मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

!! मदर तेरेसा जन्मदिन !!(२६ ऑगस्ट)

 !! मदर तेरेसा जन्मदिन !!(२६ ऑगस्ट)

जन्म:२६ ऑगस्ट १९१०मृत्यू:५ सप्टेंबर १९९७ 



           २६ ऑगस्ट १९१० रोजी मसेदोनियातील स्कॉप्जे येथे एक साधारण व्यापारी निकोला बोयाजू यांच्या घरी अगनेस गोंझा बोयाजिजू ने जन्म घेतला होता. यानांच पुढे मदर तेरेसा म्हणुन जग ओळखु लागले. गोंझा चा अर्थ अलबेनियन भाषेत ’कळी’ (फुल) असा होतो. त्यांचे वडील निकोला बोयाजू धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व होते, ईसा मसीह यांच्यावर त्यांचा फार विश्वास. त्या ज्यावेळी ८ वर्षांच्या होत्या त्यावेळी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर तिचा सांभाळ तिची आई द्राना बोयाजूंनी केला. त्या एक धर्मपरायण आणि आदर्श गृहीणी होत्या, मदर तेरेसांवर आईच्या संस्कारांचा आणि शिक्षणाचा फार प्रभाव पडला. वडिलांच्या अकाली जाण्याने त्यांच्या घरातील परिस्थीती अत्यंत हालाखीची झाली होती त्यामुळे मदर तेरेसा यांचे लहानपण फार संघर्षमय परिस्थितीतीतुन गेले. मदर तेरेसा लहानपणी आपल्या आई आणि बहिणीबरोबर चर्चमधे जाऊन धार्मिक गीतगायन करीत असत. त्या ज्यावेळी केवळ १२ वर्षांची होत्या तेव्हां एका धार्मिक यात्रेला गेलेल्या असतांना येशुच्या परोपकार आणि समाजसेवेच्या शिकवणीला जगभरात पोहोचविण्याचा त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय त्यांनी घेतला व आपले संपुर्ण जीवन गरिबांच्या सेवेत समर्पित करण्याचा मनोमन निश्चय केला. १९२८ साली ज्यावेळी मदर तेरेसा फक्त १८ वर्षांच्या होत्या तेव्हां त्यांनी "नन" चा समुदाय ’सिस्टर्स ऑफ लोरेटो’ त सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि घर सोडले. पुढे त्या आयरलैंड येथे गेल्या आणि इंग्लिश भाषा शिकल्या कारण ’लोरेटो’ च्या सिस्टर्स इंग्रजी माध्यमातुनच भारतात लहान मुलांना शिकविण्याचे काम करत होत्या. या दरम्यान त्यांनी एका इन्स्टीटयुट मधुन नन होण्याचे ट्रेनिंग पुर्ण केले. नन झाल्यानंतर त्यांचे सिस्टर मेरी तेरेसा असे नामकरण करण्यात आले. पुढे आपले संपुर्ण जीवन गरीब आणि असाहय्य लोकांच्या मदतीकरता त्या व्यतीत करु लागल्या.
           मदर तेरेसा आपल्या इन्स्टीटयुट मधील इतर नन समवेत १९२९ साली भारतातील दार्जिलींग येथे आल्या. या ठिकाणी नन या रूपात त्यांनी पहिल्यांदा धार्मिक प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कलकत्ता येथे शिक्षिका म्हणुन पाठविण्यात आले. कलकत्ता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूल ची स्थापना केली होती. मदर तेरेसा याठिकाणी गरीब आणि असाहय्य मुलांना शिकवीत असत. त्यांचे हिंदी आणि बंगाली या दोन्ही भाषांवर चांगले प्रभुत्व होते. सुरूवातीपासुनच त्या अत्यंत मेहनती होत्या त्यामुळे त्यांनी हे काम देखील अत्यंत प्रामाणिकतेने आणि निष्ठापुर्वक केले, त्या विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या. या दरम्यान त्यांच लक्ष आजुबाजुला पसरलेल्या गरीबी, अनारोग्य, लाचारी, व अज्ञानावर गेलं. ते पाहुन त्या अत्यंत दुःखी झाल्या.  तो काळ होता जेव्हां दुष्काळामुळे कलकत्ता शहरात मोठया संख्येने मृत्यु होत होते व गरिबीमुळे तेथील जनतेची परिस्थिती अत्यंत हालाखीची झाली होती. हे पाहुन मदर तेरेसा यांनी गरीब, असाहाय्य, आजारी आणि गरजुंची सेवा करण्याचा निश्चय केला.
           गरीब आणि गरजुना मदत करण्याच्या हेतुने मदर तेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटल मधुन नर्सिंग चे प्रशिक्षण पुर्ण केले व पुढे १९४८ ला कलकत्ता येथे येऊन त्यांनी स्वतःला गरीब, असाहाय्य आणि वृध्द लोकांच्या सेवेत झोकुन दिले. खुप प्रयत्नांनंतर ७ ऑक्टोबर १९५० ला मदर तेरेसा यांना समाजाच्या हिताकरीता कार्य करणारी "मिशनरी ऑफ चॅरिटी "ही संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळाली. मदर तेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, गरजू, रूग्णं, आणि लाचारांना सहाय्य करणे आणि त्यांच्यात जगण्याची आवड निर्माण करणे हाच होता. या व्यतिरीक्त करूणाहृदयी मदर तेरेसा यांनी ’निर्मल हृदय’ आणि ’निर्मला शिशु भवन’ नावाचे आश्रम सुरू केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांना मदत केली जात असे.
                मदर टेरेसा यांना आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागला. १९८३ साली ज्यावेळी त्या रोमला पॉप जॉन पॉल व्दितीय यांच्या भेटीकरता गेल्या तेंव्हा त्यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पुन्हा १९८९ साली हृदयविकाराचा झटका आला तरी देखील त्यांनी त्यांचे सेवाकार्य सुरूच ठेवले. त्यानंतर मात्र त्यांची प्रकृती ढासळतच गेली, १९९१ ला त्यांना किडनी आणि हृदयाचा त्रास सुरू झाला. १९९७ ला मदर तेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली व ५ सप्टेंबर १९९७ ला कलकत्ता येथे अखेरचा श्वास घेतला. अशा तऱ्हेने या करूणाहृदयी आत्म्याने या जगाचा निरोप घेतला.
मदर तेरेसा यांना मिळालेले पुरस्कार :-
१)पदमश्री (१९६२ )
२)नोबेल शांतता पुरस्कार (१९७९)
३)भारतरत्न (१९८०)
४)मेडल ऑफ फ्रीडम अवॉर्ड (१९८५)  
               मदर तेरेसा यांनी मानव कल्याणाकरता ज्या निस्वार्थ भावनेने कार्य केलं ते खरोखर वाखाणण्याजोगेआहे. सर्वांनीच मदर तेरेसा यांच्याकडुन परोपकार, दया, सेवा, यांची प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. या महान परोपकारी  व्यक्तीला भावपुर्ण आदरांजली…..
        संकलन -- राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

!! जागतिक छायाचित्रण दिन !! (१९ ऑगस्ट)

 


!! जागतिक छायाचित्रण दिन !!

   (१९ ऑगस्ट)


     आज जागतिक छायाचित्र दिन, आज पासून १८१ वर्षा आधी १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. फ्रांसने १८३९ ला या आविष्काराला मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात.

काही वर्षांपूर्वी कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र हातात पडण्यासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागत असे. काळ बदलला आणि छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाइल… टिपलेले छायाचित्र काही सेकंदांत पाहता, हाताळता येऊ लागले… या कलेतली रोचकता मात्र कायम राहिली आहे. फोटो काढण्यासाठीची ‘एक्साइटमेंट’ तशीच आहे. गणेशोत्सव जवळ आला आहे. त्यानिमित्ताने अनेक हौशी फोटोग्राफर आपल्याला पाहायला मिळतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित करण्यासाठी साजरा करतात ज्यांनी आपले अनमोल क्षण छायाचित्राच्या रुपात कैद केले व त्यांना नेहमीसाठी स्मरणात ठेवले.

      प्रकृतीने प्रत्येक प्राण्याला जन्मत: एक कॅमेरा दिला आहे, ज्यामुळे तो प्रत्येक वस्तूच्या छबीला आपल्या डोक्यात अंकित करू शकतो आणि तो कॅमेरा म्हणजे आपले डोळे. तस पाहिलं तर प्रत्येक प्राणी एक फोटोग्राफर आहे. वैज्ञानिक दृष्टीने माणसाने आपले साधन वाढविण्यास सुरुवात केली आणि अनेक आविष्कारा सोबत कृत्रिम लेन्सचा पण अविष्कार झाला. वेळे सोबत समोर चालतांना या लेन्सच्या छायाचित्रांना स्थाई रुपात समोर आणले. याच प्रवासाच्या यशाला आपण ‘फोटोग्राफी डे’च्या रुपात साजरा करतो.

        फोटोग्राफरना कॅमेरा घेताना फार दक्षता घेतली पाहिजे. कारण आपण कोणत्या प्रकारचे काम करतो, आपल्याला फोटो सर्वात मोठा किती साईजमध्ये करावयाला लागतो, आपण कोणत्या ठिकाणी काम करतो त्याचबरोबर आपल्याला अंदाजे झूम किंवा वाईड लेन्सची गरज किती आहे,हे पाहणे गरजेचे आहे. शिवाय कॅमेरामध्ये ऑडीओ, व्हिडीओची सोय आहे काय, फोकसिंग पॉईंट किती आहे व त्यामध्ये कशा स्वरुपात आपण बदल करू शकतो, याबाबत माहिती घेणे आवश्यक आहे. कॅमेरा घेतल्यानंतर त्या कॅमेऱ्याबरोबर आलेले कॅटलॉग महत्त्वपूर्ण ठरतात. फोटोग्राफीची भाषा. 

             कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, त्याचा मेगाफिक्सल किती सिमॉस किंवा सीसीडी (कॅमेराचा सेंसर) त्याचा साईज किती आहे. बॅटरी कोणत्या प्रकारची व किती कपॅसिटीची आहे, त्याचबरोबर झूम किती आहे, हे पाहणे आवश्यक आहे. आणि अशा प्रकारचे कॅमेरे वापरण्यास सोपे असतात.

फोटो काढताना घ्यावयाची काळजी

      कॅमेरा हातात धरला व बटन दाबले की ,फोटो आपोआपच येतो पण त्यासाठी आपण योग्य शटर स्पीड, व्हाईट बॅलन्स, संपूर्ण विषयाचा किंवा त्या वस्तूवरती पडलेली लाईट, त्याचबरोबर फोटोच्या चौकटीमध्ये योग्य पद्धतीने बसवणे व त्याचा फोटो काढावयाचे आहे.त्यामधून तो विषय समजला पाहिजे. फोटोग्राफीची संपूर्ण माहिती एखाद्याला आहे पण त्याला एखादा विषय मांडता आला नाही तर तो चांगला फोटो घेऊ शकत नाही. म्हणजे एखाद्याकडे चांगला कॅमेरा आहे, चांगली लेन्स आहे. पण त्याला फोटो चांगला काढता येतो असे नाही. त्यासाठी फोटोग्राफीची संपूर्ण तांत्रिक माहिती व त्याचबरोबर कल्पनाशक्तीची सर्वात मोठी गरज आहे. (क्रिएशन) चांगल्याप्रकारे विषय मांडता आला पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने चांगल्या फोटोग्राफरचे भरपूर काम पाहिले म्हणजे त्याप्रकारे आपली कल्पनाशक्तीही तयार होते.

 फोटोग्राफर पुढील आव्हाने 

       व्यावसायिक फोटोग्राफरने आपल्या काढलेल्या फोटोंचे फावल्या वेळेत बारकाईने निरीक्षण केले पाहिजे काही फोटोग्राफर चांगले फोटो काढतात पण त्याचे निरीक्षण करत नाहीत. एखादा लग्नाचा अल्बम झाला की, ती फाईल एखाद्या महिन्याच्या तारखेमध्ये सेव्ह केली की, त्याकडे कधीच पाहात नाहीत. कधी कधी काम नसते त्यावेळी जुने फोटो पहायला पाहीजेत. आपल्याला एखादी फ्रेम आवडली की ती वेळीच सेव्ह करावयाची. त्याचबरोबर फोटोग्राफी स्पर्धेमध्ये आपले फोटो पाठवणे गरजेचे आहे. काही फोटोग्राफर असे समजतात की, आपण स्पर्धेत बसणार नाही. पण त्या फोटोची ताकद त्या फोटोग्राफरला नसते. तो स्पर्धेत दिल्यानंतर चांगला विषय किंवा अनेक गोष्टी कळतात. तो फोटो ते सिद्ध करतो. हौशी फोटोग्राफर किंवा व्यावसायिक फोटोग्राफर यांनी कामामध्ये सातत्य व कल्पकता दाखविली तर कोणालाही जागतिक किर्तीच्या फोटोचा मान मिळू शकतो, यात शंका नाही. जे शब्दात लिहिता येत नाही, जे बोलण्यातून व्यक्त होत नाही, ते या छायाचित्रांच्या माध्यमातून न सांगता व्यक्त होत असते, छायाचित्रकार म्हणजे तो जो साधे दिसत असलेले दृश्यही बोलके करतो. आपण माहिती पुस्तिका व कॅमेरा हातात घ्यावा त्याप्रमाणे रोज एक तास त्यासाठी काढला की १५ दिवसामध्ये कॅमेरा संपूर्ण समजतो. अशा या जागतिक छायाचित्रण  दिनी त्या सर्व छायाचित्रकारांना  खूप खूप शुभेच्छा…

    संग्राहक -- राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८















शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२०

स्वातंत्र्य दिन !! (१५ ऑगस्ट )

 


!!स्वातंत्र्य  दिन !! (१५ ऑगस्ट )


          स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट  १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

         भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात योगदान असलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे कृतज्ञतापूर्वक स्मरण या दिवशी केले जाते.

             इ.स. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १९व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजांनी आपल्या सैन्यबळावर ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्य समरानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. २०व्या शतकात महात्मा गांधी ह्यांनी अहिंसेच्या मार्गाने चले जाव आंदोलन केले. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिशांना लक्षात आले की, आपल्याला भारतावर फारकाळ राज्य करता येणार नाही तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकारकांचा जोर वाढत होता. ही गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांनी जून १९४७ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. अखेर दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण त्यावेळी भारताचे पाकिस्तान आणि भारत असे दोन तुकडेही पडले. पाकिस्तानी भागात राहणाऱ्या अनेक पंजाब्यांना व सिंधीना त्यांचे घरदार, पैसा सोडून यावे लागले. अनेक लोक ह्यामध्ये मारलेही गेले. पुढे ह्या विभाजनामुळे काश्मीरचा प्रश्नही पुढे आला.

       भारत २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला. भारताची राज्यघटना तयार करण्यात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा मोलाचा वाटा होता. प्रजासत्ताक भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद होते. रवींद्रनाथ टागोर ह्यांनी लिहिलेले जन गण मन हे भारताचे राष्ट्रगीत तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय ह्यांनी लिहिलेले वन्दे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून ठरवले गेले.

      ७४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यावर कोरोनाचे सावट आहे.  त्याचा परिणाम सर्व देशावर झालेला आहे. आजचा स्वातंत्र्य दिन तर अगदी चारपाच व्यक्तींनी एकत्र येऊन साजरा करावा असे प्रशासनाने आवाहन केले आहे. आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या, तसेच शहीद झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुया, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

      भारत माता की जय ! वंदे मातरम !

  संग्राहक :- राजेंद्र पवार

      ९८५०७८११७८


शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

!! ऑगस्ट क्रांती दिन !! (९ ऑगस्ट )

 


!! ऑगस्ट क्रांती दिन !! (९ ऑगस्ट )
१८५७ नंतरचा सर्वात मोठा स्वातंत्र्यसंग्राम
         देशभरात आज ऑगस्ट क्रांती दिन साजरा होत आहे. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्यासाठी दिलेला शब्द न पाळल्यामुळे या आंदोलनाला सुरुवात झाली होती. ८ ऑगस्ट १९४२रोजी भारताला स्वतंत्र करणार असल्याचे इंग्रजांनी म्हटले होते. मात्र, ऐनवेळी इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे महात्मा गांधींनी देशभर ऑगस्ट क्रांती आंदोलनाची घोषणा केली. या आंदोलनाला 'भारत छोडो' असे नाव देण्यात आले होते. 'करो या मरो' अशी या आंदोलनाची घोषणा होती.  



         ८ ऑगस्ट हा दिवस भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईतील शेवटचा दिवस म्हणून स्मरण केला जातो. महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाला या दिवशी सुरुवात झाली होती. त्यानंतर ९ ऑगस्ट रोजी गांधींसह ज्येष्ठ नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण भारत इंग्रजांविरुद्ध एकवटला होता. देशावासियांच्या या एकजुटीने इंग्रज सरकारला गुडघे टेकायला भाग पाडले. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्यानंतर ९ ऑगस्ट हा दिन क्रांती दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. मुंबईतील ज्या मैदानावर झेंडा फडकावत या आंदोलनाला सुरुवात झाली होती. त्या मैदानाला क्रांती मैदान हे नाव देण्यात आले आहे. भारतीयांना पुकारलेला १८५७ नंतरचा हा सर्वात मोठा स्वातंत्र्य लढा होता.
             दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत केली. त्यावेळी  इंग्रजांनी भारत सोडून जाण्याचे वचन दिले होते. मात्र ऐनवेळी दिलेला शब्द न पाळता इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्यास नकार दिला. त्यामुळे ८ऑगस्ट १९४२ रोजी भारतीय काँग्रेस कमिटीच्या मुंबईतील अधिवेशनात भारत छोडो आंदोलनाचा प्रस्ताव संमत करण्यात आला. त्यानंतर इंग्रजांनी गांधींजींना पुण्यातील आगा खाँ पॅलेसमध्ये कैद करुन ठेवले.  तसेच स्वातंत्र्य चळवळीतील इतर नेत्यांनाही अटक करण्यात आली. त्यावेळी, तरुण कार्यकर्त्या अरुणा असिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानात तिरंगा फडकावत भारत छोडो आंदोलनाचा शंखनाद केला. मात्र गांधीजींनी हेही आंदोलन अहिंसक मार्गानेच करावे असे आवाहन देशवासियांना केले होते. तरीही देशातील अनेक भागात हिंसा आणि तोडफोड करण्यात आली होती. दुसऱ्या महायुद्धामुळे ब्रिटीश सरकार अगोदरच खिळखिळे बनले होते. तर, या आंदोलनामुळे ब्रिटीशांची उरली-सुरली ताकदही लोप पावत गेली. त्यानंतर देशवासियांनी इंग्रजांना हाकलून लावेपर्यंत हे आंदोलन सुरुच ठेवले. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या आंदोलनात आपले बलिदान देणाऱ्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून ऑगस्ट क्रांती दिन साजरा केला जातो.  
संग्राहक -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट

!! चले जाव चळवळ !! (८ ऑगस्ट )
              चले जाव चळवळ  ही ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.



          १९४२ च्या चळवळीने देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप धारण केले. स्वातंत्र्य प्राप्तीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला.अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्या इतकी प्रचंड होती की,त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला "ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.         
संग्राहक -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

गुरुवार, ६ ऑगस्ट, २०२०

! हरित क्रांतीचे डॉ .एम.एस. स्वामीनाथन जन्मदिन !!(७ ऑगस्ट

!! हरित क्रांतीचे डॉ .एम.एस. स्वामीनाथन जन्मदिन !!(७ ऑगस्ट
           डॉ. एम.एस. स्वामिनाथन जन्म : ७ ऑगस्ट १९२५  हे भारतातील कृषी शास्त्रज्ञ आहेत. भारतात हरितक्रांती घडवून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांनी कृषि क्षेत्रातील संशोधनासाठी 'एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन'ची स्थापना केलेली आहे. भारत सरकारने डॉ. मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्वामीनाथन आयोगाची स्थापन केली.


            मोणकोंबू सांबशिवन स्वामीनाथन यांचा जन्म तमिळनाडूमध्ये कुंभकोणम येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा स्वामीनाथनांवर चांगला परिणाम झाला. वडिलांप्रमाणे तेही डॉक्टरी शिक्षणाकडे वळले. पण १९४३मधील बंगालच्या दुष्काळामुळे त्यांनी ते शिक्षण अर्धवट सोडून दिले आणि ते शेतकी विषयाचे शिक्षण घेऊ लागले. केरळमधील महाराजस कॉलेजातून त्यांनी कृषिक्षेत्रातली पदवी घेतली.
           कृषिक्षेत्रात काम करावयाचे नक्की झाल्यावर स्वामीनाथन यांनी मद्रास कृषि महाविद्यालयातून आणखी एक पदवी घेतली. १९४७ साली ते दिल्लीच्या इंडियन ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी रवाना झाले. १९४९मध्ये विशेष प्रावीण्यासह त्यांनी ती पदवी प्राप्‍त केली. युनियन पब्लिक सर्व्हिसची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलॅंडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी १९५२मध्ये पी‍एच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतानाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्‍पन्‍न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्‍नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.
एम.एस. स्वामीनाथन यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आदी  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर जागतिक किर्तीचा
रॅमन मॅगसेसे पुरस्कार व विश्व कृषी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे.जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञामुळे भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकला. त्यांच्या कार्याला सलाम.
    संग्राहक -- राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८


मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

!! नील आर्मस्ट्राँग जन्मदिन !! (५ ऑगस्ट )

!! नील आर्मस्ट्राँग जन्मदिन !!
    (५ ऑगस्ट )


      नील आर्मस्ट्रॉंग जन्म- ५ऑगस्ट  १९३०  मृत्यू - २५ऑगस्ट  २०१२ हे एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होते. आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.
        नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्रॉंगने २० जुलै १९६९ रोजी  चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत २१ जुलै १९६९ त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले. आर्मस्ट्रॉंग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला. "ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे,' असे आर्मस्ट्रॉंग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.
     नील आर्मस्ट्राँग यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
    संग्राहक -- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!! श्रीरामाची माहिती !!

!! श्रीरामाची माहिती !!


 आज अयोध्या येथे श्रीराम मंदिर भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते होत आहे त्या निमित्ताने प्रभू श्रीरामाविषयी थोडेसे--
            राम किंवा श्रीराम हे वाल्मीकिंंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार होते, अशी मान्यता आहे. ते अयोध्या नगरीचे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी या तिथीला झाला असे मानले जाते. प्रभु श्री राम सत्य वचनी व एक पत्नी व्रत व परम दयाळू होते.
  नावाविषयी थोडेसे --
राम : राम म्हणजे स्वतः आनंदात रममाण असलेला आणि दुसर्‍याना आनंदात रममाण करणारा.
श्रीराम : दुष्ट रावणाचा वध करून आणि लंका जिंकून घेतल्यानंतर, म्हणजे स्वतःचे भगवंतपण दाखविल्यानंतर राम जेव्हा सीतेसह अयोध्येला परतला, तेव्हा सर्व अयोध्यावासी त्याला ‘श्रीराम’ म्हणू लागले.
         श्रीराम आदर्श पुत्र होता. रामाने आईवडिलांच्या आज्ञांचे सदैव पालन केले. आदर्श अशा बंधुप्रेमाला अजूनही राम-लक्ष्मणाचीच उपमा देतात. श्रीराम एकपत्‍नीव्रती व राजधर्माचे पालन करण्यात तत्पर आदर्श राजा होता. प्रजेने सीतेबाबत संशय व्यक्‍त केल्यावर त्याने आपल्या वैयक्‍तिक सुखाचा विचार न करता, राजधर्म म्हणून आपल्या धर्मपत्‍नीचा त्याग केला. श्रीराम हा आदर्श शत्रूसुद्धा होता. रावणाच्या मृत्यूनंतर अग्निसंस्कार करायला त्याचा भाऊ बिभीषण नकार देतो, तेव्हा राम त्याला सांगतो, ‘‘मरणाबरोबर वैर संपते. तू जर रावणाचा अंत्यसंस्कार करणार नसलास, तर मी करीन. तो माझाही भाऊच आहे.’’
            श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादा पाळल्या असे रामायणातील उल्लेखांंवरून दिसून येते. म्हणूनच त्यांना भारतीय जनमानसात ‘मर्यादापुरुषोत्तम’ असे म्हटले जाते.
  संग्राहक-- राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

! श्रावण पौर्णिमा !!


    !! श्रावण पौर्णिमा !!(३ऑगस्ट )
                     ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. कारण त्या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इ. देवतांना अर्पण करतात. यानंतर ही पोवती घरातील स्त्री-पुरुष धारण करतात. श्रावणीच्या विधीनंतर एखादी गोष्ट पुन्हा नव्याने सुरू केली जाते. एखाद्या श्रावण महिन्यात जर लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असतील तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते.
            श्रावण पौर्णिमेचा दिवस हा भारताच्या समुद्रकिनारी राहणारे प्रांत नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात. समुद्रहे वरुणाचे स्थान समजले जाते. वरुण हा पश्चिमेचा दिक्पाल आहे. त्याला या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू प्रथा आहे.समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. मासेमारीसाठी सागरसंचार करणाऱ्यांनी वर्षाकालीन क्षुब्ध सागरावर जाणे थांबवलेले असते. हा काळ माश्यांच्या प्रजनन काळाचा म्हणून या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावण पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झालेकी त्यानंतर समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळन्यात आला आहे.

                 रक्षाबन्धन
         श्रावण पौर्णिमेच्या दिवशी बहुधा राखी पौर्णिमाही असते. त्यादिवशी बहिणी भावाला राखी बांधतात आणि ओवाळतात. या विधीला रक्षाबंधन म्हणतात. हा मूळ उत्तर भारतातला सण आता उर्वरित भारतातही पाळला जातो. या दिवसाची आख्यायिका प्रसिद्ध आहे. देव आणि दानव यांच्यातील युद्ध सुरु होते. देवांचा पराभव होणार असे दिसत असताना देवराज इंद्राची पत्नी इंद्राणी हिने आपल्या पतीच्या मनगटाला एक संरक्षक धागा बांधला आणि दुस-या दिवशी देवांचा विजय झाला. त्या दिवसापासून ही प्रथा सुरु झाली असे मानले जाते. मात्र काळाच्या ओघात आता बहिण भावाला राखी बांधते असा संकेत रूढ झाला आहे.
संग्राहक -- राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

!! क्रांतिसिंह नाना पाटील जयंती !! (३ ऑगस्ट )



  !! क्रांतिसिंह नाना पाटील जयंती !!
    (३ ऑगस्ट )



                महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते  क्रांतिसिंह नाना पाटील होत.लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
               देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.
ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
                  ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा त्यांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
                   या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले.         
          १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते.
                     भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच १९४६ मध्ये  क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले. यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, यांसारखे कार्यकर्ते घडले.स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे इ.स. १९७६ मध्ये निधन झाले.आज त्यांच्या नावाने सातारा जिल्ह्यात अनेक संस्था कार्यरत आहेत. उदा. स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा ,क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,शिरवळ
     साताऱ्याचे प्रतिसरकार स्थापन करणाऱ्या या क्रांतिसिंहाला विनम्र अभिवादन.
संग्राहक-   राजेंद्र पवार  
            ९८५०७८११७८
   


!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...