!! गो.नी. दांडेकर जन्मदिन !!
(८ जुलै )
गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर ज्यांना गोनीदा असेही म्हणतात .जन्म :८जुलै १९१६ मृत्यू :१ जून १९९८ हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते.तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.
गो. नी. दांडेकर ह्यांचा जन्म परतवाडा (विदर्भ) येथे झाला. त्यांचे वडील शिक्षक होते. वयाच्या १२ व्या वर्षी गोनीदांनी (गो. नी. दांडेकर यांनी) स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यासाठी पलायन केले. त्यासाठी त्यांनी सातव्या इयत्तेमध्ये शाळा सोडली. त्यानंतर गोनीदा संत गाडगे महाराजांच्या सहवासात आले. इतकेच नाहीत तर त्यानंतर ते गाडगेमहाराजांचा संदेश पोचवण्यासाठी गावोगाव हिंडले. नंतर गोनीदांनी वेदान्ताचा अभ्यास करणे सुरू केले. पुढे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बनले. १९४७ मध्ये गोनीदांनी लेखनकार्यावर जीवितार्थ चालविण्याचा निर्णय घेतला, आणि त्यांनी पुढील आयुष्यात कुमारसाहित्य, ललित गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले.
त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.
१ जून १९९८ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी वीणा देव (डॉ.वीणा विजय देव) ह्या प्रसिद्ध लेखिका आहेत. त्यांची नात मधुरा देव हीसुद्धा ललित लेखन करते आणि दुसरी नात मृणाल देव-कुलकर्णी ही विख्यात अभिनेत्री आहे. गो. नी. दांडेकर हे १९८१ मध्ये अकोला येथे भरलेल्या
मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
!! मिळालेले पुरस्कार !!
१)साहित्य अकादमी पुरस्कार १९७६
२)महाराष्ट्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
३)महाराष्ट्र गौरव पुरस्कार१९९०
४)जिजामाता पुरस्कार -१९९०
५)केंद्र शासन उत्कृष्ट चित्रपट कथा पुरस्कार
!! गो. नी. दांडेकर यांच्यानावाने दिले जाणारे पुरस्कार !!
गो.नी. ऊर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी वयाच्या पंच्याहत्तरीला सुरू केलेला आणि चांगल्या लेखकाला देण्यात येणारा मृण्मयी पुरस्कार, १९९९ पासून दांडेकर कुटुंबीयांतर्फे गोनीदांच्या स्मरणार्थ दिला जातो.
गोनीदांच्या पत्नी नीरा गोपाल दांडेकर यांच्याही स्मरणार्थ, सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल नीरा गोपाल हा पुरस्कारसुद्धा दांडेकर कुटुंबीय देतात. रोख रक्कम रुपये दहा हजार आणि सोबत एक स्मृतिचिन्ह असे या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप आहे. सन २०११ च्या मृण्मयी पुरस्काराच्या मानकरी प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या आहेत, आणि नीरा गोपालचे मानकरी रेल्वे प्लॅटफाॅर्मवरील मुलांना संस्कारित करण्याचे समाजकार्य करणारे श्री. विजय जाधव हे आहेत.
गो.नी.दांडेकर यांना विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा