!! धनत्रयोदशी !! (१३ नोव्हेंबर )
धनत्रयोदशी : हा दिवाळीचा पहिला दिवस. दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशीला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.
धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व :
धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. म्हणूनच अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे…
कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वारही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अशा प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचतात म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.
या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो असा समज आहे.
धनत्रयोदशी बद्दल अजून एक दंतकथा आहे. ती म्हणजे ‘समुद्र मंथन’. जेव्हा असुरांबरोबर इंद्रदेवांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारनास समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पुजा केली जाते. या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.
ज्या धनामुळे आपल्या जीवनाचे पोषण सुरळीत चालू आहे, त्या धनाची या दिवशी पूजा करतात. येथे `धन’ म्हणजे शुद्ध लक्ष्मी. श्रीसूक्तात वसू, जल, वायू, अग्नि, सूर्य, यांना धनचं म्हटले आहे. ज्या धनाला खरा अर्थ आहे, तीच खरी लक्ष्मी ! अन्यथा अलक्ष्मीमुळे (पैशामुळे) अनर्थ घडतो.
तसेच या दिवशी लोकं सोने देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. या दिवशी सोने खरेदी केल्याने आर्थिक उन्नती होते असा समज आहे. जर कुणी सोने खरेदी नाही करू शकले तर ते कुठलीही एखादी वस्तू या दिवशी खरेदी करतात.आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८१७८