!! दादा धर्माधिकारी जन्मदिन !!
(१८ जून )
प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत आचार्य दादा धर्माधिकारी जन्म:१८ जून १८९९ मृत्यू: १ डिसेंबर १९८५ यांचा जन्म मध्यप्रदेशातील बेतूल जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचे नागपूरमध्ये शिक्षण चालू असताना महात्मा गांधींनी असहकाराची चळवळ सुरू केली, त्यावेळी म्हणजे इ.स. १९२० साली शिक्षण सोडून धर्माधिकारींनी चळवळीत उडी घेतली, आणि पुढे आयुष्यभर राष्ट्रकार्य केले.
धर्माधिकारी यांनी नागपूरच्या टिळक विद्यालयात शिक्षकाची नोकरी पत्करली. नोकरी दरम्यानदेखील ते स्वातंत्र्यासाठीच्या चळवळीमध्ये भाग घेत राहिले. १९३५मध्ये ते वर्धा येथे राहू लागले. गांधी सेवा संघ या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ता होते. तेथे असताना ते भारतातील प्रमुख राजकीय नेत्यांच्या संपर्कात आले.
भारत छोडो आंदोलनात झालेल्या त्यांच्या अटकेनंतर जेव्हा ते सुटून कारागृहाबाहेर आले, तेव्हा ते मध्य प्रदेशाच्या काउन्सिलवर निवडले गेले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्यांचा सहभाग होता. आपल्या आयुष्यातली अनेक वर्षे दादा धर्माधिकारींनी दलितांच्या आणि महिलांच्या उत्थानासाठी वेचली.
दादा धर्माधिकारी हे वैचारिक क्रांतीच्या पक्षातले होते. त्यांच्या मते समाजामध्ये परिवर्तन आणण्यासाठी लोकांच्या विचारांत परिवर्तन होणे आवश्यक आहे.
कॉलेजची कोणतीही पदवी हाती नसताना दादा धर्माधिकारी यांचा हिंदी, संस्कृत, मराठी, बंगाली गुजराती आणि इंग्रजी ग्रंथाचा चांगला अभ्यास होता. ते चांगले लेखक होते. हिंदी मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर धर्माधिकारी हे दादा धर्माधिकारींचे सुपुत्र होत.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा