बुधवार, २८ एप्रिल, २०२१

दादासाहेब फाळके जन्मदिन !! (३०एप्रिल )

 

!! दादासाहेब फाळके जन्मदिन  !! (३०एप्रिल )



          धुंडिराज गोविंद फाळके ऊर्फ दादासाहेब फाळके जन्म : ३० एप्रिल १८७० त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, मृत्यू : नाशिक, १६ फेब्रुवारी १९४४ हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिली व्यक्ती होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . १९१३ साली त्यांनी निर्माण केलेला राजा हरिश्चंद्र हा मूक चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय. १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपटांची व २६ लघुपटांची निर्मिती केली.
          दादासाहेब फाळके यांचा जन्म नाशिकपासून तीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील प्रसिद्ध संस्कृत तज्ञ होते.१८८५ साली त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथे प्रवेश घेतला. १८९० साली जे. जे. तून उत्तीर्ण झाल्यावर ते कला भवन, बडोदा येथे शिल्पकला, तंत्रज्ञान, रेखाटन, चित्रकला, छायाचित्रणकला इत्यादी गोष्टी शिकले.
            त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्रा येथे झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वतःचा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.
                 छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास कायमचा रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला. तो ३ मे १९१३ या दिवशी मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात प्रेक्षकांना पहिल्यांदा दाखवण्यात आला.
              सरस्वतीबाई या दादासाहेब फाळके यांच्या पत्नी. दादासाहेबांचा पहिला चित्रपट बनवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. चित्रपटाच्या निर्मितीखर्चासाठी सरस्वतीबाईंनी आपले सोन्याचे दागिने विकले. त्या फिल्म डेव्हलपिंग, मिक्सिंग आणि फिल्मवर रसायनांचा उपयोग शिकल्या. त्या फिल्मचे परफोरेटिंग (फिल्मवर दोन्ही कडांना भोके पाडणे), एडिटिंग (फिल्मचे तुकडे जोडणे) करीत. शूटिंगच्या वेळी कॅमेरा असिस्टंट, स्पाॅट बाॅय, सूर्याच्या उन्हासाठी रिफ्लेक्टर धरून उभे राहणे आदी कामे करीत. त्या फिल्म निर्मितीसाठी कामावर ठेवलेल्या लोकांच्या राहण्याची, आरामाची सोय करणे, आणि त्यावरही ६०-७० लोकांचा स्वयंपाक करीत व त्यांचे कपडेही धुवीत.
रात्री सर्व झोपल्यावर सरस्वतीबाई फिल्मच्या कथानकावर ब्रेनस्टाॅर्मिंग (अडचणी दूर करण्यासाठी गटचर्चा करणे) करीत.
          सरस्वतीबाईं फाळके यांना राजा हरिश्चंद्र या पहिल्या चित्रपटासाठी तारामतीची भूमिका करण्यासाठी विचारले होते. पण मग कामांचे काय या विचाराने त्यांनी नकार सांगितला.
सरस्वतीबाईंनी जर मदत केली नसती तर भारतातला पहिला चित्रपट बनणे अशक्यप्राय होते.सरस्वतीबाई फाळके यांच्या नावाचा एक पुरस्कारही आहे.
         चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दादासाहेब फाळके यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार अतिशय प्रतिष्टेचा मानला जातो.
      दादासाहेब फाळके यांनी तयार केलेले काही महत्वाचे चित्रपट
१) राजा हरिश्चंद्र १९१३
२)मोहिनी भस्मासूर१९१३
३)सावित्री सत्यवान १९१४
४)श्रीकृष्ण जन्म १९१८
५)कालिया मर्दन १९१९
६)सेतुबंधन १९३२
७)गंगावतरण १९३७
    संकलक :   राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...