!!आमची नर्मदा परिक्रमा !! (४४ ) सुंदरकांड
आमचा कालचा मुक्काम बडवाण्या गावात होता. त्या आश्रमात सुंदरकांड चालू होते.सुंदरकांड हे रामचरीतमानस मधील एक भाग आहे. तुलसीदास यांनी लिहिलेल्या रामायणातील विविध कांडापैकी हे एक कांड आहे. उदा. बालकांड, अयोध्याकांड, किष्किंधाकांड, अरण्यकांड, सुंदरकांड, लंकाकांड, उत्तरकांड इत्यादी.
सुंदरकांड बाबत माहिती ...
सुंदरकांडामध्ये सीता शुद्धीकरणासाठी वानरसेनेतील वीरांना आवाहन केलेले आहे. परंतु आपापल्या शक्तीवर व देण्यात आलेल्या कामावर तुलनात्मकदृष्ट्या विचार करून प्रत्येक वीर आपल्या स्वतःच्या शक्तीची उणीव दाखवतात. अशा वेळी हनुमानजी एकांतात वेगळ्या ठिकाणी बसलेले असताना त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देण्यात येते. त्यानंतर त्यांची शापित शक्ती जागृत होऊन महाकायरुप धारण करून प्रचंड गर्जना करतात. त्यांच्यावर ते काम सोपवले जाते. अशाच प्रकारे सर्व वानरांना तुकडी तुकडीने विविध दिशेला पाठवण्यात येते. मात्र हनुमानजी दक्षिण दिशेकडे असलेल्या समुद्रापलीकडील लंकेच्या दिशेने झेपावतात. लंकेत प्रवेश करण्यासाठी अनंत अडचणी येतात. त्या सर्वांवर मात करून हनुमान सीतेला भेटतात. याकामी फक्त बिभीषणाचे सहकार्य होते. सीतेला भेटून हनुमानजी परत रामाकडे येतात. सर्व हकीकत प्रभू रामचंद्रांना सांगितली जाते. अशा प्रकारचा भाग सुंदरकांडात आहे. सर्व माहिती खूपच मोठी आहे. फक्त लंकेतील स्थिती येथे वर्णन केलेली आहे.
आज सकाळी लवकरच चालण्यास सुरुवात केली.पडियाल गावात आम्ही बालभोग घेतला. पडियालपासून परिक्रमेचे अनेक मार्ग आहेत. आम्ही भवरियामार्गे आलो. भवरीया गावात चौकात फळ विकण्यासाठी एक महिला बसली होती.त्या महिलेने आम्हा प्रत्येकाला एक एक पपई भेट दिली. तिची परिस्थिती फार चांगली होती असे नाही पण मनाने खूपच श्रीमंत होती. भवरीया गावात शिव मंदिराचे बांधकाम चालू होते. शेजारीच अनेक देवतांच्या मूर्ती होत्या.
आम्ही दुपारी कोटेश्वर महादेव (कनक बिहारीजी आश्रम )येथे गेलो. आश्रम खूपच मोठा होता. या आश्रमात अखंड रामधुन चालू असते.तेथे दुपारचा भोजन प्रसाद घेतला. याठिकाणी भोजन प्रसाद घेतल्यानंतर आपण जेवण केलेली जागा पाणी लावून स्वच्छ करण्याची पध्दत आहे. आम्ही आमची जागा स्वच्छ केली. याठिकाणी पाण्याची चांगली सुविधा असल्याने कपडे धुण्याचाही आनंद लुटला. येथे मोठी गोशाळादेखील आहे. वाटेतच शनीदेवाचे मोठे मंदिर आहे. आम्ही निसरपूरहून पिपल्या गावाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्याच गावचे जगदीशभाई पाटीदार, राजेशभाई, महादेव मास्टर, शांतीलाल राजाजी ही मंडळी ४ किलोमीटर अगोदरच भेटली. त्यांनी आपल्या गावात थांबण्याचा आग्रह केला.आम्ही त्यांच्या विनंती नुसार पिपल्या गावात मुक्कामासाठी थांबलो. त्यांनी आम्हास जेवणाची मेजवानीच दिली. एखाद्या विवाह समारंभात असावे असे जेवण दिले. त्यांचे टीमवर्क खूपच छान होते. कोणत्याही कामात टीमवर्क असेल तर ते काम शतप्रतिशत यशस्वी होते.
कोणतेही काम यशस्वी व्हायचे असेल तर टीमवर्क महत्वाचे आहे. आपणही संघशक्तीचा उपयोग करुन मोठी मोठी कामे पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करावा असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा