ये प्रामुख्याने राजकीय पक्षांचा समावेश झालेला दिसत होता. त्या त्या परिसरातील सार्वजनिक मंडळे वारकऱ्यांची सेवा करताना दिसत होते.



वारी मार्गस्थ होताना " मंगलाचरण पहिले"

मधील १० अभंग होतात. आपल्या माहितीसाठी पहिला अभंग.......

रुप पाहता लोचनी! सुख झाले हो साजणी !१!

तो हा विठ्ठल बरवा! तो हा माधव बरवा !२!

बहुत सुकृताची जोडी! म्हणूनि  विठ्ठलिं  आवडी!३!

सर्व सुखाचे आगर! बाप रुखुमादेविवर!४!

असे अभंग म्हणत विठ्ठल नामात तल्लीन होऊन वारकरी देहभान विसरून चालत होते.

                    सकाळचे साडेसात वाजता पालखी वानवडी येथे पोहचताच परंपरेनं येथे आरती झाली. वारीमध्ये शिस्तीला प्रथम प्राधान्य असते. चोपदाराने  दंड उंचावतच सर्वत्र शांतता पसरते. सर्व वारकरी रांगेत उभे राहून आरती करतात. वारी हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. वारीत प्रत्येकजण आपआपल्या परीने सेवा करत असतात. संस्था तसेच वैयक्तिक स्वरूपात मदत करतात. यामध्ये,फराळ, फळांचे वाटप त्याचबरोबर चप्पल, बुट, बॅग दुरुस्ती अशी कामे केली जाते. वैद्यकीय सेवा मोफत सेवा दिली जाते. 

                    दिवसभराचा विचार केला असता पहिला विसावा हडपसर येथे होता. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे व्ही. एस.पवार यांनी अल्पोप्रहराची व्यवस्था केली होती. नंतरचा विसावा उरळी येथे होता. तेथे आम्ही मंदिरातच थोडा वेळ विश्रांती घेतली. पावसाच्या एक दोनच सरी येऊन गेल्या त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला. पाऊस कमी असल्याने रस्त्यावर चिकचिक झाली होती.  वडकी नाला येथे दुपारचा विसावा होता. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते "माऊलीं "चे स्वागत केले जात होते.  दिवे घाटातील पालखीचा प्रवास खूपच विलोभनीय होता. चित्रीकरणासाठी सर्वच दूरचित्रवाहिनी यंत्रणा सज्ज होती. घाट चढून आल्यानंतर " विठ्ठल पार्क" मधील मूर्ती सर्व वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती. आज पालखी पालखी तळावर येण्यासाठी रात्रीचे दहा वाजले होते. 

             सासवडला शिवकृपाची शाखा असल्याने मुक्कामाची उत्तम व्यवस्था झाली. आजच्या दिवसाचा विचारत केला तर लोकांचा सेवा भाव खूपच भावला. आपण दुसऱ्याच्या उपयोगी पडावे, त्यांना मदत करावी, आपल्या उत्पन्नातील समाज कार्यासाठी वापरावा हा संकेतच मिळाला. आपणही आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा समाजाच्या कामासाठी वापरावे असे वाटते.

           राजेंद्र पवार 

        संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

९८५०७८११७८

८१६९४३१३०६ 

                                 क्रमशः

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...