गुरुवार, ३० जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दहावा ३० जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दहावा ३० जून )

           दोन दिवसांच्या लोणंद मुक्कामानंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दुपारी एक वाजता तरडगावच्या दिशेने मार्गस्थ झाली. फलटण तालुक्यात पालखीचे आगमन झाल्यानंतर प्रशासनाच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. फक्त ५ किलोमीटरवर चांदोबाचा लिंब हे ठिकाण असून येथे पहिले उभे रिंगण होते. रिंगणाच्या मार्गावर सर्वत्र रांगोळी काढली होती. रिंगणात चोपदारांचा अश्व पुढे व माऊलींचा अश्व मागे असतो. हे दोन्ही अश्व धावत असताना प्रत्येकजण माऊली, माऊली असा जयघोष करीत असतात. हा सोहळा अतिशय नयनरम्य होता. हे रिंगण पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या तालुक्यातील भाविक आलेले होते. लोणंद ते तरडगाव हे अंतर केवळ ८ किलोमीटर असून, हा सगळ्यात छोटा टप्पा आहे. बरेच लोक लोणंद ते तरडगाव हा टप्पा पायी चालतात. वारी सुरु झाल्यापासून या गावाने नेहमीच  वारीला सहकार्याची भूमिका घेतली असल्याने  या गावाला हा  खूप मोठा मान मिळाल्याचे दिसते.येथील पालखीतळही साडेबारा एकरावर विस्तारलेला आहे.








 तरडगाव गावाबाबत थोडीसी माहिती सांगितलीच पाहिजे.....

             या गावाजवळ रथ आल्यानंतर पालखी रथातून उतरवली जाते. गावातील तरुण पालखी वाहण्याचे काम करतात. या गावात विठ्ठल मंदिर,पवारवाडा, चाफळकर वाडा,सावता माळी मंदिर याठिकाणी पालखी  थांबते. इतकेच नव्हे तर ती खाली ठेऊन  तिची पूजा केली जाते. या गावावर वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव  जाणवतो. वर्षभरात ५ वेळा या गावात ज्ञानेश्वरी पारायणे होतात. गावातील ६०% लोक हे माळकरी आहेत. फलटण-कोरेगाव मतदार संघाचे आमदार दिपक चव्हाण यांचे हे गाव असून हे गाव प्रगत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. या गावातील गावकरी  ठिकठिकाणी खाऊ तसेच पाणी वाटप करताना दिसून आले.

               आज आमचा मुक्काम अनिल गाडे या किराणा दुकानदाराकडे आहे. या कुटुंबाचा सेवाभाव खूप काही शिकवून गेला.या कुटुंबाने आमची शाही व्यवस्था केली त्यामुळे त्यांच्या ऋणातच सदैव राहावे असे वाटते.

            पालखी तळावर पालखी आल्यानंतर ती वाजत गाजत तंबूकडे नेली जाते. यावेळी वाद्यांचा गजर आणि मुखाने ज्ञानबा तुकाराम यांच्या नामाचा जयघोष चालू होता. संपूर्ण पालखी मार्गावर चोपदारांचे राज्य चालू असते. जणू काही ते अनभिषिक्त सम्राटच असतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चोपदारांनी दंड उंचावताच सर्वत्र शांतता पसरते. जर एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर ते वाद्यांचा गजर चालूच ठेवतात. आज एक नंबरच्या दिंडीने गजर चालू ठेवला होता. त्यांची तक्रार चोपदारांनी ऐकून घेतली. यावेळी हरवलेल्या जिनसा व सापडलेल्या जिनसा यांचा उल्लेख केला जातो. ज्याच्या जिनसा आहेत त्यांना ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले जाते. वारीत एखाद्याला वस्तू सापडली तर सोहळ्याच्या कार्यालयात जमा केली जाते. थोडक्यात वारीत भौतिक वस्तूंचा मोह सोडला जातो.

         वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. येथे स्वयंशिस्तीला प्राधान्य असते. स्वयंशिस्त असेल तर कितीही अवघड काम सहज शक्य होते. आपणही आपल्या जीवनात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्यावे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

बुधवार, २९ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस नववा २९ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस नववा २९ जून )

               आज ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे आहे.लोणंदला पालखीचा मुक्काम दोन दिवस असल्याने शेजारच्या तालुक्यातील असंख्य भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. आज दर्शनरांगा किमान एक किलोमीटरपर्यंत असाव्यात. दर्शन रांगेत असतानाही भाविक ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत होते. दर्शन सुलभ व्हावे यासाठी पोलीस प्रशासन काळजी घेताना दिसत होते. आम्हालाही पोलीस प्रशासनामुळे आजही  सुलभ दर्शन मिळाले. 

            वारी हे लोक शिक्षणाचे उत्तम माध्यम आहे. चित्ररथाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम चालते. आज असाच ग्रामविकास विभागाचा चित्ररथ पहावयास मिळाला. त्याची माहिती पुढीलप्रमाणे....

 महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभाग,राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान,शाश्वत विकास ध्येयावर आधारित ग्रामपंचायत विकास..... यावर्षीपासून सुधारित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून शाश्वत विकास ध्येयांचे स्थानिकीकरण करण्यासाठी शाश्वत विकास संकल्पनाच्या अंमलबजावणीद्वारे ग्रामपंचायतीची क्षमता बांधणी आणि सशक्त ग्रामपंचायतीसाठी शाश्वत विकास संकल्पनावर आधारित ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करणे व पुढील काळात प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे हे अभियानाचे स्वरुप आहे.






 विकासासाठी खालील बाबी विचारात घेतल्या आहेत.

#गरिबी मुक्त गाव

#बालस्नेही गाव

#स्वच्छ आणि हरित गाव

#आरोग्यदायी गाव

#जल समृध्द गाव

#स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव

# सुशासनयुक्त गाव

#सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव

  आपलं गाव सक्षम करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहूया.

              प्रत्येक दिंडीत किर्तनाचा कार्यक्रम असतोच. आज वाई तालुक्याच्या दिंडीला भेट देण्याचा योग आला. आपण पुरुष कीर्तनकार अधिक प्रमाणात पाहतो. आता स्त्री किर्तनकारही आपणास  पाहायला मिळतात. मात्र हे प्रमाण नगण्य आहे. आज मात्र वाईच्या दिंडीत महिला टाळकऱ्यांचं प्रमाण मोठे आढळून आले. थोडक्यात काय तर महिला टाळकऱ्यांचं प्रमाण काकणभर जास्तच होत. आपण स्त्री- पुरुष समानतेच्या गप्पा मारतो , मात्र तशी संधी देत नाही. संधी दिली तर स्त्रिया संधीचे सोने करतात हेच या प्रसंगी दिसून आले. प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया काम करताना दिसत आहेत. समान संधीच्या दिशेने पावलं उचलली जात आहेत.आपणही स्त्रियांचा सन्मान करुन, वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना काम करण्याची संधी द्यायला हवी असे वाटते.

 राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

मंगळवार, २८ जून, २०२२

!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस आठवा २८ जून )

 !!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस आठवा २८ जून )

              आज सकाळी ६ वाजता वाल्हेहून पालखीचे प्रस्थान झाले. पालखी तळ गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असून तो भव्य आहे.पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी रोजच पाद्य पूजा होत असते. आज जेऊर फाटा येथे पालखीचा पहिला विसावा होता. या विसाव्याच्या ठिकाणी शेजारच्या गावातील लोक वारकऱ्यांसाठी भाकरी, पिठले आणि खर्डा (ठेचा ) घेऊन येत असतात. वारकऱ्यांना याठिकाणी याचकाच्या भूमिकेत जावे लागते. थोडक्यात मागून खावे लागते. आमच्यासाठी पुरंदर तालुक्यातील मांडकी गावच्या ह.भ.प.ज्ञानेश्वर शिंदे (माऊली ) यांनी बाजरीची भाकरी व  खर्डा (ठेचा) आणला होता. त्यांचा आस्वाद आम्ही घेतला. खर्डा खाणे कोणाचंही काम नाही नवीन माणसाला तो आपला प्रताप दाखवतोय. आमचीही यातून सुटका झाली नाही.  











               दुसरा विसावा नीरा येथे होता. नीरा ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर माऊलींचे रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून, फुलांचा वर्षाव तसेच रांगोळ्या काढून स्वागत केले होते. आज दुपारी माउलींनी सातारा जिल्ह्यात प्रवेश केला. सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यात प्रवेश करताच प्रथम पादुकांना नीरा नदीत स्नान घातले गेले. तो क्षण अतिशय भावूक होता. याचवेळी असंख्य भाविकांनीही स्नानाचा आनंद लुटला. मार्गावर काही ठिकाणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी स्नानाची पाईपलाईनद्वारे  व्यवस्था केली होती. एरव्ही स्त्री पुरुष एकत्र स्नान करताना फारसे दिसत नाहीत परंतु वारीच्या वाटेवर प्रत्येकजण वारकऱ्यात विठ्ठल रुक्मिणीचे रुप पाहत असतो. त्यामुळे वेगळा भाव मनात येण्याचा प्रश्नच येत नाही. आज दुपारच्या भोजनाची व्यवस्था मुंबईस्थित असणाऱ्या निलम धस मॅडम यांनी केली होती. नीरा येथे त्यांच्या कुटुंबियांकडून दरवर्षीच पंगतीचे नियोजन असते. बऱ्याचवेळा कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यानंतर बऱ्याच योजना बंद पडतात पण याठिकाणी धस मॅडम यांनी हा उपक्रम सुरु ठेवल्याबद्दल वारकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले.

             आज वर्णे गावाहून माऊलींच्या दर्शनासाठी माजी सरपंच हणमंतराव पवार, रामचंद्र निकम, बाळकृष्ण पवार, बाबासाहेब निकम, शरद हणमंत पवार आदि मंडळी आली होती. वारीचा सोहळा बघून त्यांनी आनंद व्यक्त केला.

               आज आणि उद्या पालखीचा मुक्काम लोणंद येथे आहे. लोणंद नगरीला यात्रेचे स्वरुप आले आहे. आज गायक अर्जुन यादव, तबलजी राहुल लोहार तसेच विजय ढाणे यांनी संगीताची मैफल सादर केली.जशा अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत तसेच ज्ञान आणि मनोरंजन ही सुद्धा आवश्यक गरज होऊन बसली आहे.

   मनोरंजन माणसाला अधिक कार्यप्रवण करते. आपण मनाला आनंद मिळण्यासाठी विविध प्रकारे मनोरंजन करुन घ्यावे असे वाटते.

 राजेंद्र पवार 

९८५०७८११७८

सोमवार, २७ जून, २०२२

!!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सातवा २७ जून )

 !!वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सातवा २७ जून )   

            आज सकाळी बरोबर ७ वाजता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे जेजुरी नगरीतून प्रस्थान झाले. प्रस्थानाच्यावेळी नगरवासीयांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून माऊलीला निरोप दिला तर अनेकांनी मार्गावर उस्फुर्त स्वागत केले. जेजुरीच्या एम. आय.डी.सी  एरियात रस्ते विस्तिर्ण असल्याने वारकऱ्यांना चालणे खूपच आरामदायी वाटत होते. मार्गावर अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे, फराळाचे साहित्य, बिसलेरी पाण्याच्या बाटल्या पुरवल्या जात होत्या. आज पालखी मार्गावर दोन ठिकाणी माउलींनी विसावा घेतला. पहिला विसावा जेजुरीची हद्द संपताच पहिल्याच वळणावर होता. पालखी मार्गावर बहुतांशी ठिकाणी विसावा स्थळे बांधलेली आहेत परंतु या वळणावर बांधलेले विसावा स्थळ नसून तात्पुरता मंडप उभारला होता. याठिकाणी छोट्या छोट्या टेकड्या असून या टेकड्यावर बसून वारकऱ्यांनी फराळाचा आनंद लुटला. येथे कोणतेही गाव नसल्याने वारकऱ्यांशिवाय अन्य कोणीही नव्हते. हा रस्ता घाट रस्ताच होता असे वाटते. या मार्गावर रस्ता व रेल्वे मार्ग अगदी समांतर असल्याने दृश्य खूप विलोभनीय वाटत होते.






            दुसरा विसावा दौंडज याठिकाणी होता. जेथे विसावा असतो त्या स्थळाला, गावाला यात्रेचे स्वरुप प्राप्त झालेले असते. आज दुपारीच माऊलींची पालखी वाल्हे गावात आलेली आहे. आज येथेच माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. येथील पालखी तळ रेल्वे लाईनच्या पलीकडे असून अतिशय भव्य दिव्य आहे. ज्या गावात माऊली विसावल्या आहेत त्या गावाविषयी थोडीसी माहिती सांगितली पाहिजे.

 बघूया वाल्हे गाव कसं हाय ते ....

              पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून या गावाची ओळख. आद्य कवी रामयणकार महर्षी वाल्मिकी ऋषी पासून ते अगदी शिवकालीन काळापर्यंत तसेच स्वातंत्र्य लढ्यातदेखील येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यादिवशी एका रात्रीत या गावात विजय स्तंभ उभारल्याचा उल्लेख आहे.

             वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याबद्दल माहिती घेतलीच पाहिजे. त्याच्या याबदलात त्याच्या पत्नीचा सिंहाचा वाटा आहे. नेमकं परिवर्तन कसं झाले ते पाहूया. रामायण, म्हटले की आम्हा भारतीयांचा ऊर केवढा भरुन येतो. रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात. 'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'! 'पती असावा तर मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !', भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा !', 'पत्नी असावी तर सीतेसारखी !', खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे, 'बायको असावी तर वाल्याकोळ्याच्या बायकोसारखी !', कारण तीच खरी रामायणकर्त्याची ' कर्ती ' आहे, हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले.

                रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो. वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा. एकदा नारदमुनींनाच वाल्याने अडवले. तेव्हा नारदमुनींनी त्याचे तिथल्या तिथे बौधिक घेतले. 'अरे मूर्खा हे पापकर्म कशासाठी करतोस' असे विचारल्यावर, 'माझ्या बायकोपोरांसाठी', असं सांगितल्यावर, नारदमुनी त्याला म्हणतात, 'जा तुझ्या बायकोला विचारुन ये, ते तुझ्या पापात सहभागी आहेत काय ?. 'तू इथेच थांब, मी विचारुन येतो' म्हणत वाल्या पळतच घरी येतो. दारावर धाडकन् लाथ मारुन घरात घुसतो. बायकोमुलं घाबरतात. वाल्या बायकोला धमकाऊन विचारतो. 'बोल तू माझ्या पापात सहभागी आहेस की नाही ? आता असा विचार करा, शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, दरोडेखोर नवरा असा संतापल्यावर, एक अशिक्षीत, अडाणी, परावलंबी स्री दुसरं काय उत्तर देणार !! पण नाही. त्या तडफदार आदिमायाशक्तीने, क्षणाचाही विचार न करता, 'नाही, मी तुमच्या पापात सहभागी नाही!', असे सडेतोडपणे सांगितले आणि तोच वाल्याकोळ्याच्या जडणघडणीतला 'टर्नींग पाॅईंट' ठरला.

               गरीबबापड्या बायकोच्या अनपेक्षीत तडफदार उत्तराने वाल्याकोळ्याचे डोळे खाडकन् उघडतात. तो नारदमुनीची क्षमायाचना करतो. नारदमुनी त्याला दिक्षा देतात. तो तप करतो आणि दरोडेखोर वाल्याकोळ्याचा 'वाल्मिकीऋषी' होऊन 'रामायण' हे महाकाव्य रचतो. ही सरळसाधी गोष्ट आपण वाचून सहज सोडून देतो. पण, एक साधी शंका कुणाच्याही मनात का येत नाही! की समजा, वाल्याकोळ्याच्या बायकोने, 'व्हय.. आम्ही आहोतच की तुमच्यासंगं !', असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर ! नारदाचं काही खरं नव्हतंच पण वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन त्याने रामायण तरी कसे काय रचले असते? अशी रास्त शंका घेता येऊ शकते. 

    वाल्हे गावात महर्षी वाल्मिकीचे मंदिर आहे. याच गावात महर्षी वाल्मिकी या नावाने हायस्कूल आहे. सध्या रामायण मालिका दूरदर्शनवर चालू आहे तीही आपण पहावी. नितीमार्गाने कसे जगावे हे रामचरित्र सांगते. वाल्या कोळ्याची बायको आणि सध्याच्या स्त्रिया यांची तुलना केली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया वाल्या कोळ्याच्या बायको सारख्या वागत नाहीत . जर त्या वाल्या कोळ्याच्या बायकोप्रमाणे वागल्या तर समाजातील अनेक भ्रष्टाचारासारख्या बाबी कमी होतील. नीतिमान तसेच भ्रष्टाचारमुक्त भारत निर्माण करण्यासाठी वाल्या कोळ्याच्या बायकोचा आदर्श घ्यावा. जे पतीचे अयोग्य वाटत असेल त्यासाठी स्पष्टपणे नकार द्यायला शिकले पाहिजे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

रविवार, २६ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सहावा २६ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस सहावा २६ जून )

           आज सकाळी ७ वाजता सासवडहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान झाले. सासवड शहरातून पालखी मिरवणुकीने मुख्य मार्गावर आली. रथ मुख्य रस्त्यावरच उभा होता. सासवड नगरवासीयांनी दुतर्फा उभे राहून माऊलींचे स्वागत केले जात होते. समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून खाऊची पाकिटे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप केले जात होते. सासवड शहरात हिंदवी स्वराज्याचे पहिले सर सेनापती वीर बाजी पासलकर यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी १६४९ मध्ये समाधी बांधली आहे. सासवडमध्ये शिवसृष्टीही आकाराला आली आहे. ती आम्हाला पाहण्याचा योग आला नाही.








               आज पहिला विसावा बोरावके मळा तर दुपारनंतरचा विसावा साकुर्डे या गावी होता. दुपारची विश्रांती यमाईची शिवरी या ठिकाणी होता. नेहमीप्रमाणे गायकवाड यांच्या घरी विश्रांतीची व्यवस्था झालेली होतीच. मात्र दुपारच्या भोजनाची व्यवस्था पुरंदर तालुक्यातील वीर येथील संजय धुमाळ यांनी केली होती. आज बराच काळ ढगाळ वातावरण होते. आम्ही सर्वजण पावसाच्या प्रतीक्षेत होतो. पावसाने फक्त पालखी मार्गावर जलाभिषेक केला. प्रत्येकाला पावसाची खूप ओढ लागली आहे.

            पालखी मार्गावर विविध समाजसेवी संस्था जनतेचे प्रबोधन करत असतात. आज दोन वेगवेगळ्या बाबी प्रकर्षाने जाणवल्या. दोन्हीही खूपच हृदयस्पर्शी होत्या. काही युवक व्यसनमुक्तीसाठी काही कार्यक्रम सादर करत होते. खर तर व्यसनापासून प्रत्येकाने दूर राहायला हवे. व्यसनामुळे घराची राखरांगोळी होते. आपण सर्वजणच व्यसनापासून दूर राहूया.

           आमचा आजचा मुक्काम श्री क्षेत्र जेजुरी येथे आहे. आमच्या निवासाची शाही व्यवस्था बाळासाहेब जगताप यांनी केली आहे. जेजुरी येथे खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ते संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे.    

            उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला अहिल्याबाई होळकर यांनी नव्याने देऊळ बांधले. तेही आता तीन शतकांपूर्वीचे म्हणजे सन १७१२ सालचे हे देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे २००पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत.  दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

              जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून सन १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम सन १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. सन १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम सन १७७० मध्ये पूर्ण झाले. 

               निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

             आज जेजुरी नगरीत भंडाऱ्याची उधळण करत ग्रामवासीयांनी ज्ञानेश्वर माऊलींचे उत्साहात स्वागत केले. "सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. यावर्षी जेजुरी येथे नव्याने पालखी तळ विकसित केला आहे. प्रसिध्द उद्योजक बाळासाहेब भानगीरे यांनी ९ एकर जमीन पालखी तळाशी दिल्यामुळे गैरसोय कायमची दूर झाली आहे.

              आज सकाळी खळद गावाजवळ लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मुलगी वाचवा, देश वाचवा, स्त्री भ्रूण हत्या थांबवा,महिलांना सन्मानाने वागवा. तिला स्थावर, जंगम मालमत्तेत मालक करा अशा विषयाचे प्रबोधन करणारे ड्रेस परिधान केले होते.

 आपणही आपल्या कुटूंबातील, समाजातील  स्त्रियांना सन्मानाची वागणूक देऊया.स्त्री-पुरुष समानता  खऱ्याअर्थाने अंमलात आणूया.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

शनिवार, २५ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पाचवा २५ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पाचवा २५ जून )

          आज सासवडमध्ये माऊलीचा विश्रांतीचा दिवस ,माऊलीच्या आगमनानंतर प्रस्थान होईपर्यंतच्या कालावधीत भागातील भाविकभक्त  ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी साधारण अर्धा किलोमीटरची रांग होती. संपूर्ण सासवड नगरीस यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.  

                                      








                देवदर्शनाबरोबर संसारपयोगी वस्तू भाविक खरेदी करताना दिसत होते. सासवड हे सोपानकाकांचे समाधी स्थान, या समाधी स्थळाला भाविकांची भेट ठरलेली असते. आमचा तरी  त्याला कसा अपवाद असेल. कऱ्हेच्या काठवरचे हे समाधी स्थळ भाविकांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्रोत आहे. आजच ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ज्ञानेश्वर माऊली व सोपानदेव या दोन पालख्यांची भेट  भंडीशेगावजवळ होते.या बंधुभेटीचा सोहळा विलोभनीय असतो.

           या समाधी स्थळाजवळ अनेक भाविक वाद्यांच्या तालावर फुगड्या तसेच नृत्य करताना दिसत होते.आज आम्ही सासवडमधील आमच्या स्नेही मंडळींच्या भेटी घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. सासवडला येण्यासाठी मोठी दमझाक झालेली असते त्यामुळेच या नगरीत बरेच मेडिकल  कॅम्प दिसून येत होते. प्रत्येक कॅम्पमध्ये आजारी असणारे वारकरी वैद्यकीय सुविधा घेताना दिसत होते. मला तर त्या वैद्य,परिचारिका आणि सपोर्टवीह  स्टाफमध्ये पांडुरंगाचे रुप दिसत होते. खऱ्याअर्थाने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा होय असे वाटते.

            आपणही जनसेवा करावी. असे म्हटले जाते "Service to man is to service to God".चला तर आपणास शक्य होईल तेवढी जनसेवा करुया.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

शुक्रवार, २४ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस चौथा २४ जून )

           आज सकाळी ६ वाजता ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून प्रस्थान झाले. आम्ही प्रस्थानापूर्वी तेथे हजर होतो. आम्ही लगेचच दिंडीत सहभागी झालो. कालच्या नियोजनाप्रमाणे पुलगेटजवळ शपथ घेण्याचा कार्यक्रम संतांच्या साक्षीने झाला.थोड्याच वेळात पालखी वानवडी जवळ आली. त्याठिकाणी परंपरागत आरती झाली. वारीत सर्वत्र टाळ मृदंगाचा गजर चालू असतो परंतु फक्त चोपदाराने दंड उंचावताच सर्वत्र शांतता प्रस्थापित होते. लाखोंचा जनसमुदाय एका क्षणात एकदम शांत होताना पाहिला. आज हडपसर, उरळी देवाची व झेंडेवाडी येथे छोटे विसावे होते. वडकीनाला याठिकाणी मोठा विसावा होता. वडकी नाल्यापासून दिवे घाट सुरु होतो. घाटात वारकऱ्यांची कसरत पाहायला मिळत होती. थोडासा ऊन सावलीचा खेळ चालू होता. 








             सगळे वारकरी पावसाची प्रतीक्षा करत होते पण पावसाने हुलकावनीच दिली. फक्त एका सरीने काय तो दिलासा दिला. पालखीच्या पुढे नगाऱ्याची गाडी असते. वारीत प्रत्येक दिंडीत हरिनामाचा गजर चाललेला दिसतो.दुपारनंतर आम्ही थोडं पुढे आल्याने प्रत्येक दिंडीमध्ये चालणाऱ्या भजनाचा आनंद लुटला. घाट चढून आल्यानंतर लगेचच फिजोथेरपीचे केंद्र होते. तेथे मसाजची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. या सुविधेचा लाभ आम्ही घेतला. आजचा टप्पा ३५ किलोमीटरचा त्यातच अवघड घाट असल्याने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता याला फक्त तरुणांचा अपवाद असेल. पुरंदर तालुक्याच्या प्रवेशद्वारावर पांडुरंगाची मोठी मूर्ती असून ती लक्षवेधक होती. पुरंदर तालुक्याच्यावतीने सर्व वारकऱ्यांचे स्वागत केले जात होते. स्वागताचा मान विणेकऱ्याला दिला जातो.

            आज एकादशी असल्याने सर्वत्र फराळाचे वाटप केले जात होते. आज आम्हाला सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत असणारे ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून फराळ मिळाला आणि याचवेळी मांजरी स्टड फार्ममध्ये कार्यरत असणारे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.दत्तात्रय भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.

            वारीच्या मार्गावर जसे फराळाचे वाटप होते अगदी त्याचप्रमाणे ठिक ठिकाणी वैद्यकीय सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जात होती. मीही या सुविधेचा लाभ घेतला. आजचा आमचा मुक्काम सासवडनगरीत आहे. आज घाटात सर्वत्र वेगवेगळ्या वाहिन्या वारीचे चित्रीकरण केले जात होते. थोडक्यात काय तर खाजगी संस्था असो किंवा शासकीय या यंत्रणांच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाता येते. मी म्हणेन वारी ही आपणास समाजसेवेची संधी देते. आपणास देखील अशा संधी आल्या तर त्या संधीचे सोने करायला हवे. आपलं कामसुध्दा  वारीच्या माध्यमातून समाजापुढे नेण्याची संधी मिळते असे मला वाटते.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

गुरुवार, २३ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तिसरा २३ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस तिसरा २३ जून )

           आळंदी ते पुणे  हा टप्पा मोठा असल्याने आज विश्रांतीचा दिवस आहे. मोठा टप्पा असलाकी किमान एखादा दिवस विश्रांती असते. कालचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १६ तासाचा कालावधी गेला. वारीत अनेक सकारात्मक गोष्टी घडत असतात. ज्या गोष्टी समाजापर्यंत नेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात ते येथे सहज होतात, एकाचवेळी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाता येते. उदाहरण द्यायचे झाले तर आरोग्यवारीचे देता येईल. 'वारी विठुरायाची आणि आरोग्य संगोपनाची'या संकल्पनेतून ' सकाळ माध्यम समूह' आणि फिनॉलेक्स केबल यांच्यातर्फे 'साथ चल' हा उपक्रम उद्या पूलगेट पुणे येथे राबवला जाणार आहे. त्यासाठी सकाळी साडेसहा वाजता हा उपक्रम राबविणार आहे.



     ती शपथ आपल्या माहितीसाठी....

              मी संतांच्या साक्षीने शपथ घेतोकी, माझ्यासह माझ्या कुटूंबाचे, शहराचे आणि देशाचे आरोग्य सुदृढ ठेवणे, घर, आंगण व परिसर स्वच्छ ठेवणे, हे माझे नित्यकर्तव्य आहे.त्याला अनुसरुन सदैव माझी कृती राहील. सकल प्राणिमात्रांचे आरोग्य उत्तम राहील, अशी मी ग्वाही देतो. वारीच्या निमित्ताने समाज व देशाची सेवा माझ्या हातून घडो, हीच विठुरायाची चरणी प्रार्थना! पुंडलिक वरदे... हरी विठ्ठल... श्री ज्ञानदेव,तुकाराम...

             वारीमध्ये बऱ्याचवेळा शक्तिप्रदर्शनही झालेले दिसून येते. संगमवाडी पुलानजिक संभाजी भिडे यांचे धारकरी मोठया संख्येने उपस्थित होते. याचबरोबर काही वारकरी आपल्या लहान मुलांना तसेच वयोवृद्ध पालकांना घेऊन वारीत चालत होते. 

            आम्ही रथापुढे असणाऱ्या तीन नंबरच्या दिंडीत चालत आहोत. आमच्या बरोबर पुणेस्थित गोरख चव्हाण,  सौ. इंदुमती चव्हाण, प्रकाश सरोदे, कवठे वाईतील दिलीप चव्हाण, जुन्नर येथील रंगनाथ हांडे, पाडळी येथील विजय ढाणे, मुळचे करंजखोप येथील असणारे व सध्या  मुंबईतील व्यावसायिक मधुकर मुसळे, डोंबिवली येथील मनोहर अमृतकर आदि आहेत.

             एखादी गोष्ट समाजात मोठ्या प्रमाणात न्यायची असेल तर वारी हे उत्तम माध्यम आहे. आपणही चांगला संदेश समाजात नेण्यासाठी वारीसारख्या माध्यमाचा उपयोग केला पाहिजे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

बुधवार, २२ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दुसरा २२ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस दुसरा २२ जून )

           संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आज सकाळी ६ वाजता आळंदी येथील आजोळघराहून प्रस्थान झाले. अतिशय उत्साहाने माऊलीना पंढरीकडे जाण्यास निरोप देण्यात आला. दिंडीमध्ये मंगलाचरण, भूपाळ्या, वासुदेव, आंधळे-पांगळे, जोगी, मुका, बहिरा,नाट, गौळणी अतिशय तालासुरात म्हटल्या जात होत्या.

 एक गौळण आपल्या माहितीसाठी...

 " वृंदावनी आनंदु रे। विठ्ठल देवो आळविती रे !!१ !!

गोपाळ रतले रे। विठ्ठल देवो आळवितो रे !!२ !!

निवृत्तीदासा प्रियो रे । विठ्ठल देवो आळवितो रे !!३ !! 





             सर्वत्र ज्ञानबा- तुकारामांचा गजर ऐकू येत होता. आज पहिला विसावा थोरल्या पादुका चऱ्होली (आळंदी ) येथे होता. पालखी मार्गावर विविध पक्ष, संघटना,समाजसेवी संस्थांच्यावतीने माऊलींचे स्वागत केले जात होते, पादुकांच्या रथावर अगदी क्रेनच्या साह्याने पुष्पहार व पुष्पवृष्टी करण्यात येत होती. त्याचबरोबर या संस्था, संघटनांच्या माध्यमातून वारकऱ्यांना खाऊ तसेच पाण्याचे वाटप केले जात होते इतकेच नव्हे तर दक्षिणाही दिली जात होती. आज पालखीचा मुक्काम भवानी पेठेतील विठोबा मंदिरात आहे. आज जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या दोन्हीही संतांच्या पालख्यामुळे शहराला यात्रेचे स्वरुप आले होते. भाविकही ज्ञानबा,तुकारामांचा गजर करत होते, तालासुरावर नाचत होते, फुगड्यांचा फेर धरत होते.

           पालखी मार्गावर लोक आपआपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करत असतात.आपणास प्रत्यक्ष पंढरपूरला जाता आले नाही तरी लोक वारकऱ्यांमध्ये पांडुरंगाचे, रुक्मिणीचे रुप पाहत असतात. आपल्याला एखादी गोष्ट  प्रत्यक्ष करता आली नाही तरी सेवेच्या माध्यमातून परमेश्वराजवळ पोहचता येते अशीच जनतेची श्रध्दा असते.

             आपणास प्रत्यक्ष एखादी कृती शक्य नसेल  तरी जे करत आहेत त्यांना सहकार्य करावे हाच संदेश आम्हाला आज मिळाला. आपणही" सेवाधर्म पुण्य आहे, सांग सख्या श्रीहरी देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी", प्रत्यक्ष देव भक्तांची सेवा करतो असे वाचले आहे. समाजात चांगले काम करणाऱ्या प्रत्येकात देवाचे स्वरुप पाहावे. कोरोनाच्या काळात आपण डॉक्टर, परिचारिका, पोलीस, आशा वर्कर, प्रशासनातील अधिकारी यांच्यामध्ये पांडुरंगाचे,रुक्मिणीचे रुप पाहिले होते. जर असे असेल तर वारीच्या मार्गावर चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करायला हवी , इतकेच नव्हे तर समाजात जे समाजहिताचे काम करतात त्या सगळ्यांनाच मदत करायला पाहिजे असे वाटते.

        राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

मंगळवार, २१ जून, २०२२

!! वारी पंढरीची २०२२ !! (दिवस पहिला २१ जून )

 !! वारी पंढरीची २०२२ !!  (दिवस पहिला २१ जून  )

           आज ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचा प्रस्थानाचा दिवस. संध्याकाळी ४ वाजता विधीवत पूजा होऊन पालखीचे प्रस्थान होते. प्रस्थान होताना मंदिराचा कळस हलतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. सर्वत्र माऊली माऊली असा गजर ऐकायला मिळत होता. प्रत्येक दिंडी माऊलीच्या मंदिरात जाते. तेथून मार्गक्रमण करत, हरिनामाचा जयघोष करत दिंड्या पुढे पुढे जात होत्या. पालखी मार्गावर सर्वत्र फुगड्या खेळताना, भजन करताना वारकरी  दिसत होते. इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर भाविकांची खचाखच गर्दी जाणवत होती.





          आज संध्याकाळी पालखी आजोळघरी (गांधीवाडा ) येथे मुक्कामास असते. मार्गावर सर्वत्र रांगोळ्या काढलेल्या दिसत होत्या.कोरोनामुळे दोन वर्षे पालखी सोहळा न झाल्याने सर्वत्र प्रचंड गर्दी दिसत होती. भविकांच्यात प्रचंड उत्साह जाणवत होता. भक्ती मार्गाची ताकद खूप मोठी असते. पालखी सोहळ्यात स्वयंशिस्त असते. आपण जर स्वयंशिस्त पाळली तर आपणा बरोबर समाजाचेही भले होत असते. समाज अधिक प्रगतीपथावर जाण्यासाठी आपण स्वयंशिस्त पाळूया.

       राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

शुक्रवार, १७ जून, २०२२

वर्णे गावात विधवांना सन्मानाने वागवण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर..…

 वर्णे गावात विधवांना सन्मानाने वागवण्याचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर..…

             अनिष्ट विधवा प्रथांना कायमची मूठमाती देण्याचा ठराव सातारा तालुक्यातील वर्णे  येथे आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. समाजात अनेक अनिष्ट प्रथा आजही प्रचलित आहेत. हेरवाड ग्रामपंचायतीने महाराष्ट्रात पुरोगामी पाऊल उचलले आणि संपूर्ण राज्याला वेगळा आदर्श दिला. सध्या या विचाराला शासकीय आदेशाचे पाठबळ मिळाले आहे. परिवर्तनासाठी नुसता शासकीय आदेश पुरेसा नसतो त्यासाठी मानसिक परिवर्तनाची लढाई लढावी लागते. आपण ठराव मंजूर केला त्याबद्दल मी ग्रामपंचायतीला धन्यवाद देते परंतु येथून पुढे प्रत्येक विधवेची कोठेही अडवणूक होणार नाही याची काळजी ग्रामस्थांनी घ्यायला हवी असे प्रतिपादन लेक लाडकी अभियानच्या प्रवर्तक वर्षा देशपांडे यांनी वर्णे येथे केले. त्या पुढे म्हणाल्याकी येथून पुढे स्थावर व जंगम मालमत्तेत स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न करायला हवा. बऱ्याचदा हक्कसोड पत्रासाठी  माहेरची मंडळी आग्रही असतात पण हे काही योग्य नाही. स्त्रीला तिचा अधिकार मिळू द्या, नंतर  ती बक्षीसपत्राने मालमत्ता आपणास देईल परंतु तिचा अधिकार हिरावून घेऊ नका तिला समाजात सन्मान द्या असे आवाहनही त्यांनी केले.

        ऍड. शैला जाधव यांनी स्त्रियांसाठी असणाऱ्या प्रचलित  कायद्याचा उहापोह केला. त्याचबरोबर महिलांना काही अडचणी असतील तर त्यांना मदत करण्याचे अभिवचनही दिले. ऍड. रुपाली काकडे यांनी या अनिष्ट  प्रथेविरुध्द २००८ पासूनची लढाई कशी सुरु आहे त्याचे विवेचन केले.विधवांना सन्मानजनक वागणूक मिळावी यासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निवेदन दिले होते त्याचप्रमाणे त्यांच्या सावित्री विचारमंचच्या माध्यमातून विधवांना सन्मान देणारे अनेक कार्यक्रम  नवी मुंबईत घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.








           वर्णे गावच्या मूळ रहिवासी सातारा येथील महिला उद्योजिका सौ. श्रध्दा पवार यांनी महिलांसाठी सातारा आणि सातारा परिसरासाठी करत असलेल्या कार्याचा उल्लेख केला. समाजात चांगल्या गोष्टी रुजण्यासाठी खूप वेळ लागतो .कामाप्रति आपली श्रध्दा असेल तर त्या गोष्टी समाजात रुजतात. समाजात सुधारणा करत असताना वेळ जातच असतो पण अंतिमतः समाज चांगल्या बाबी स्वीकारतो हे स्वानुभवातून त्यांनी सांगितले.

           सातारा पंचायत समितीच्या बचत गटाच्या समन्वयक सीमंतिनी सगरे यांनी वैवाहिक स्त्रीची प्रतीके आणि समाजातील स्त्रियांचे स्थान यांचे ओघवत्या शैलीत वर्णन केले. शाहीर कैलास जाधव यांनी स्त्री ही वडील, पती व मुलाच्या अधिपत्याखाली सतत वावरत असते. परिणामी तिला सगळीकडे दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असते यामध्ये बदल झाला पाहिजे हे गीतातून स्पष्ट केले.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या उपसरपंच सौ. अनिता यादव होत्या. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय, सावित्रीबाई फुले,जिजामाता, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व दीप प्रज्वलाने झाली.आम्ही विधवा प्रथांना कायमची मूठमाती देणार अशी शपथ याप्रसंगी दिपाली पंडित व ग्रामपंचायत सदस्या सौ. आशा पवार यांनी दिली. पती निधनानंतर आम्ही  स्त्रीच्या बांगड्या फोडणार नाही, जोडवी काढणार नाही, कुंकू पुसणार नाही, मंगळसूत्र काढणार नाही,संबंधित स्त्रियांना कार्यक्रमात सहभागी करुन घेऊ, सन्मानाची वागणूक दिली जाईल अशी शपथ याप्रसंगी दिली.

           कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्र संचालन दिपाली पंडित यांनी केले तर आभार  मेघा पांढरपट्टे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या सर्वश्री आशा पवार, सौ. नंदाताई पवार, कुसुम पवार, अनिता यादव, सुषमा काळंगे ,सौ. सुनिता सुतार तसेच गावचे सरपंच विजयकुमार पवार, अक्षय धस्के, रजत भस्मे, किशोर काळंगे,रमेश पवार  आणि ग्रामसेवक सत्यवान वाघमारे यांनी परिश्रम घेतले त्यांना पंचायत समितीचे माजी सदस्य प्रविण धस्के, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र पवार, सोसायटीचे माजी चेअरमन हणमंतराव पवार,  सुनिलशेठ काकडे ,माजी सरपंच धैर्यशील पवार ,दादासाहेब काळंगे,पां.प. पवार,रामचंद्र पवार,सूर्यकांत पवार,विनोद पवार, श्रीमंत काळंगे ,योगेश पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमात विधवा महिलांच्या सुवासिनीप्रमाणे  ओठ्या भरण्यात आल्या. हा क्षण अतिशय भावूक होता. यावेळी आम्हाला येथून पुढे सन्मानाची वागणूक दिली जावी अशी भावना सुमन धस्के, अश्विनी काळंगे या महिलांनी व्यक्त केली. भावना व्यक्त करताना अश्रूंचा बांध फुटला होता. हा प्रसंग बघून सर्वजणच हेलावून गेले. यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. कार्यक्रमास पुरुष ग्रामस्थही बहुसंख्येने उपस्थित होते. सातारा तालुक्यात परिवर्तनाची वाट चोखळणारी वर्णेची ग्रामपंचायत पहिली ठरली असल्याने ,ग्रामपंचायतीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

        राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...