अंगापूर येथे शहीददिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद ग्रंथालयात अंगापूर वंदन,अंगापूर तर्फ तारगाव आणि वर्णे येथील ग्रामपंचायत सदस्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण वर्गासाठी तिन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य, माझ्यासह डॉ.विक्रम कणसे, ओंकार देशमुख,निलम कणसे तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.
आम्हीच करणार आमच्या गावचा विकास हे ब्रीद घेऊन सर्वांनी काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, प्रथम आपणआपले सरकार सेवा केंद्रामधून योजना समजून घेतल्या पाहिजेत. योजना समजून घेतल्यानंतर त्याच्या कार्यवाहीचे टप्पे जाणून घेऊन प्रत्यक्ष कृती करायला हवी. ग्रामपंचायतीला साधारण ७९ विषयावर काम करता येते. समाजाचा विचार केला तर यशप्राप्ती लवकर होते यासाठी आपण कुटुंबनिष्ठ न होता समाजनिष्ठ व्हायला हवे.
प्रत्येक जण काम करत असतो पण माझे काम सर्वोत्तम झाले पाहिजे असाच प्रयत्न करा.प्रत्येक व्यक्तीमध्ये जे चांगले आहे ते इतरांना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होत नाही. गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका खूप महत्वाची आहे. शिक्षकाना अध्यापनाशिवाय अन्य काम असू नये. पूर्वप्राथमिक शिक्षण खूप महत्वाचे असते. वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत बालकाचा ८०% विकास होत असतो म्हणून मातांनी बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे.
शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदरच्या योजना राबवत असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या भूमिकाही स्पष्ट केल्या.दुपारच्या सत्रात ग्रामसेवक रावसाहेब भोकरे यांनीही शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार देशमुख यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले.
चला तर आपण सर्वजण आपल्या गावच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
👍
उत्तर द्याहटवा