!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१२ ) सेवाभाव....
आमचा कालचा मुक्काम बडवानी जिल्ह्यातील अंजड तालुक्यातील दत्तवाडा येथे होता. हा आश्रम नदीकिनारी होता. तो परिसर पूर्वाश्रमीचा स्मशानभूमीचा असावा. नव्याने तो परिसर विकसित होत आहे. नदीकाठी घाट नाही. पूर्वीचे सर्व मार्ग बदलले आहेत. नदीकाठचा बराचसा परिसर पाण्याखाली गेला आहे त्याचा आम्हाला फटका बसला. मुख्य मार्गावर येण्यासाठी सहा किलोमीटरची पायपीट करावी लागली.
दुपारी २ वाजता अंजड बडवानी मार्गावरील तलून या गावी आलो होतो. थोडी विश्रांती हवी होती म्हणून थांबण्याचा निर्णय झाला. त्याचवेळी आपण भोजन केले आहे का असे आम्हास एका तरुणाने विचारले. आम्ही नाही म्हटल्यावर त्यांनी थोड्याच वेळात पार्सल स्वरूपात जेवण उपलब्ध करुन दिले. त्यासाठी संबंधित व्यक्ती ३ किलोमीटर दूर गेली आणि जेवण घेऊन आली. यामधून संबंधित व्यक्तीचा सेवाभाव दिसून येतो. बऱ्याच वेळा आपल्या जवळचे कोणी असेल तरच आपण सेवा करतो परंतु आजचा अनुभव वेगळाच आला.
आज छोटा बडदा, आवली, दही बैडा, पपिलूद, तलून अशी गावे लागली. नदीकाठचा रस्ता चिखलाचा, काटेरी झुडपे असणारा असा होता. आज आम्ही नाखूनवाले बाबांच्या आश्रमात देखील गेलो होतो. प्रत्येक आश्रमात परिक्रमावासीयांची काळजी घेतली जाते.
आजचा मुक्काम मेकलसुता आश्रम बडवानी येथे आहे. आजचा आश्रम शहरातच आहे. प्रत्यक्ष शहर उद्या पाहता येणार आहे. आज सेवेचा वेगळाच अनुभव आला. सेवा करताना निस्वार्थीपणे सेवा करावी हीच शिकवण आज मिळाली. आपणही अतिथींचे निस्वार्थीपणे स्वागत करावे, त्यांची मनापासून सेवा करावी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा