रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (६ )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (६ )

             २७ तारखेचा रात्रीचा मुक्काम लेपा याठिकाणी होता. लेपा याठिकाणचे अन्नछत्र मांगीलाल वर्मा हे चालवतात. मांगीलाल वर्मा हे अगदीच तरुण असून गेल्या चार वर्षांपासून हे अन्नछत्र चालवतात. रोज परिक्रमावासीयांची व्यवस्था करणे ही सोपी गोष्ट नाही. आर्थिक तरतूद करायची आणि लोकांची सेवा करायची तीही सातत्याने. आपल्या घरी आकस्मितपणे चार पाहुणे आले तर घरातील परिस्थिती बदलते. नर्मदामाईवर श्रद्धा असेल तर ते काम सहजपणे होते हेच मांगीलालने दाखवून दिले. लेपा हे गाव नर्मदा प्रकल्पात बुडीत जाणार असल्याने ४ किलोमीटरवर लेपाचे पुनर्वसन होत आहे. काही ग्रामस्थ तेथे राहायलादेखील गेले आहेत. 


                   पुनर्वसित लेपामध्ये नाशिकच्या भारती ठाकूर यांनी आदिवासी समाजातील लोकांसाठी फार मोठे काम केले आहे.भारतीदिदींचा सुरुवातीचा काळ रामकृष्ण मिशनमध्ये गेला होता.भारती दीदींनी सुरु केलेल्या नर्मदालयात  पहिलीपासून १० वी पर्यंतची  वसतिगृहयुक्त शाळा आहे.या शाळेत कौशल्य शिक्षण देऊन मुलांना स्वावलंबी बनवले जात आहे. महाराष्ट्रातील पाबळ येथील ग्रामीण विकास केंद्राच्या धर्तीवर येथे शिक्षण दिले जाते. अशा प्रकारचे व्यवसाय शिक्षण वर्णे येथील हायस्कूलमध्ये दिले जात असल्याचा मला अभिमान वाटला.आम्ही काही काळ प्रार्थना चालू असताना थांबलो होतो. भारतीदीदी यांनी प्रार्थनेचे महत्व पटवून दिले. प्रार्थना आपलं हृदय शुध्द करते. शुध्द हृदयात शुध्द विचार येतात आणि आपल्या हातून चांगली कृती होते म्हणून आपण प्रार्थना म्हटली पाहिजे. दिदींच्या अनुपस्थितीत देखील ताल, सूर, लयात प्रार्थना ऐकायला मिळाली.भारतीदिदी मध्यप्रदेशात अशा अनेक शाळा चालवतात.







      आजही लेपा कठोरा मार्गावर अनेक ठिकाणी चहापानासाठी आग्रह केला. कठोरा येथे पुन्हा सदाव्रताचा अनुभव घेतला. आमचे सहकारी श्री पुंडलिक पाखरे,सौ. इंदुमती चव्हाण व शिवाजी चव्हाण यांनी स्वयंपाक केला. आम्ही सर्वांनी दुपारच्या भोजन प्रसादाचा आनंद लुटला. दुपारच्या वेळी एखादी नदी लागली तर आम्ही आनंद लुटत आहोत.

             दुपारच्या विश्रांतीनंतर पुन्हा पुढील दिशेने मार्गस्थ झालो. थोड्याच अंतरावर मांडव्य ऋषी गुफा आश्रम आढळला. पूर्वीच्या काळी साधू  कसे ध्यानस्थ होत याचा प्रत्यक्ष गुफेत जावून अनुभव घेतला.

             वाटेत पलकेश नावाचा इंदोरचा तरुण भेटला,आपली परिक्रमा पूर्ण होण्याबद्दल त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली. पण आईने परिक्रमा पूर्ण झाल्याशिवाय घरी परतायचे नाही मग कितीही वेळ लागला तरी चालेल असे ठणकावून सांगितले. जर अशा आई असतील तर चांगली मुलं घडायला अडचण येणार नाही. मुलं घडवण्यात आईची भूमिका किती महत्वाची असते हेच पलकेशच्या भेटीतून दिसून आले.

            आजचा मुक्काम नर्मदेच्या दक्षिण तटावर  शालिवाहन येथे आहे तर त्याच्या अगदी समोर महेश्वर घाट आहे. प्रत्यक्ष त्या घाटावर नंतर जाता येईलच. रात्रीच्या वेळी घाटाचा परिसर वीज प्रकाशाने उजळून निघाला होता. घाट परिसर एकदमच विलोभनीय वाटत होता.आज घाटाचा फोटो अलीकडच्या तिरावरून घेतला. नर्मदेच्या तीरावर अनेक ठिकाणी घाट आहेत. त्यापैकी अनेक घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधले आहेत. आज  सेवाभाव कसा असावा हे मांगीलालकडून शिकायला मिळाले तर भारतीदीदींनी  शिस्तीबरोबर जीवनात कौशल्य शिक्षण महत्वाचे असल्याचे पटवून दिले. आपणही आपल्या मुलांना कौशल्य शिक्षण द्यायला हवे असे वाटते.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८



#narmadaparikrama #narmada #narmadamai #narmadariver #parikrama #shalivahan #maheshwar

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (५ )

 !!आमची नर्मदा परिक्रमा !! (५ )  

     रात्रीचा मुक्काम खरगोन जिल्ह्यातील तीर्थ हरिहर कुटी आश्रम मर्दाना याठिकाणी होता. हा आश्रम अगदीच नदीकिनारी होता. मर्दानापासून ७ किलोमीटरवर सियाराम बाबांची भट्ट्यान बुजुर्ग येथे कुटी आहे. हे बाबा ९० वर्षांचे असून सिद्धयोगी आहेत. याठिकाणी भक्तांची चहापान व्यवस्था होतेच. शिवाय प्रसाद म्हणून बिस्कीट पुडा, अगरबत्ती, साखर, फुलवाती, भेळ अशा वस्तू आम्हाला दिल्या. याठिकाणी तुम्ही बाबांना कितीही मोठी रक्कम दिली तरी त्यामधून फक्त १० रुपयेच ते घेतात व उर्वरित रक्कम परत देणगीदाराला दिली जाते याचा प्रत्यय मलाही आला. त्याच गावात रामकृष्ण हरी सेवा आश्रम आहे तेथे दुपारच्या प्रसादाची व्यवस्था झाली या आश्रमाचे संस्थापक नाशिकचे ज्ञानेश्वर गोडसे असून त्यांचीही आज भेट झाली. आश्रमाच्या शेजारीच गोशाळा दिसून आली,अशा बऱ्याच गोशाळा मार्गावर असल्याचे समजले.




 दुपारी १ वाजता परत परिक्रमेस सुरुवात झाली.वाटेत छोटी नदी लागली त्या नदीत स्नानाचा आनंद लुटला. मार्गावर अमलाथा याठिकाणी छानपैकी ताक प्यायला मिळाले. 



आजचा मुक्काम लेपा याठिकाणी आहे. लेपा येथे नर्मदा नदीवर धरण आहे. 




 आज भट्ट्यानचा अनुभव खूप वेगळा वाटला. आज पैसे मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रकार अवलंबले जातात मात्र सियाराम बाबांनी आपणास मिळालेल्या पैस्यातून शिक्षण आणि आरोग्य विषयक उपक्रम राबविले  आहेत. आज सर्वत्र पैश्याची लूट कशी करता येईल हाच विचार चालू असतो मात्र मिळालेल्या पैश्याचे आम्ही विश्वस्त आहोत ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. सियाराम बाबांचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावयास हवा. आपणास मिळालेला निधी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या बाबीवर खर्च करायला पाहिजे असे मला वाटते.


 

      राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८


#narmadaparikrama #narmada #narmadamai #narmadariver #parikrama 

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

!! नर्मदा परिक्रमा !! ( ४ )

 !!  नर्मदा परिक्रमा !! ( ४ )  

बाजीराव पेशवे समाधीस व भारतातील सर्वात मोठे शिवलिंग बनवणारे गाव बकावा यास भेट -----------

 आज सकाळी बडी आलीहून ६.३० वाजताच निघालो. निघण्यापूर्वी स्नान पुजादि नित्यक्रम उरकला जातो.तासाभरातच गोमुख आश्रम, टोकसर येथे अगदी अल्पवेळ थांबून थोड्याच अंतरावर असणाऱ्या महेश चैत्यन्यजी यांच्या सतगुरु आश्रमात चहापाणासाठी विसावलो. येथे सुंदर नक्षत्रवनाची निर्मिती चालू आहे. हे महाराज रामकथा, भागवत कथा सांगतात. त्यांचे यु ट्यूबवर व्हिडीओ पहायला मिळाले.


                    वाटेत पितनगर, काकरिया गावी स्थानिक ग्रामस्थांनी चहाची सोय केली. काही ग्रामस्थ आपल्या शक्तीनुसार नेहमी सेवा देत असतात. शेतीच्या दृष्टीने विचार केला तर हा परिसर समृध्द वाटला. याठिकाणी मिरची, कापूस यांची शेती मोठया प्रमाणात दिसून आली. मिरचीचे ढीगच्या ढीग वाळत घातलेले दिसून आले. तूर, गहू, हरबरा आदी पिकेही पहायला मिळाली.



आज प्रथमच  रावेरखेडी येथे सदाव्रत हा प्रकार अनुभवला. सदाव्रताच्या ठिकाणी सेवा देण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसते. आपणास साहित्य मिळते आपण जेवण तयार करावयाचे असते. आज आमच्या ग्रुपमधील पुंडलिक पाखरे, सौ. रेखा पवार, सौ. इंदुमती चव्हाण यांनी स्वयंपाक बनवण्याची सेवा केली.


   रावेरखेडी येथे बाजीराव पेशवे प्रथम यांची समाधी आहे.

 बाजीराव पेशवे प्रथम यांच्याबद्दल माहिती ...


            बाजीराव पेशवे प्रथम जन्म:१८ ऑगस्ट १७०० मृत्यू:२८ एप्रिल १७४०  हे एक प्रसिद्ध भारतीय सेनानायक होते. सन १७२० मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे चौथे पेशवे  म्हणून तैनात  होते. बालाजी विश्वनाथ यांचे पुत्र असून त्यांचे टोपण नाव बाजीराव बल्लाळ असे होते.मराठा साम्राज्याच्या विस्तारात विशेषतः उत्तर भारतात निर्णायक भूमिका बजावली. त्यामध्ये त्यांनी माळवा, गुजरात, निजाम सहित काही दक्षिणी राज्ये पोर्तुगाल तसेच दिल्लीचे सुलतान यांच्या सैन्यावर मात केली. गुजरातचे गायकवाड, ग्वाल्हेर चे  शिंदे,नागपूरचे भोसले,धारचे पवार, तसेच इंदोरचे होळकर यांना अधिन करुन मराठा साम्राज्याचा विस्तार केला. उत्तर भारतात एका दौऱ्यात एक लाख सैनिक घेऊन पश्चिम निमाडमध्ये नर्मदा तटावर तळ ठोकलेला असताना उष्माघातामुळे वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांची समाधी रावेरखेडी येथे त्यांचे निष्ठावंत सरदार ग्वाल्हेरचे शिंदे यांनी याठिकाणी आदरपूर्वक निर्माण केली. 



             रावेरखेडीच्यापुढे बकावा गाव लागले. बकावा शिवलिंग निर्मितीसाठी भारतात प्रसिद्ध आहे. येथे घरोघरी शिवलिंगाची निर्मिती केली जाते. आजचा मुक्काम मर्दाना या आश्रमात होता. आश्रमाचा परिसर अगदीच रमनिय होता. बकावा येथे २० ते २५ फूट उंचीपर्यंतचे शिवलिंग बनवतात. अशा शिवलिंगाचे वजन ५० ते ५५ टनापर्यंत असते. बकावा गावात खूपच समृध्दी जाणवली. एखादी कला गावाला किती समृद्ध करते हे आज दिसून आले.

     राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८


#नर्मदा #narmada #narmadaparikrama #narmadarivar #raverkhedi #bajiraopeshave #bajirao #shivalinga #largestshivalinga #india #narmadamai 

गुरुवार, २५ नोव्हेंबर, २०२१

!!नर्मदा परिक्रमा !! ( ३ )

 !!नर्मदा परिक्रमा !! ( ३ )

     श्री श्री नजर निहाल आश्रम येथे रात्रीचा मुक्काम होता. सकाळी ६ वाजता नदीवर स्नानासाठी गेलो तर पाणी  अंदाजे  १० फुटाने कमी झाले होते. येथे दररोज असे होत असते असे समजले. यामागचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याच नदीवर इंदिरासागर प्रकल्प आहे.हे धरण खांडवा जिल्ह्यात नर्मदानगर (ओंकारेश्वर )येथे आहे. हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शिवसागर जलाशयाची आठवण झाली. या धरणाची पायाभरणी २३ ऑक्टोबर १९८४ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केली होती. त्यामुळेच या प्रकल्पाला "इंदिरासागर " हे नाव देण्यात आले. मुख्य धरणाचे बांधकाम १९९२ मध्ये सुरु झाले.या नदीवर १००० मेगावाटचा वीज प्रकल्प आहे. थोडे अंतर पुढे गेल्यावर  मोर टक्का गावाजवळ कालवा, रस्ता व रेल्वेमार्ग समांतर दिसून  आले हे दृश्य खूपच विलोभनीय होते. 




         मोरटक्का येथे भक्तीसागर आश्रम आहे तेथेच सकाळचा नाश्ता केला आणि दुपारचा भोजन प्रसाद  खंडवा जिल्ह्यातील  कुटार या गावी श्री माताजी नर्मदा सेवा कुटीमध्ये मिळाला . संध्याकाळी आम्ही मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील बडवाह तालुक्यातील बडीअली येथील नर्मदा आश्रमात थांबलो. हा आश्रम एकदमच नर्मदा किनारी आहे.परिक्रमेत काही नव्या शब्दांची माहिती झाली. जर जेवणासाठी बोलवायचे असेल तर " भोजन की हरिहर " नाश्त्यासाठी " बालभोग",जेवण म्हणजे "भोजन प्रसाद ",एखादा पदार्थ आपणास नको असेल तर " महापुरण" असे म्हणतात. या परिक्रमेच्या निमित्ताने नव्या शब्दांची भर पडत आहे. नवीन काही शिकायचे असेल तर गाव सोडायला हवे.

            राजेंद्र पवार

       ९८५०७८११७८

@narmada #narmada #narmadaparikrama  #narmadariver #lordShiva #omkareshwar #jyotrirling #satara #khandawa #khargaon 

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

!! नर्मदा परिक्रमा !!( २ )

 !! नर्मदा परिक्रमा !!( २ )





              आज परिक्रमेस सकाळी १०.३० वाजता सुरुवात झाली. परिक्रमा सुरु होण्यापूर्वी संकल्प पूजेचा कार्यक्रम असतो. याठिकाणी जलपूजनाचा धार्मिक विधी होतो. जितेंद्र जोशी यांनी याप्रसंगी पौराहित्य केले. यावेळी कन्यापूजनाचा महत्वाचा कार्यक्रम असतो. नर्मदामाईला कन्येच्या स्वरूपात पाहिले जाते. परंतु ओंकारेश्वरला व्यावसायिक स्वरुप आले आहे. येथील कन्यापूजनानिमित्त योग्य मुलींना साह्य होणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही असेच वाटते.         


              परिक्रमेचा सुरुवातीचा मार्ग खूपच खडतर होता त्यामुळे चालण्यासाठी खूपच वेळ लागत होता. १२/१३ किलोचे ओझे पाठीवर  घेऊन चालणे अतिशय कष्टप्रद असल्याची जाणीव झाली. हळूहळू ओझे घेऊन चालण्याची सवय होईल. दुपारी १ वाजता  मौनी बाबा गुफा आश्रम,ओंकारेश्वर येथे पोहोचलो. तेथे दुपारचा भोजन प्रसाद घेतला. थोड्याच अंतरावर श्री श्री नजर निहाल आश्रम लागला तेथेच आजचा पहिला मुक्काम झाला. येथील व्यवस्था खूपच चांगली आहे. जीवनातील ही पहिलीच परिक्रमा असल्यामुळे  वेगळाच अनुभव येत आहे. आदरातिथ्य कसे करावे हे आज प्रत्यक्ष अनुभवले.

       राजेंद्र पवार 

       ९८५०७८११७८

#narmadaparikrama #narmada #omkareshwar #lordshiva #shivalinga #narmada #narmadariver #maharashtra #satara #knadawa #narmadamai #lordshivatemple

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१)

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१)

                     आमची  नर्मदा परिक्रमा  प्रत्यक्ष २४ तारखेस सुरु होत आहे. ही परिक्रमा ओंकारेश्वरपासून सुरु होत असल्याने तेथे पोहचण्यासाठी  आम्ही २२ तारखेला पुण्याहून पुणे जम्मूतवी एक्सप्रेसने खांडव्यापर्यंत आलो.२२ तारखेस सायंकाळी ५.२० ला निघालेली ट्रेन २३ तारखेस पहाटे ४ वाजता खांडव्यास पोहचली. खांडवा ते ओंकारेश्वर हे अंतर ६० किलोमीटर असून हे अंतर मध्यप्रदेश परिवहन निगमच्या गाडीने पोहोचलो. या ठिकाणची परिवहन व्यवस्था महाराष्ट्र राज्यासारखी नाही. आपल्याकडे जसे वडापचे काम चालते अगदी तशीच व्यवस्था आहे. सकाळी ८.३० लाच आम्ही ओंकारेश्वर येथे पोहोचलो. याठिकाणी गजानन महाराज संस्थांनच्या निवासस्थानी पोहोचलो. या संस्थांनचे कामकाज खूपच प्रभावी आहे. या ठिकाणची निवास व भोजन व्यवस्था अप्रतिम आहे. येथे परिक्रमवासीयांना वस्त्रही प्रदान केले जाते. आम्हालाही ते मिळाले आहे. प्रत्यक्ष परिक्रमेस उद्या सुरुवात करणार आहोत.




               माझ्यासमवेत एकंबेहून श्री गोरख चव्हाण, सौ. इंदुमती चव्हाण,शिवाजी चव्हाण, किडगावहून चंद्रशेखर पवार, सौ. रेखा पवार तर बीडहून पुंडलिक पाखरे सहभागी झाले आहेत.


प्रथम थोडीशी ओंकारेश्वरबद्दल माहिती.. 





 

                 ओंकारेश्वर मंदिर भारताच्या मध्य प्रदेशातील एक हिंदू मंदिर आहे. ते मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीच्या मध्यभागी मांधाता किंवा शिवपुरी नावाच्या बेटावर वसलेले आहे. हे भगवान शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, शतकानुशतके भिल्ल जमातीचे लोक या ठिकाणी राहिले होते आणि आता हे ठिकाण त्याच्या भव्यतेसाठी आणि इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. हे मोरट्टाक्का गावापासून १४ किमी अंतरावर आहे. हे बेट हिंदू ओमकाराच्या आकारात आहे. येथे दोन मंदिरे आहेत . १) ओंकारेश्वर २) ममलेश्वर कारेश्वर मंदिर खूप प्राचीन नर्मदा नदीपासून आपोआप कारेश्वराची निर्मिती झाली . ही नदी भारतातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे आणि आता तिच्यावर जगातील एक मोठा धरण प्रकल्प बांधला गेलेला आहे. निर्मात्याच्या मुखातून प्रथम उच्चारलेला ओंकार हा शब्द वेद पाठ केल्याशिवाय येत नाही. या ओंकाराची भौतिक देवता ओंकार क्षेत्र आहे. यात ६८ तीर्थक्षेत्रे आहेत. येथे ३३ श्रेणीतील देवता कुटुंबासह राहतात आणि २ ज्योतिषस्वरूप लिंगांसह १०८ आकर्षक शिवलिंगे आहेत. देशातील १२प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांपैकी २ज्योतिर्लिंगे मध्य प्रदेशात आहेत. एक महाकाल म्हणून उज्जैनमध्ये आणि दुसरा ओंकारेश्वरमध्ये ओंकारेश्वर- ममलेश्वर म्हणून विराजमान आहे.

                 आज आम्ही ओंकारेश्वर व ममलेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मांधाता बेटाला प्रदक्षिणा घातली. नर्मदा व कावेरी नदीच्या संगमाच्या ठिकाणी स्नान केले. ओंकारेश्वर नगरपालिकेने भाविकांची व्यवस्था उत्तम ठेवल्याचे दिसून आले. नदीकाठचा सर्व परिसर अतिशय स्वच्छ दिसून आला. स्वच्छतेत परमेश्वर असतो हेच आज दिसून आले.
                 मी क्रमश माहिती पाठवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे आपोआपच आपणा सर्वांची आभासी पध्दतीने परिक्रमा होईल.
       राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८


#narmadaparikrama #narmada #omkareshwar #shivaling #khandawa #narmadariver #parikramawasi #parikrama #omkareshwartemple #shivatemple #shiva #lordshiva #maharashtra #satara #satarakar

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

!! रवींद्र सदाशिव भट स्मृतिदिन !! (२२ नोव्हेंबर )

 


!! रवींद्र सदाशिव भट स्मृतिदिन !!
   (२२ नोव्हेंबर )



       रवींद्र सदाशिव भट जन्म:१७सप्टेंबर १९३९ मृत्यू:२२ नोव्हेंबर  २००८ हे मराठी संतांचे चरित्र कादंबर्‍यांतून रेखाटणारे लेखक, प्रसिद्ध कवी, नाटककार, पटकथाकार होते.त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई येथे झाला होता.
    रवींद्र भट यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह म्हणून काम केले होते. 'ते माझे घर' या चित्रपटाचे  निर्माता होते. 'ते माझे घर' या चित्रपटास १९६३ सालचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.
     रवींद्र भट यांची काही साहित्य संपदा
!! कादंबरी  !!
अनादि मी अनंत मी ,आभाळाचे गाणे,इंद्रायणीकाठी,एका जनार्दनीं,घरट्यात मी एकटा,घास घेई पांडुरंगा,बंध विमोचन राम,देवाची पाऊले, भगीरथ,भेदीले सुर्यमंडला,सत्यम शिवम सुंदरम,सागरा प्राण तळमळला,हेचि दान देगा देवा,
  !! नाटक !!
अरे संसार संसार,अवघी दुमदुमली पंढरी
असा नवरा नको गं बाई,एक कळी फुललीच नाही,केल्याने होत आहे रे,खुर्ची,
         !! बालसाहित्य !!
कथा समर्थांच्या,जय गंगे भागीरथी,जय जय रघुवीर समर्थ,दिनांची माऊली,संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ,विवेकानंद,स्वातंत्र्यवीर
       !! कवितासंग्रह !!
ओठावरले गाणे,खुर्ची,जाणता अ जाणता,मन गाभारा गाभारा,मोगरा फुलला,
          !! ललित !!
कृष्णाकाठचा भुत्या ,योगसुखाचे सोहळे,
सारी पावले मातीचीच ,ज्ञानदेवा डोळा पाहू चला ,
           रवींद्र भट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

! विनोदी लेखक चिं.वि. जोशी स्मृतिदिन !! (२१ नोव्हेंबर )

 !! विनोदी लेखक चिं.वि. जोशी स्मृतिदिन !! (२१ नोव्हेंबर )




               चिंतामण विनायक जोशी जन्म :  १९ जानेवारी १८९२ मृत्यू : २१ नोव्हेंबर १९६३ हे विनोदी साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले मराठी लेखक होते. पाली भाषेचा त्यांचा विशेष अभ्यास होता. बडोदे महाविद्यालयात ते पाली विषयाचे प्राध्यापक होते.
           त्यांचे वडील विनायक रामचंद्र जोशी हे शिक्षक होते. त्यांनी आगरकर यांच्या सुधारक या वृत्तपत्राचे काही काळ संपादनही केले होते. सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी हे देखील जोश्यांच्याच घराण्यातले होते. चि.वि. जोशी यांचे बहुतांशी लेखन हे विनोदी वाङमय असले तरी ते व्यावहारिक जीवनात ते धीरगंभीर प्रवृत्तीचे गृहस्थ होते. त्यांच्या मुलाचा अकाली मृत्यू झाला होता, त्यामुळे ते दु:खी असत.
                          दूरचित्रवाणीवरची ’चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही मालिका खूप गाजली. चिं.वि. जोशी यांच्या कथेवर सन १९४२ मध्ये 'सरकारी पाहुणे' नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे दिग्दर्शन मास्टर विनायक यांनी केले होते. चिमणरावांची भूमिका दामुअण्णा मालवणकर यांनी केली होती.
           चिं.वि.जोशींच्या, संध्या बोडस-काणे व अलका जोशी-मांडके या नातींनी संकलित केलेले ’चि.वि. जोशी - साहित्यातले आणि आठवणीतले’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनाने छापून प्रसिद्ध केले आहे. अक्षरधारा प्रकाशनाने 'विनोदाचे बादशहा चिं. वि जोशींचे निवडक विनोद' नावाचे एक अतिशय छोटे पुस्तक प्रकाशित केले आहे. विनोदांचे संकलन रवींद्र कोल्हे यांनी केले आहे.चि. वि. जोशी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
        संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१

!! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे स्मृतिदिन !! (२० नोव्हेंबर )

 


  !! प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे स्मृतिदिन !! (२० नोव्हेंबर )



      केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे जन्म: १७ सप्टेंबर १८८५ मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३ हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र  तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नातू होत.
             रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते. महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.
                    सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो; ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही. अन्याय्य रूढी, जाति-व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व, लेखन व प्रत्यक्ष कृती ही तीन शस्त्रे वापरून त्यांनी पुराणमतवाद्यांशी लढा दिला.
            समाजातील सर्व विकारांचे मर्म ब्राह्मणी कर्मकांडांत आहे असे त्यांचे मत होते. धार्मिक पूजेचे विधी, उपासतापास, व्रतवैकल्ये आणि धर्म या नावाखाली सर्व जातींमध्ये जे रूढ परिपाठ आहेत, ते सर्व परिपाठ ब्राह्मणांनी आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी प्रस्थापित केले आहेत. या दुष्ट रूढींमुळेच स्त्रियांवर अन्याय होतो. विशेष अधिकारांपासून वंचित अशा बहुजन समाजावर अन्याय होतो. सारांश सर्व अशिक्षित जनता या रूढींखाली भरडली जाते असे वाटल्याने त्यांनी या सर्व घटकांच्या मुळावर, म्हणजेच ब्राह्मणशाहीवर घाला घातला. पुरोगामी, उदारमतवादी, सुधारक विचारांच्या ब्राह्मणांविषयी त्यांच्या मनात द्वेषभावना नव्हती. पण धंदेवाईक भट-भिक्षुकशाही व्यवस्थेचे ते टीकाकार होते. संत एकनाथांच्या जीवनावरील ’खरा ब्राह्मण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी खऱ्या ब्राह्मणांची भूमिका मांडली.
         त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.
                मुंबईत स्थायिक झाल्यानंतर त्यांनी हुंडाप्रतिबंधक चळवळ हाती घेतली. सर्व जातींची हुंडाप्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांना त्यांनी घेतलेल्या हुंड्याच्या रकमा परत देण्यास भाग पाडले. त्या काळी विवाहाआधी प्रेम करणे हा गुन्हा, व्यभिचार समजला जाई. अशा काळात त्यांनी अनेक प्रेमी युगुलांचे विवाह लावून दिले. आजच्या काळात हे संदर्भ वाचताना आपणास या गोष्टी सहज वाटतात, या समस्यांची तीव्रता आपल्या लक्षात येत नाही. त्या काळच्या कर्मठ वातावरणात समाजसुधारणांचा केवळ उच्चार करणेही अवघड होते. आजही हुंड्याविरोधात अनेक कायदे आहेत, पण हुंडा घेण्याच्या प्रवृत्तीचा समूळ नाश झालेला नाही. स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या समस्येची काय तीव्रता असेल याची केवळ कल्पनाच केलेली बरी! यावरून प्रबोधनकारांचे द्रष्टेपण सिद्ध होते.
            प्रबोधनकार हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, भिक्षुकशाहीचे बंड, देवांचा धर्म की धर्माची देवळे, ग्रामधान्याचा इतिहास, कुमारिकांचे शाप, वक्‍तृत्वशास्त्र इत्यादी ग्रंथासह समर्थ रामदास, संत गाडगे महाराज, रंगो बापूजी, पंडिता रमाबाई, माझी जीवनगाथा (आत्मचरित्र) ही चरित्रे - अशा साहित्यसंपदेची त्यांनी निर्मिती केली. त्यांची ’खरा ब्राह्मण’ आणि ’टाकलेले पोर’ ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली. खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.
             संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
            संकलक: राजेंद्र पवार
                  ९८५०७८११७८

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

! इंदिरा गांधी जन्मदिन !! (१९ नोव्हेंबर )

 

      !! इंदिरा गांधी जन्मदिन !!
     (१९ नोव्हेंबर )




              इंदिरा गांधी जन्म:१९  नोव्हेंबर १९१७ मृत्यू: ३१ ऑक्टोबर१९८४ या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. बांग्लादेशाच्या उभारणीवेळी त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनविण्याचा त्यांचा निर्णय भारताला प्रगतीपथावर नेणारा होता.
           लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधानपदाच्या प्राप्तीसाठी त्यांना मोरारजी देसाई यांच्याशी सामना करावा लागला. त्या १९६६ मध्ये देशाच्या पाचव्या पंतप्रधान (पहिल्या महिला पंतप्रधान) बनल्या. त्यांनी पोखरण येथे पहिली अणुचाचणी घडवून आणली.
                        इंदिरा गांधींचा जन्म  अलाहाबाद येथे झाला. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणापासूनच भाग घेतला. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी त्यांनी काही स्वातंत्र्यसैनिकांच्या मदतीने अलाहाबादेतील मुलांची १९३० साली "वानर सेना' नावाची संघटना स्थापन केली. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९५५ मध्ये त्या काँग्रेस कृती समितीच्या व सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्य झाल्या. फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून निवडून आल्या. केंद्रीय मंत्रिमंडळात त्या १९६४ साली प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लालबहादुर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मधे मृत्यू झाल्यानंतर कॉँग्रेस अध्यक्ष कामराज याच्या पाठिंब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून त्या २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना होत्या.
                      १९७७ साली त्यानी देशात आणीबाणी लागू करण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला. यामुळे १९८० पर्यंत त्या सत्तेपासून दूर राहिल्या. १९८० च्या निवडणुकांत जनतेने पुन्हा त्यांच्यावर विश्वास दाखवला. पण यावेळी त्यांना अशांत पंजाबचा सामना करावा लागला. ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा निर्णय खलिस्तान चळवळीला आळा घालण्यासाठी घेतला. पण अखेर त्यामुळेच त्यांच्या दोन सुरक्षारक्षकांकडून त्यांची हत्या झाली.
इंदिरा गांधीना मिळालेले पुरस्कार ....
१)भारतरत्न
२)लेनिन शांतता पुरस्कार
३)जवाहरलाल नेहरु पुरस्कार
इंदिरा गांधीना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
        संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

! चित्रपती व्ही. शांताराम जन्मदिन ! (१८ नोव्हेंबर )

 


   !  चित्रपती व्ही. शांताराम जन्मदिन !
     (१८ नोव्हेंबर ) 

 



    व्ही.शांताराम जन्म:१८ नोव्हेंबर १९०१मृत्यू:२८ ऑक्टोबर १९९०  
                         शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वत:ची चित्रपट निर्माती कंपनी काढली.
           ते  पटकथाकार म्हणून   देखील परिचित आहेत.त्यांना १९८५ साली दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर १९९२ ला पदमभूषण पुरस्कार मिळाला.
       व्ही. शांताराम यांचे काही चित्रपट
   १)दो आँखे बारा हात
   २) झनक झनक पायल बाजे
   ३)डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी
   ४) गीत गाया पत्थरोने
   ५) नवरंग
   ६)  पिंजरा
    ७) शेजारी
         व्ही. शांताराम यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
        संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०२१

!! भारतीय राजकारणी लाला लजपत राय स्मृतिदिन !! (१७ नोव्हेंबर )

 

    !!   भारतीय राजकारणी लाला लजपत राय स्मृतिदिन !! (१७ नोव्हेंबर )



                 लाला लजपत राय  जन्म: २८ जानेवारी१८३६ मृत्यू:  १७ नोव्हेंबर १९२८ हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. ते जहाल मतवादी नेते होते.त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.त्यांनी पंजाब नॅशनल बँकेची स्थापना केली.
          लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल या त्रयीला लाल-बाल-पाल म्हणतात.
           भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर आणि पंजाबमधील राजकीय निदर्शनामध्ये भाग घेतल्यानंतर, मे १९०७ मध्ये कोणताही खटला न चालवता लाला लजपत रायांची मंडाले, ब्रह्मदेशात  रवानगी करण्यात आली. पण त्यांना अटक करून ठेवण्यासाठी पुरेसा पुरावा नाही, असे लॉर्ड मिंटो यांनी ठरवल्याने नोव्हेंबरमध्ये त्यांना परत जाण्याची परवानगी देण्यात आली.
          १९२० साली कोलकाता येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या खास अधिवेशनात ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९२१ मध्ये त्यांनी लोक सेवक मंडळ या ‘ना नफा’ तत्वावरील कल्याणकारी संघटनेची स्थापना लाहोर येथे केली. फाळणीनंतर या संस्थेचे कार्यालय दिल्ली येथे हलवण्यात आले. भारतभरात या संस्थेच्या अनेक शाखा आहेत.             
                 १९२८ मध्ये भारतातील राजकीय परिस्थितीबद्दल अहवाल देण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिटीश सरकारने एका आयोगाची स्थापना केली. भारतातील राजकीय पक्षांनी या आयोगावर बहिष्कार घातला, कारण या आयोगाच्या सदस्यांमध्ये एकही भारतीयाचा समावेश नव्हता. या आयोगाविरुद्ध भारतभर निदर्शने झाली.३० ऑक्टोबर १९२८ रोजी जेव्हा या आयोगाने लाहोरला भेट दिली, तेव्हा त्याविरुद्ध मूक निदर्शनांचे नेतृत्व लाला लजपत रायांनी केले. पोलिस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी या निदर्शकांवर लाठी हल्ला करण्याचे आदेश दिले.जखमी होऊन सुद्धा लाला लजपत रायांनी या जमावासमोर भाषण केले."आज मी ज्या लाठ्या खाल्ल्या, त्या म्हणजे ब्रिटीश सरकारच्या भारतातील राजवटीच्या शवपेटिकेवरील शेवटचे खिळे ठरतील, असे मी जाहीर करतो." हे त्यांचे यावेळचे उद्गार होते.
          निदर्शनांच्या वेळेला झालेल्या लाठी हल्ल्यातून लाला लजपत राय पूर्णपणे बरे झाले नाहीत आणि हृदय विकाराच्या धक्क्याने १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचे निधन झाले. स्कॉटच्या लाठीमारामुळे लालाजींचा मृत्यू ओढवला, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. पण जेव्हा हा मुद्दा ब्रिटनच्या संसदेत उपस्थित करण्यात आला तेव्हा, यात आपली काहीही भूमिका नव्हती, असे ब्रिटीश सरकारने जाहीर केले. या घटनेचा सूड घेण्याचे भगतसिंग यांनी ठरवले.
                   पण ऐनवेळी स्कॉटला ओळखण्यात चूक झाल्यामुळे भगतसिंगांना सॉन्डर्स या सहाय्यक पोलिस अधीक्षकावर गोळ्या झाडण्याचा इशारा करण्यात आला. १७ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर मधील जिल्हा पोलिस मुख्यालयातून बाहेर पडणाऱ्या सॉन्डर्सवर राजगुरू आणि भगतसिंग यांनी गोळ्या झाडल्या. या दोघांचा पाठलाग करणारा चनन सिंग नावाचा हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झाला.  लाला लजपतराय यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

!! जीवन बदलाची वारी -कार्तिकीची !!

 !! जीवन बदलाची वारी -कार्तिकीची !!

    (एकादशी -१५ नोव्हेंबर २०२१)




               कार्तिकी एकादशीनिमित्त मी कुटूंबियांसमवेत पंढरपुरला आलो होतो.माझ्या समवेत वर्णे येथून माझी सौभाग्यवती सौ. कुसुमताई आणि वर्णे गावचे माजी सरपंच तथा श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट वर्णे आबापुरीचे विश्वस्त हणमंतराव पवार (तात्या ),एकंबे येथून श्री गोरख चव्हाण, सौ. इंदुमती चव्हाण व सापहून माझी ज्येष्ठ मेहुणी सौ. शांताताई कदम आदी मंडळी बरोबर होती.

              आम्ही सर्वजण पंढरपूर येथील वैष्णव सदन (शेगाव दुमाला ) येथे उतरलो होतो. एकादशीदिवशी प्रचंड गर्दी असल्याने रांगेतून लवकर दर्शन होणे अवघड असल्याने नगरप्रदक्षिणा व मंदिर प्रदक्षिणेचा  मार्ग निवडला. कळसाचेच दर्शन घेतले. एकादशीदिवशी रात्री गाथा मंदिर देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांचे कीर्तन झाले. महाराजांनी कीर्तन सेवेसाठी तुकाराम महाराजांचा अभंग  घेतला होता. तो खालीलप्रमाणे......

!!आम्ही तेने सुखी! म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी  !!१ !!

!! तुमचे येर वित्त धन! ते मजमृत्तिकेसमान !! २ !!

!!कंठी मिरवा तुलसी! व्रत करा एकादशी !!३ !!

!!म्हणवा हरीचे दास! तुका म्हणे मज ही आस !!४ !!

                प्रस्तूतचा अभंग प्रासंगिक स्वरुपाचा आहे. संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज समकालीन,महाराजांची कीर्ती शिवरायांच्यापर्यंत पोहचली होती. शिवरायांना संत तुकाराम महाराजांच्या सामाजिक कार्याबद्दल पूर्णपणे कल्पना होती. सामाजिक जीवनातील व्यस्ततेमुळे संत तुकाराम महाराजांच्या कुटूंबाची दुर्दशा झाली होती. त्या दयनीय अवस्थेतुन महाराज बाहेर पडावेत यासाठी आपल्या नोकराकरवी तुकाराम महाराजांना भेट म्हणून नजराणा पाठवतात. त्या नजरण्याचा ते स्वीकार करत नाहीत. ते म्हणतात, संतांचे हित समाजहितातच लपले आहे. आपलं जीवन जगत असताना लोकांनी परमेश्वराचे नामस्मरण करावे त्यातच संतांचे सुख आहे असे अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, शिवरायांनी पाठवलेले जडजवाहीर आम्हाला मातीसमान आहे. आम्हाला अशा कोणत्याही धनाची आसक्ती नाही. येथे शिवाजी महाराजांच्या दूताबरोबर चर्चा झाल्याचे म्हटले आहे. शिवरायांचा नोकर म्हणतो, आपलं हिततरी नेमकं कशात आहे. गळ्यात तुळशी माळ घालावी, एकादशीचे व्रत करावे. स्वतःला मालक न समजता स्वतःला हरीचे दास म्हणवून घ्यावे. थोडक्यात काय तर मी कोणी वेगळा आहे असे समजू नये. स्वतःला सामान्य म्हणवून घ्यावे, या गोष्टींची आस संतांना लागलेली असते. आपण संतांना आवडणारे जीवन जगले पाहिजे.  आपल्या हातून समाजविघातक कृत्य घडू नये याची काळजी घेतली पाहिजे.संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे आज परिस्थिती राहिलेली नाही. आधुनिक संत आज समाजातून सामाजिक कार्यासाठी धनाचा स्वीकार करतात. या धनातूनच मंदिरे, घाट, शाळा महाविद्यालये, आरोग्य विषयक उपक्रम राबवलेलं  दिसत आहेत.

                या कीर्तनाचा प्रभाव  माझ्यावर पडलाच, तत्पूर्वीच गोरख चव्हाण व  सौ.इंदुमती चव्हाण यांनी माझी मानसिक तयारी केली होती. किर्तनानंतर ह.भ.प. पांडुरंग महाराज घुले यांच्या हस्ते  मी माळ घातली. माळ घालताना वरील सर्व मंडलीसह रंगनाथ हांडे (मामा), राजू वाघ, श्री तानाजी निकम आदी उपस्थित होते.

             आजची कार्तिकी एकादशी माझ्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी ठरली. जीवनातील पुढील सर्व कार्य पांडुरंग करवून घेईल यात संदेह नाही.

         राजेंद्र पवार 

        ९८५०७८११७८

#pandurang #pandharpur #wari #pandharpurwari #kritikiwari #ekadashi 

!! क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे स्मृतिदिन !! (१६ नोव्हेंबर )

 

!! क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे स्मृतिदिन !! (१६ नोव्हेंबर )



              विष्णु गणेश पिंगळे (२ जानेवारी १८८९:तळेगाव (ढमढेरे), महाराष्ट्र, भारत - १६ नोव्हेंबर,  १९१५:लाहोर, पाकिस्तान) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. त्यांनी लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत गदर पार्टी या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती.
               विष्णु पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव (ढमढेरे) या गावचे राहाणारे असून इ.स. १९११ साली अमेरिकेतून इंजिनीयर झाले होते. देशाच्या दुर्दर्शेने, पारतंत्र्यातील जुलमामुळे पिंगळे तळमळत असल्याने क्रांतिकार्याला जीवन समर्पित करण्याचा त्यांनी निश्चय केला. ऑरेगॉन व कॅलिफोर्निया संस्थानातील सैन्य सिद्धतेला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. त्यांच्या देखरेखीखाली प्रसिद्ध गदरी लष्कर तयार झाले. पहिल्या महायुद्धाच्या वेळेस सशस्त्र क्रांती करून देश स्वतंत्र करण्याच्या ध्येयाने पिंगळे भारतात आले. रासबिहारी बोस, विष्णु पिंगळे, कर्तारसिंह सराबा, शचिंद्रनाथ संन्याल आदींनी २१ फेब्रुवारी १९१५ रोजी भारतात सार्वत्रिक सशस्त्र उठावणी करण्याची योजना केली होती. फितुरीमुळे कट फसला आणि विष्णु पिंगळे सहित ८ क्रांतिकारक लाहोरच्या कारागृहात फासावर चढले.विष्णू पिंगळे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
             संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

!! गिजुभाई बधेका जन्मदिन !! (१५ नोव्हेंबर )


 


!! गिजुभाई बधेका जन्मदिन !!
       (१५ नोव्हेंबर )
गिजुभाई बधेका जन्म:१५ नोव्हेंबर १८८५ मृत्यू:२३ जून १९३९  गिजुभाईंनी मॉन्टेसरी शिक्षण पद्धती भारतात आणण्यास मदत केली . त्यांना "मुछली माँ" ("कुजबुजणारी आई") म्हणून संबोधले जाते. बधेका हे उच्च न्यायालयाचे वकील होते, तथापि आपल्या मुलाच्या जन्मानंतर, त्यांना बालपणातील विकास आणि शिक्षणात रस निर्माण झाला. १९२० मध्ये, बधेका यांनी "बाल मंदिर"(बालवाडी) पूर्व-प्राथमिक शाळेची स्थापना केली .
        खरतरं  गिजुभाईंना रोजीरोटी मिळवण्यासाठी आफ्रिकेला जावे लागले. गिजुभाईंच्यावर आफ्रिकेत सॉलिसिटर एसपी स्टीव्हन्स यांचा जास्त प्रभाव पडला. त्यांनी गिजुभाईंना स्वावलंबी होण्याचा सल्ला दिला. नंतरच ते मुंबईला आले, कायद्याचे शिक्षण घेतले, वकील झाले,न्यायाधीश झाले.मुलाच्या जन्मानंतर नोकरीचा त्याग केला.शिक्षणकार्यासाठी स्वतःला वाहून घेतले. थोडक्यात पूर्वप्राथमिक शिक्षण सुरु करण्याचे श्रेय गिजुभाईंना जाते. त्यांनी लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली होती.
         जन्मदिनाच्या निमित्ताने गिजुभाई बधेका यांना विनम्र अभिवादन.
            संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

       

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

!! बालदिन !! (१४ नोव्हेंबर )

 

           !! बालदिन !! (१४ नोव्हेंबर )
पंडित जवाहरलाल  मोतीलाल नेहरु जन्म:१४ नोव्हेंबर १८८९ मृत्यू :२७ मे १९६४

 



      भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा १४ नोव्हेंबर हा जन्मदिवस दरवर्षी संपूर्ण भारतात त्यांचा जन्मदिवस  बालदिन म्हणून साजरा केला जातो.लहान मुलं म्हणजे पंडितजींना जीव की प्राण ,मुलं ही देवाघरची फुलं आहेत असे ते म्हणायचे.
        पंडित जवाहरलाल नेहरु मुलांमध्ये रमायचे.मुलावरच्या प्रेमामुळे ते सर्वांचे लाडके चाचा नेहरु झाले. मुलं ही देशाचं भविष्य आहेत, त्यामुळे लहान वयात त्यांना योग्य मार्गदर्शन मिळाले तरच ते आदर्श नागरिक होऊ शकतील. त्याच उद्देशाने पंडितजींनी पंतप्रधान झाल्यावर लहान मुलांसाठी अनेक योजना तयार केल्या आणि त्याची अंमलबजावणी होत आहेकी नाही याकडे जातीने लक्ष दिले. अशा पंडितजींना मानाचा मुजरा.           
           संकलक:  राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

शुक्रवार, १२ नोव्हेंबर, २०२१

!! वसंतदादा पाटील जन्मदिन !! (१३ नोव्हेंबर )

 

!! वसंतदादा  पाटील जन्मदिन !!
   (१३ नोव्हेंबर )




वसंतराव दादा पाटील जन्म: १३ नोव्हेंबर १९१७ मृत्यू :१ मार्च १९८९
         महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा बंडूजी पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
त्यांचे वडील बंडूजी व आई रुक्मिणीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या वसंतदादांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंत झाले.
सांगली जिल्ह्यातील, मिरज तालुक्यातील पद्माळे या छोट्या गावी जन्मलेले वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते. तसेच स्वतंत्र भारतातल्या पहिल्या निवडणुकीतच ते सांगलीतून आमदार म्हणून निवडून आले होते. पुढील काळात सुमारे २५ वर्षे त्यांनी सांगलीचेच प्रतिनिधित्व (विधानसभेत व लोकसभेत) केले. राजकीय जीवनात त्यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदी संस्था-संघटनांची अध्यक्षपदे सांभाळली. पक्ष कार्याला त्यांनी विशेष महत्त्व दिले. वसंतदादांनंतर काँग्रेस पक्ष संघटनेला एवढे बळ देणारा नेता पुढे काँग्रेसला महाराष्ट्रात मिळालाच नाही. तसेच प्रामुख्याने ग्रामीण महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव कायम राहण्यात व वाढण्यात दादांचाच वाटा मोठा आहे, असे राजकीय निरीक्षक म्हणतात. सत्तेची हाव नसलेला सत्ताधारी, असे दादांबद्दल म्हटले जाते.
        महाराष्ट्राचे नेतृत्व करताना दादांनी अनेक समाजहितकारक, दूरगामी परिणाम साधणारे निर्णय घेतले. १९८३ मध्ये त्यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालये व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होण्याबरोबरच, या निर्णयामुळे शैक्षणिक व पर्यायाने औद्योगिक विकासालाही चालना मिळाली. वसंतदादांनी राज्याचा विकासविषयक आढावा घेण्यासाठी अर्थतज्ज्ञ वि. म. दांडेकर यांची सत्यशोधन समिती नेमली. यातूनच समतोल विकास, विदर्भ-मराठवाड्याचा अनुशेष (बॅकलॉग) अशा संज्ञा पुढे आल्या. शालेय विद्यार्थ्यांना मोफत एस.टी. प्रवास, परगावी शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डब्यांची मोफत वाहतूक, शेतकर्‍यांना कमी व्याज दराने कर्जपुरवठा इत्यादी महत्त्वाचे निर्णय दादांनी त्यांच्या काळात घेतले. पाणी अडवा, पाणी जिरवा हे सूत्र प्रथम दादांनी महाराष्ट्रासमोर आणले. दादांच्या या लोकहितकारक निर्णयांची बीजे त्यांच्या देशभक्तीत व त्यांनी केलेल्या क्रांतिकार्यांत आढळतात.
      वसंतदादा अगदी लहान वयातही (१९३०) स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले होते. १९४० पासून त्यांनी लढ्यात जोमाने सहभाग घेतला. फोनच्या तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वेचे नुकसान करणे, पिस्तुल-बाँबचा वापर करून ब्रिटिशांमध्ये दहशत निर्माण करणे इत्यादी कामांच्या माध्यमातून त्यांनी सांगली जिल्ह्यात, १९४२ मध्ये आपला ब्रिटिश विरोध प्रखर केला. कायदेभंग चळवळीच्या काळात सोलापूरला चार युवक हुतात्मे झाले. या हौतात्म्याची आठवण म्हणून दादांनी चहा सोडला होता. दादा काही काळ भूमिगत होते. त्यांना सुमारे ३ वर्षे तुरुंगवासही भोगावा लागला. १९४३ मध्ये दादांनी तुरुंगातून निसटण्याचा प्रयत्‍न केला असता, त्यांना खांद्याला गोळी लागली होती, व त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला होता. दादांच्या सुटकेसाठी सांगलीकरांनी सभा-मोर्चा या माध्यमातून प्रयत्न केले होते. या प्रयत्‍नांत रामानंद भारती, बॅ. नाथ पै देखील सहभागी होते. सातारा-सांगली या भागांत दादा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्याबरोबर आघाडीवर होते. स्वातंत्र्य मिळाल्यावर स्थानिक स्वातंत्र्य-सैनिकांकडून शस्त्रास्त्रे परत घेऊन, त्यांच्यामध्ये विधायक कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण काम दादांनी केले होते.
               वसंतदादांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी सहकार क्षेत्राचा केलेला विकास व विस्तार होय. त्यांनी सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी-उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्धविकास या क्षेत्रांत सहकाराचा प्रसार प्रामुख्याने दादांनी केला. खत कारखाने, सूत गिरण्या, तेल गिरण्या, कागद कारखाने, सिमेंट पाईपचे कारखाने, कृषी अवजारांचे उत्पादन व कृषी प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योग राज्यात वसंतदादांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले. १९५६-५७ मध्येच त्यांनी शेतकरी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती. त्या वेळी त्यांनी स्वत:शेतांमध्ये जाऊन ऊस कसा लावायचा, याचे शेतकर्‍यांना प्रात्यक्षिक दिले होते. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेसह उप-उत्पादनांचीही निर्मिती करावी असा आग्रह दादांनी धरला. तसेच कारखान्याच्या परिसरात शिक्षण, आरोग्य, इतर उद्योग व मूलभूत सोयीसुविधा या क्षेत्रांत विकास साधण्यासाठी विकास निधी वेगळा काढण्याची कल्पना त्यांनी रुजवली. त्यामुळे आज महाराष्ट्रात कारखान्यांना जोडून निर्माण झालेली विकास केंद्रे आपल्याला दिसतात. दादांनी डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटची स्थापना करून संशोधनाला चालना दिली. याच संस्थेचे नाव आज वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिटयूट आहे. आज राज्यात छोट्या-मोठ्या सहकारी पतसंस्थांचे जाळे उभे राहिलेले दिसते. यामध्येही वसंतदादांचा मोठा वाटा आहे.
            सहकार क्षेत्रातील या अद्वितीय कामगिरीमुळेच १९६७ मध्ये त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने गौरवण्यात आले. वसंतदादा १९५२ पासून लोकप्रतिनिधी होते, १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले, व नंतर मंत्री -मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास झाला. विशेष म्हणजे १९५२ ते १९७२ दरम्यान त्यांनी सहकार क्षेत्रातील बहुतांश कार्य केले. या पार्श्वभूमीवर दादांनी ज्या काळात सहकार क्षेत्राची पायाभरणी व विस्तार केला तो काळ १९५२ ते १९७२ असल्याचे लक्षात येते. विशेष म्हणजे सत्तास्थानांवर नसताना त्यांनी सहकाराचा प्रचार-प्रसार-विकास केला हे लक्षणीय ठरते.
        स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या विविध प्रकारच्या अनुभवांचे संचित, स्मरणशक्ती, नेतृत्वगुण, संघटनकौशल्य, समाजमन-आकलन शक्ती, निर्णयक्षमता, शेतकरी व ग्रामीण समाजजीवनाची अचूक, परिपूर्ण जाणीव - इत्यादी गुणांच्या आधारे वसंतदादांनी महाराष्ट्राचा विकास साधला. १९१८ मध्ये प्लेगच्या साथीत दादांच्या आई-वडिलांचा एकाच दिवशी मृत्यू झाला होता. त्या वेळी केवळ एक वर्षाचे असणार्‍या दादांचा सांभाळ, पुढील आयुष्यात त्यांच्या आजीने केला होता. या परिस्थितीत दादा जास्त शिकू शकले नाहीत. पण पुढील आयुष्यात त्यांनी केलेल्या विकास-कार्याची फळे आज महाराष्ट्र चाखतो आहे. म्हणूनच दुर्दैवाने फार शिकू न शकलेला, पण तरीही सर्वांत शहाणा नेता या समर्पक शब्दांत त्यांचे वर्णन केले जाते.
       वसंतदादाना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
        संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

गुरुवार, ११ नोव्हेंबर, २०२१

पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिन !! (१२ नोव्हेंबर)

 !! पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली जन्मदिन !! 

(१२ नोव्हेंबर) 




डॉ. सलीम अली ( सलीम मोईझुद्दीन अली- जन्म १२ नोव्हेंबर इ.स. १८९६ ; मृत्यू- २० जून इ.स. १९८७) हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणवादी होते. सलीम अली यांनी भारतातील ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतातील पक्ष्यांचा आढळ, त्यांच्या सवयी, पक्ष्यांच्या विविध जाती आणि जातींमधील वैविध्य यांचा बारकाईने अभ्यास केला. त्यांच्या ह्या कार्याने भारतात हौशी पक्षिनिरीक्षक बनण्याची परंपरा चालू झाली. भारतातील हे पक्षी निरीक्षक सलीम अली यांना आद्य गुरू मानतात. त्यांना birdman of India असे ही संबोधले जाते.
संकलक : राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

बुधवार, १० नोव्हेंबर, २०२१

!! मौलाना अबुल कलाम आझाद जन्मदिन (शिक्षणदिन २०११ पासून)!! (११ नोव्हेंबर )

 

       !!   मौलाना अबुल कलाम आझाद  जन्मदिन (शिक्षणदिन २०११ पासून)!!
        (११ नोव्हेंबर )    

   


  
मौलाना अबुल कलाम आझाद जन्म : ११ नोव्हेंबर १८८८ मृत्यु: २३ फेब्रुवारी १९५८  हे एक भारतीय प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुलकलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही  ही उपाधि मिळाली. त्यांचा जन्म मक्केला झाला. वडिलांबरोबर १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षणपद्धतीप्रमाणे मौ. आझादांनी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन करून नंतर तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित ह्यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान ह्यांच्या लेखांचा परिणाम होऊन मौलानांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला.
                     १९०८ मध्ये ईजिप्त, अरबस्तान, तुर्कस्तान, फ्रान्स इ. देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, हे मत त्यांनी प्रतिपादिले. लोकजागृतीसाठी १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून १०,००० रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पडले. १९१५ साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. १९२० साली त्यांची सुटका झाली. ते असहकाराच्या चळवळीत सामील झाले. १९२१ मध्ये पुन्हा त्यांना अटक करण्यात आली; पण एका वर्षानंतर त्यांना मुक्त करण्यात आले; १९२३ च्या दिल्ली येथील काँग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले. १९३० मध्ये त्यांना पुन्हा कैद झाली. ह्या वेळी मुसलमान जमातीस सत्याग्रहात सामील करून घेण्याचे मुख्य श्रेय आझादांनाच मिळाले.
               आझाद १९३९ ते ४६ पर्यंत काँग्रेसचे अध्यक्ष होते. १९४२ च्या चले जाव आंदोलनाच्या वेळी त्यांना पुन्हा तुरुंगवास भोगावा लागला. १९४५ साली सर्व नेत्यांबरोबर त्यांची सुटका झाली. १९४२ ची क्रिप्सयोजना, १९४५ ची वेव्हेलची सिमला परिषद व १९४६ मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत काँग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला. स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्यंत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा,गुब्बारे खातिर्, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. ह्याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (१९५९) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे;  मात्र त्यातील अप्रकाशित तीस पाने १९८८ मध्ये प्रसिद्ध करण्यात येतील. त्यांची भाषणेही पुस्तकरूपाने अलीकडे प्रसिद्ध झाली आहेत. 
     त्यांचा  जन्मदिन २०११ पासून संपूर्ण भारतात शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.
            मौलाना अबुल कलाम आझाद यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

सोमवार, ८ नोव्हेंबर, २०२१

!!ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा स्मृतिदिन !! (१० नोव्हेंबर )

 

!!ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा स्मृतिदिन !!
  (१० नोव्हेंबर )



           माणिक वर्मा जन्म:१६ मे १९२६ मृत्यू:१०नोव्हेंबर१९९६
माणिक वर्मा, पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर या हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीत या संगीतप्रकारांत गायन करणाऱ्या मराठी गायिका होत्या. त्या हिंदुस्तानी संगीतातील किराणा घराण्याच्या शैलीत गायन करत. 
              मराठी भाषेतील गाजलेली भावगीते, नाट्यगीते व चित्रपटगीते त्यांनी गायली आहेत. किराणा घराण्याच्या गायिका  हिराबाई बडोदेकर यांच्याकडे त्या हिंदुस्तानी  संगीत शिकल्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल  १९७४ साली पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.
          माणिक वर्मा यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
(माणिक वर्मा यांनी गायलेले"अमृताहूनी गोड नाम तुझे देवा"हे गीत ऐकण्यासाठी लिंक देत आहे. आपण या गीताचा आस्वाद घ्यावा.)
https://youtu.be/5MW577qqtgI
                   संकलक:  राजेंद्र पवार
                     ९८५०७८११७८

!!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !! (९ नोव्हेंबर )

 

!!महर्षी धोंडो केशव कर्वे स्मृतिदिन !!
    (९ नोव्हेंबर )



महर्षी धोंडो केशव कर्वे जन्म:१८ एप्रिल
१८५८ मृत्यू:९ नोव्हेंबर १९६२
             आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ व कर्ते समाजसुधारक होते. महर्षी अण्णासाहेब कर्वे या नावानेच ते सर्वांना परिचित आहेत. त्यांचा जन्म कोकणातील मुरुड या गावी एका गरीब कुटुंबात झाला. शालेय शिक्षण मुरुड व रत्नागिरी येथे झाला. १८९१ मध्ये मुंबई येथून ते बी. ए. झाले. त्याच वर्षी लो. टिळकांनी फर्ग्युसन कॉलेजमधील आपल्या जागेचा राजीनामा दिल्यावर नामदार गोखल्यांनी त्यांची गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. त्यानंतरच त्यांच्या समाजकार्यास चालना मिळाली.
              महर्षी धोंडो केशव कर्वे यांची पहिली पत्नी वारल्यानंतर १८९१ मध्ये त्यांनी पंडिता रमाबाईंच्या ‘शारदा सदन’ या संस्थेतील एका विधवेशी पुनर्विवाह केला. आनंदीबाई तथा बाया कर्वे यांनी कर्व्यांना आयुष्यभर साथ दिली. या पुनर्विवाहामुळे कर्व्यांना तत्कालीन ब्राह्मण समाजाने वाळीत टाकले पण तरीही न डगमगता त्यांनी विधवांच्या उद्धाराचे कार्य चालूच ठेवले. १८९३ साली त्यांनी ‘विधवाविवाह प्रतिबंध निवारक मंडळ’ काढले आणि पुनर्विवाहितांचे कुटुंब-मेळेही भरविले. याच दिशेने विधवांच्या शिक्षणासाठी त्यांनी १८९९ साली ‘अनाथबालिकाश्रम’ या संस्थेची स्थापना केली. पुण्याजवळील हिंगणे येथे १९०० सालापासून हा आश्रम सुरू झाला. पुढे सुगृहिणीपदाच्या दृष्टीने योग्य असेच शिक्षण स्त्रियांना दिले पाहिजे, या जाणिवेने ते स्वतंत्र महिला विश्वविद्यालयाच्या स्थापनेसाठी प्रयत्न करू लागले. त्यातूनच ठाकरसी कुटुंबाच्या आर्थिक मदतीने १९१६ मध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ उभे राहिले. या विद्यापीठातील अभ्यासक्रमामध्ये स्त्रीजीवनाशी संबद्ध अशा विविध विषयांचा समावेश असून शिक्षणाचे माध्यम मातृभाषा आहे. अनाथ बालिकाश्रम आणि महिला विद्यापीठ या संस्थांतून महाराष्ट्रातील हजारो स्त्रियांनी आपले शिक्षण पुरे केले आहे. या दोन संस्थांच्या उभारणीसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी अण्णासाहेब कर्व्यांनी आयुष्यभर स्वदेशात आणि परदेशातही  मिशनरी बाण्याने वणवण केली.
          महर्षी कर्वे यांचे आयुष्य संस्थामय होते. वरील संस्थांखेरीज १८८६ मध्ये ‘मुरुड फंड’ ,१९१० मध्ये स्त्रियांच्या उद्धारासाठी आमरण कार्य करणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत म्हणून काढलेला ‘निष्काम मठ’ ,१९३६ मध्ये ग्रामीण शिक्षणासाठी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ , जातिभेद आणि अस्पृश्यता यांच्या निर्मूलनाच्या उद्दिष्टाने काढलेला  १९४४ मध्ये‘समता-संघ’ इ. संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्यांचे आत्मवृत्त १९१५ मध्ये प्रकाशित झाले असून ते अत्यंत उद्बोधक आहे.
            आधुनिक भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात व विशेषतः स्त्रीशिक्षण, विधवाविवाह या बाबतींत कर्व्यांनी आपल्या आमरण कार्याने, चिकाटीने आणि ध्येयवादाने एक अपूर्व आदर्श निर्माण केला. या शतायुषी महर्षीचा गौरव भारत सरकारने १९५५ मध्ये पद्मविभूषण ,१९५८ मध्ये भारतरत्न  या पदव्या देऊन केला. त्यांच्या कार्याचे दिग्दर्शन करणारा एक अनुबोधपटही सरकारने काढलेला आहे.
               महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
            संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

रविवार, ७ नोव्हेंबर, २०२१

!!पु. ल. देशपांडे जन्मदिन !! (८ नोव्हेंबर )

 


!!पु. ल. देशपांडे जन्मदिन !!
      (८ नोव्हेंबर )



       पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे जन्म:
८ नोव्हेंबर १९१९ मृत्यू:१२जून २०००
             महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. पुल बहुरूपी होते. लेखक, नाटककार, अभिनेता, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक असा अनेक भूमिका त्यांनी वठवल्या. त्यांची कीर्ती लेखक म्हणून असली तरी त्यांची गती या सर्व क्षेत्रात सारखी होती.
           ' गुळाचा गणपती' या 'सबकुछ पु.ल.' म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जवळजवळ सर्वच पैलूंचे दर्शन होते.
पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार निरिक्षणे नेमकेपणाने पकडून त्याला हसायला शिकवले.
         मुंबईत जन्मलेले पुलं पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात शिकले. ४० च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी महाविद्यालयात शिक्षक या नात्यानेही काही काळ काम केले. त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील योगदान लक्षणीय आहे.
           ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.
           पुलंनी जवळपास ४०वेगवेगळी पुस्तके लिहिली. बटाट्याची चाळ, असा मी असा मी, व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकांच्या तर २० हून अधिक आवृत्या खपल्या. त्यांच्या लोकप्रियतेचे उदाहरण व साहित्याचा कस जोखण्याचे यापेक्षा कोणते वेगळे परिमाण असू शकते?
             मराठी वाडमयाचा (गाळीव) इतिहास, खोगीरभरती, पुरचुंडी, नस्ती उठाठेव, गोळाबेरीज, हसवणूक ही त्यांची इतर विनोदी पुस्तकेही गाजली. त्यांच्या आवृत्त्यांचेही विक्रम झाले. त्यांची निरीक्षण शक्ती अफाट होती, हे त्यांनी लिहीलेल्या प्रवासवर्णनावरूनच कळेल. त्यांनी अमेरीका, युरोप, आशियातील अनेक देश पाहिले.
             त्यात त्यांना प्रवासात आलेले अनुभव त्यांनी अतिशय गमतीदार पध्दतीने लिहिले आहेत. पूर्वरंग, अपूर्वाई, जावे त्याच्या देशा , वंगचित्रे आदी प्रवासवर्णने आहेत. त्यांची नाटकेही अतिशय गाजली. वार्‍यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी ही काही नाटके आहेत.
                 याशिवाय त्यांनी लिहिलेली काही व्यक्तिचित्रेही अजरामर ठरली आहेत. गणगोत, गुण गाईन आवडी, मैत्र, आपुलकी यात पुलंनी आपल्या सुह्रदांबद्दल लिहिले आहे. पुलंच्या नावावर काही चांगले अनुवाद आहेत. द ओल्ड मॅन अँड द सी या हेमिंग्वेच्या गाजलेल्या पुस्तकाचे एका कोळीयाने या नावाने पुलंनी केलेला अनुवाद निव्वळ अप्रतिम.
                    याशिवाय मनोहर माळगावकरांच्या कान्होजी आंग्रे हे ऐतिहासिक व्यक्तिचित्र रेखाटलेले अनुवादीत पुस्तकही पुलंच्या नावावर आहेत. बटाट्याची चाळ व असा मी असामी चे त्यांनी एकपात्री प्रयोगही बरेच केले. बा. भ. बोरकरांच्या कविता त्यांनी व सुनीताबाई देशपांडे यांनी एकत्र वाचण्याचे कार्यक्रमही त्यांनी केले.
       पुलंनी मराठी माणसाला एवढे काही दिले आहे की 'किती घेशील दो कराने' अशी त्यांची अवस्था झाली आहे. साहित्य अकादमी व संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणार्‍या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
पुलंना जन्मदिनाच्या निमित्ताने मानाचा मुजरा.
            संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

!! भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन (विद्यार्थी दिवस )!! (७ नोव्हेंबर )

 


!! भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश दिन  (विद्यार्थी दिवस )!! (७ नोव्हेंबर )




           विद्यार्थी दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ ७ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने ७ नोव्हेंबर हा दिवस 'विद्यार्थी दिवस' म्हणून राज्यभर साजरा करण्याचा निर्णय २७ ऑक्टोबर, २०१७ रोजी घेतला. अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान असतानाही आंबेडकरांनी स्वतःला आजन्म विद्यार्थी मानले, आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले यामुळे शासनाने त्यांच्या शाळा प्रवेश दिनाला विद्यार्थी दिन म्हणून घोषित केले. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.यावर्षी शाळांमध्ये कोविड- १९ मुळे सर्व कार्यक्रमावर बंधने आलेली आहेत. तरीसुध्दा या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यार्थी म्हणून कारकिर्दीचे स्मरण करुया.
                      ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा शहरातील  असलेल्या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये पहिल्या  इयत्तेत प्रवेश घेतला होता.  पूर्वी गव्हर्नमेंट स्कूल म्हणून ही शाळा ओळखली जात होती.येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर १९०४ पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. शाळेत त्यांच्या नावाची भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद आहे. शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. याच शाळेचे विद्यार्थी भारताचे महान नेते ठरले. भारतीय घटनेचे शिल्पकार ठरले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी राहिले.
                    आपणही नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी प्रयत्नशील राहूया. शिकण्यासाठी वयाचा अडसर असत नाही. चला तर आपण आजन्म विद्यार्थी बनण्याची शपथ विद्यार्थीदिनाच्या निमित्ताने घेऊया.
          संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...